Tuesday, February 14, 2012

shrota-gaurav

पहिल्या अध्यायाच्या २८ व्या ओवीत श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सकल   कथांचे जन्मस्थान असलेली कथा ऐकण्यास येण्याचे आवाहन करतात .त्यांच्या श्रोत्यांमध्ये अनेक संत ,महंत उपस्थित होते ,त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना तुम्ही मायबाप व मी अपत्य असे नाते ते धारण करतात .आपल्या रसाळ काव्याने गीतेचे स्वरूप स्पष्ट करताना ते म्हणतात की महाभारत हा शब्दब्रम्हाचा  सागर -व्यास मुनींच्या बुद्धीने त्याचे मंथन करून गीता रुपी लोणी काढले ,आणि त्यास ज्ञान अग्नीची आच देऊन विवेकाने त्याचे तूप बनवले .
श्रोत्यांना श्रेष्ठता देताना ते म्हणतात की अहो ,अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची तुमची योग्यता आहे ,म्हणून पाया पडून विनंती करतो की अवधान द्यावे .श्रोत्यांपुढे आपले सानपण वर्णन करताना ते स्वताला सुर्यासामोरील काजव्याची ,चोचीने सागर मोजू पाहणाऱ्या ठीठ्वीची  उपमा देतात .
श्रोता असलेल्या संतांचे सामर्थ्य वर्णन करताना ते म्हणतात जेथे वेद वेडावला तेथे मी काय ?एरवी मी मूर्ख ,पण जसे परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते ,व अमृत मिळाल्यावर मृताला जीवन लाभते ,त्याप्रमाणे संतकृपेने मी हे धाडस करू शकलो संत कृपेचा आधार मागताना ते विनंती करतात
    तरी न्यून ते पुरते ।अधिक ते सरते ।करुनी घ्यावे हे तुमते ।विनवीत असे ।
श्रोत्यांनी कसा रसास्वाद घ्यावा हे सांगताना ते मधुर शब्द योजना करतात .ते म्हणतात ,ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्र किरणातील कोवळे अमृतकण चकोराची पिल्ले अतिशय हळुवारपणे टिपतात ,त्याप्रमाणे श्रोत्यांनी आपल्या मनास  मृदुलत्व आणून ही कथा अनुभवावी ,तिची प्रतीती घ्यावी ,त्याकरिता चित्तातील मळ आणि निक्षेप हे दोष काढून चित्त एकाग्र करावे .
पुढे श्री ज्ञानदेव सांगतात की गीतेची चर्चा शब्दाशिवाय करावी ,म्हणजे त्यावर विचार जास्त करावा .इंद्रियांना न समजता हिचा उपभोग घ्यावा ,कारण  आत्मानंद हा अतींद्रिय अनुभव आहे .
सहाव्या अध्यायातही  एकदा त्यांनी गीताभ्यास करताना शब्दापलीकडे जाण्याची गोष्ट सांगितली आहे .
आहा बोलाची वालीफ फेडिजे ।आणि ब्रम्हा चिया अंगा घडिजे ।
हा ग्रंथ मननाचा विषय आहे -चर्चेचा नाही .या ग्रंथामुळे येणाऱ्या आत्मानुभावाला  ते उपमा देतात की जसे भुंगे कमळातील पराग नेतात ते पाकळ्यांना कळत नाही ,त्याप्रमाणे या ग्रंथाचे सेवन करावे .
दुसरी उपमा देताना ते म्हणतात की ज्याप्रमाणे चंद्र विकसि कमल चंद्र उगवताच आपले स्थान न सोडता त्याचे प्रेमसुख उपभोगते ,त्याप्रमाणे मन स्थिर करून आत्म तत्वाचा आनंद घेतला पाहिजे
शेवटी ते म्हणतात की असा गंभीर आणि स्थिर अंतकरण असणारासच गीतेचे मर्म कळू शकेल .

No comments:

Post a Comment