तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न देता ।एथ मोक्ष असे आयता ।श्रवणाची माजि ।अ ४ -२२३
आपल्या कथेबद्दल ते म्हणतात कि येथे मनाला न मारता ,इंद्रियांना दुखः न देता ,आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे -म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते .आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात की ,माझे शब्द रुपी ताटे ,त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने वाढली आहेत ,ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे .
साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र ।पै संसारु जीणते हे शस्त्र ।आत्मा अवतारीते मंत्र ।अक्षरे येथे ।अ १५ -५७६
आपले बोल हे केवळ शब्द नसून ते संसार जिंकणारे शस्त्र आहेत ,ही आत्म्यापर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत असे ते सांगतात .
श्री गुरुना ज्ञानेश्वर विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रम्ह्सुखाचेच देणेघेणे होऊ दे .येथेही ज्ञानेश्वरांची इच्छा जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ही आहे हे स्पष्ट होते .यापुढे गुरूना विश्वोध्दाराची मागणी करताना ते म्हणतात ,
याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू ,गीतार्थाने विश्व भरून टाकू ,सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू ,हे गुरु ,परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो ,सुखाचा उत्सव उदयास येवो ,व सर्व जग ब्रम्ह ज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो .ही अशी सर्व जगासाठी प्रार्थना करणे यातच श्री ज्ञानेश्वरांचे वेगळेपण आहे .वैयक्तिक धर्माचरणाचे विविध मार्ग ग्रंथातून पूर्वी सांगितले गेले होते ,पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे ?या मोक्षमार्गावर भक्तीचा सोपा घाट कसा बांधावा ,कर्मयोगी बनून ,संसारात राहूनही स्वतः बरोबर जगाचा उध्दार कसा करावा ,हे सांगणारी भागवत धर्माची गुढी प्रथम उभी केली श्री ज्ञानेश्वरांनी ,त्यांना शतशत प्रणाम .
No comments:
Post a Comment