गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञान प्रधान शास्त्र आहे ,परंतु सर्व जीव अज्ञानाने बांधले आहेत .तेंव्हा अशा अज्ञानी जीवाना मोक्ष पद मिळवण्याची योग्यता मिळवण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला आहे .जो खरा ज्ञानी पुरुष आहे तो निष्काम कर्म योगीच असतो ,कारण शरीर धारण करीत आहोत ,तोपर्यंत कर्म त्याग शक्य नाही .जेंव्हा निष्काम कर्म योगी अंतकरण स्थिर करून इंद्रियाचे व्यापार सुरु ठेवतो ,तेंव्हा तो खरा कर्मापासून मुक्तच असतो ,कारण त्याचे कर्म हे संकल्प विरहीत व फलाशा त्यागून केलेले असते ,त्यामुळे त्याला कर्म बंध न लागता मोक्षाप्रत जाता येते .-हा जीवन क्रमच एक नित्य यज्ञ आहे .
अज्ञानी पुरुषांना कर्म कसे करावे याचा आदर्श या कर्म योग्यांच्या जीवनाकडे बघून मिळतो ,म्हणून ज्ञानी पुरुषांनी कर्म अवश्य करावी .
मार्गाधारे वर्तावे ।विश्व हे मोहरे लावावे ।अलौकिक नोहावे ।लोकाप्रती ।अ ३ -१८१
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो .ते अर्जुनासही उपदेश करतात कि लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे ,शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे ,लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये .
श्री ज्ञानेश्वर हे स्वतः जीवनमुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या उपदेशात दिसते .वैदिक धर्माने ज्ञानापासून व मुक्तीच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन मिळण्यापासून वंचित ठेवलेल्या समाजाला ज्ञानाच्या ,भक्तीच्या कक्षेत आणणे हा ज्ञानेश्वरांनी आपला जीवनधर्म मानला होता ,म्हणून त्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राकृत भाषेतील ग्रंथरचना करण्याचा संकल्प केला .
No comments:
Post a Comment