ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका असताना गुरुगौरव दीपिकाही आहे .ओंकारस्वरूप गजानन आणि श्री सरस्वती यानंतर त्यांनी श्री गुरुचरणांना वंदन केले आहे .
संसारपुरातून तारणारे ,बुद्धीला विवेकाची दिशा देणारे ,साऱ्या मनोकामना पूर्ण करणारे असे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात "मुळांना सिंचन केल्याने सारा वृक्ष बहरतो ,सागर स्नान केल्याने साऱ्या तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लाभते ,त्याप्रमाणे एका गुरुभक्तीने ब्रम्हप्राप्तीचे सारे मार्ग एक होतात .
गुरूचा महिमा सांगताना ते त्यांना माउली म्हणतात ,गुरूच्या पाऊली सारस्वत पिकते म्हणून मी गुरूची सावलीसारखी साथ करतो ,असे म्हणून आपल्या साहित्य निर्मितीचे सारे श्रेय गुरुना देतात .ज्ञानेश्वरीत निदान ३०० ओव्या गुरुकृपा वर्णन करतात .
गुरुवर्णन करताना ते म्हणतात ,माझे गुरु धर्माचे मूर्त भांडार आहेत ,सद्गुरुकृपेच्या दीप प्रकाशात मला श्रीकृष्ण बोधाचे रूप दिसेल ,जिथे दृष्टी पोहोचत नाही आणि जे दृष्टीविना पाहता येते ते ब्रम्ह पाहण्याचे भाग्य मला गुरूमुळे प्राप्त झाले .
गुरूंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना ते म्हणतात की त्यांनी संस्कृत भाषेचा अवघड तट फोडून सोप्या मराठी शब्दांचा घाट बांधला -आता त्यांच्या बलाने मी बोलेन ,अव्यक्ताला शब्द माध्यमातून व्यक्त करीन ,अतिन्द्रीयाला इंद्रीयाकरवी भोगवीन -श्रीज्ञानेशांचा हा गाढ आत्मविश्वास त्यांच्या गुरुवरील विश्वासाचेच प्रतिक होय .
सद्गुरूच्या कृपेचे वर्णन करताना ते म्हणतात ,आपला कृपाप्रसाद पूर्ण चंद्र तर माझी गीतास्तुती पोर्णिमा आहे ,आपल्यामुळे माझ्या ज्ञानसागराला भरति येईल व ग्रंथाचे निरुपण रसाळ होईल .
तेराव्या अध्यायात ते म्हणतात की आत्मज्ञान हे केवळ वाचन ,अभ्यास याने प्राप्त होत नाही ,तर ते गुरुकृपेनेच प्राप्त होते ,हे त्यांची निष्ठा आहे .
अशा आपल्या गुरुना ते चिंतामणीची उपमा देतात आणि आपले सारे मनोरथ पूर्ण करण्याचे श्रेय देतात
या साऱ्या कथनातून प्रकट होणारी त्यांची भावकोमलता आणि विनम्र वृत्ती ,यांचा उगम त्यांच्या गुरुभक्तीतचआहे .
श्री ज्ञानेश्वरांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचे सर्वस्व त्यांचे गुरूच आहेत .गुरूंच्या पायी असणारा उत्कट समपर्ण भाव ,श्रद्धा भक्ती ,प्रेम ,निष्ठा या विषयांना ज्ञानेश्वरीचा जो मुळ विषय 'गीताटीका ' यापासून वेगळे काढता येत नाही
No comments:
Post a Comment