Saturday, December 1, 2012

daivi sampatti

सोळाव्या अध्यायात भगवंत मोक्षाची अचूक प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीच्या २६ गुणांचे वर्णन करतात .
सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे१ अभय -मृत्यूची भीती नाहीशी होणे .हे अभय निरहंकार वृत्तीने व फलाशा टाकून कर्म करण्याने प्राप्त होते ,अथवा आपलेच रूप सर्वत्र भरले आहे ,मग कोण कुणाला मारणार या विचाराने जो अद्वैत रूप बनला त्यालाही अभय प्राप्त होते .
२सत्वशुद्धी -बुद्धीतील रज -तम जाऊन ,संकल्प -विकल्प उठण्याचे थांबून जिला सत्व स्वरूपच आवडले अशी भगवंताच्या ठिकाणी अनोन्य बुद्धी तिला सत्वशुद्धी असे म्हणतात .
३ज्ञानयोग व्यवस्थिती -ज्ञानाच्या अथवा योगाच्या ठिकाणी चित्तवृत्ती एकाग्र करणे .
४दान - आपपर भाव न ठेवता कायावाचामने करून  संकटग्रस्तांना मदत करणे ते दान
५दम -इंद्रियांचा विषयाचरणापासून संबंध तोडून त्यांना व्रताचरणात गुंतवणे हा दम .
६यज्ञ -वर्णाश्रमाप्रमाणे स्वकर्माचे आचरण निरहंकार बुद्धीने व फलाशा सोडून करणे हा यज्ञ .
७स्वाध्याय -ईश्वर दर्शनासाठी श्रुतींचा अभ्यास अथवा अखंड नामस्मरण करीत राहणे हा स्वाध्याय .
८तप -विवेकाने शरीरातील आत्मा व देह यांच्या सरमिसळीतून आत्मा वेगळा करून त्याच्या स्वरूपाविषयी सदा जागृत राहणे हे तप .
९आर्जव -सर्वांशी सौजन्याने वागणे .
१०अहिंसा -कायावाचामने करून होणाऱ्या सर्व क्रिया जगाच्या कल्याणाकरिता करणे .
११अक्रोध -राग येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी मनात रागाची ऊर्मीही उठत नाही तो अक्रोध .
१२त्याग -मूळ देहाची अहंता टाकून देणे हा त्याग .
१३शांती -जाणण्याचा विषय ,जाणणारा व जाणणे ही जेथे नाहीसे होते ती शांती .
१४  अपैशुन्य-दुसऱ्याच्या दोषांवर त्याला न टोचता त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या गुणाचा उपयोग करणे .
१५ दया -दुखीः लोकांचे दुखः नाहीसे करण्याकरता त्यांना आपपर भाव न ठेवता सर्वस्वाने मदत करण्याची तळमळ ती दया .
१६अलोलुप्य -ऐहिक अथवा पारलौकिक भोग स्वाधीन झाले असताही त्या भोगाबद्दल मनात कंटाळा असणे .
१७मार्दव -सर्वांशी हळुवार प्रेमाने वागणे .
१८लाज -मुक्ती न मिलता देहरूप पुनर्जन्म मिळणे याबद्दल होणारी खंत म्हणजे लाज .
१९अचापल्य -मन व प्राण यांचे नियमन होऊन दाही इंद्रिये शांत होतात ते अचापल्य .
२०तेज -ईश्वराकडे मन धावत असतांना त्याच्या आड येणाऱ्या संकटाना तोंड देण्याचे सामर्थ्य ज्यामुळे येते त्यास तेज म्हणतात .
२१-क्षमा -लोकांचे सर्व अपराध सहन करूनही त्याबद्दल यत्किंचीतही अभिमान नसणे ही क्षमा .
२२धैर्य -त्रिविध ताप उत्पन्न झाले असता त्याचा प्रतिकार करणारे ते धैर्य .
२३शौच्य -अंतरी विमल आत्मज्ञान व बाह्य भागी शुध्द कर्माचरण ते शौच्य .
२४ अद्रोहत्व -आत्म हिताचा  मार्ग अनुसरत असताना ओघाने इतरांचेही सुख साधणे याला अद्रोहत्व म्हणतात .
२५सत्य -ऐकणाराला गोड वाटून निसंदेह करणारे ,परिणामी कल्याणकारक असे जे बोलणे त्याला सत्य म्हणतात .
२६अमानित्व -मनाला पूर्ण योग्य असूनही लोकांनी सन्मान केला असता अवघड वाटतो ,त्या स्थितीला अमानित्व म्हणतात .

No comments:

Post a Comment