Saturday, December 1, 2012

aahar

भगवंत म्हणतात कि प्रत्येक माणसाचा आहार हा त्याच्या आवडीवर अवलंबून असतो व आवड हि गुणांवर अवलंबून असते ,तेंव्हा तीन गुणांप्रमाणे आहारही सत्व ,रज ,तम या तीन प्रकारचा बनला आहे .पण प्रत्येकाने सत्वगुणी आहारच सेवन करावा म्हणजे त्याच्यातील नैसर्गिक राजस व तामस  वृत्तींचा जोर कमी होऊन सात्विक वृत्ती वाढीस लागतील .
सत्वगुणी पुरुषाला मधुर ,स्निग्ध व रसभरीत आहार आवडतो ,अशा आहाराने शरीर रोगमुक्त व मन प्रसन्न राहते .हा आहार सत्व ,बल ,प्रीती व आयुष्य वाढवतो .सात्विक पदार्थ स्वभावतःच रसभरीत व गोड असतात ,स्निग्ध व परिपक्व असतात ,स्पर्शाला मऊ व चविष्ट असतात ,हा आहार थोडासाच सेवन केला तरी पूर्ण तृप्ती देतो .शरीर व मनाला सामर्थ्य पुरवणारा व सात्विक गुणांची वाढ करणारा असा हा आहार आहे .
रजोवृत्तीच्या लोकांना तिखट ,आंबट ,खारट  ,अति उष्ण  ,तीक्ष्ण रुक्ष ,दाह करणारे आहार प्रिय असतात पण हे आहार शेवटी दुखः ,शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत .
हा रजोगुणी अतिशय खारट  पदार्थ खातो व इतके गरम पदार्थ खातो कि जणू अग्नीच गिळत आहे .घाव न घालताही रुपणारे  असे तिखट तो खातो .त्याचे अन्न कोरडे व कडक असते ,जणू अन्नरूपाने तो प्रज्ज्वलित अग्नीच भरतो .असे अन्न खाल्ल्यावर त्याला बेचैनी येते व सतत पाणीपाणी होते .या आहाराचे फल म्हणून शरीरात अनेक आजार एकदम उठतात व  मन दुख्खमय  होते .
ते आहार नव्हती घेतले ।व्याधिव्याळ जे सुटले ।ते चेवावया घातले ।माजवण पोटी ।१५० अ १७
हे अन्न नसून शरीरात रोग रुपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे होय .तमोगुणी पुरुषाचा आहार वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि याची तुम्हाला किळस येईल .जशी म्हैस निर्विकार रीतीने आंबोण खाते तसे तो अन्न खातो .दोषयुक्त ,खाण्यास अयोग्य मानलेल्या पदार्थांच्या ठिकाणीच त्याची हाव वाढते .
मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो ,त्याप्रमाणे शरीरातील रक्त मासादी धातू बनतात व धातुप्रमाणे मनुष्याचा स्वभाव तयार होतो .म्हणून आहाराचा व वृत्तीचा परस्पर संबंध आहे .व म्हणून मोक्षाच्या वाटेने चालणार्यांनी आपली सात्विक वृत्ती वाढीस लावण्यासाठी सात्विकच आहार घ्यावा ,ज्यामुळे आपले मन ,शरीर व बुद्धी समतोल राहील व कफ, पित्त व वात हे त्रिदोष संतुलित राहतील.

No comments:

Post a Comment