Saturday, February 9, 2013

sant sabha

अठराव्या अध्यायाच्या उपसंहारात गुरुगौरवा नंतर श्रोत्यातील संतांचा गौरव करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,
श्री गुरूंचा पुरोहित बनून मी जे काही बोललो त्याचे कमी -जास्त तुम्ही माउली प्रमाणे सहन केले .माझ्या गुरुनी निर्माण केलेल्या ग्रंथाची रचना मी केली ,आणि तुम्हा संतांच्या सभेत त्यात काही उणीव शिल्लक राहिली ,व पुरी झाली नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागावता येईल ,कारण कि परिसाचा स्पर्श झालेला असतानाही लोखंड जर हीन दशेला मुकले नाही ,तर तो दोष कोणाचा ?मोठ्या भाग्याने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असताना मला जगात उणे कुठे ?तुमच्याच योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो ,मला तुम्हासारखे माहेर आहे ,म्हणून हा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला .
गीतेच्या अर्थाचे मर्म सांगणे इतके कठीण आहे कि त्यापेक्षा कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही .सातही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे ,तार्यांचे चंद्र करणे सोपे आहे ,पण हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा झेंडा जो नाचतो आहे ,तसेच गीतार्थाच्या आवारात अठरावा अध्याय रुपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून मी त्याठिकाणी गुरु मूर्तीची पूजा करत आहे ,ही तुमचीच पुण्याई आहे .जी जी आशा धरून मी तुमच्या विषयी खात्री बाळगली ,ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत .माझ्या संपूर्ण जन्माचे फल मला प्राप्त करून दिलेत .तुम्ही माझ्याकरता ग्रंथाची जी प्रतिसृष्टी उभी केलीत ती पाहून आम्ही विश्वमित्रालाही हसुत .,कारण त्याची सृष्टी नाश पावणारी होती ,तर ही ग्रंथ रुपी सृष्टी अविनाशी आहे .
म्हणून तुम्ही संतानी माझ्यावर हा ग्रंथरूपी उपकार केला तो त्रैलोक्यात निरुपम आहे . तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे आख्यान शेवटला गेले व याठिकाणी माझा फक्त सेवक पणा उरला ,म्हणून आता मी पसायदान मागतो . 

No comments:

Post a Comment