Thursday, February 16, 2012

abhar

सर्व वाचकांना नमस्कार
 आपल्या प्रतिसादामुळे हे लेखन पुढे नेण्याचे मला धैर्य लाभत आहे .त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद .
   आपल्या टिपण्या मला सुधारणा करण्यास मार्ग दाखवतील ,म्हणून वेळ काढून छोट्या टिपण्या दिल्यास मी आपली आभारी राहीन .
अलका निरंतर

atm-anatm vichar

दुसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला अर्जुनाने आपल्या युद्ध न करण्याच्या विचाराचे अनेक प्रकारे समर्थन केले ,नंतर तो शांत बसल्यावर या मोहातून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णांनी आत्मानात्म विचार सांगितला .
हे उपजे आणि नाशे ।तें मायावशेन दिसे ।येर्हवी  तत्वता वस्तू जे असे ।ते अविनाशची ।
मुल ब्रह्म ,ज्याने हे सारे जग व्यापले आहे ,ते अविनाशी आहे  त्याचा विनाश करू शकण्यास समर्थ कोणी नाही ते सत आहे ,तेच प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने असते त्यास चित -आत्मा असे म्हणतात .
ज्ञानी पुरुष हे जाणतात की मायेच्या सामर्थ्याने जे जन्म व मरण भोगते ते शरीर व जीवन हे असत आहे -नाशिवंत शरीर हे जड असून अनात्म आहे ,त्यात गुप्तपणे राहणारे चैतन्य हे खरे आत्म रूप आहे .
या देहाकडून पंच ज्ञानेन्द्रीयाद्वारा जे ज्ञान मिळते आणि पंच कर्मेंद्रीयाद्वारा जी कर्मे केली जातात ,ती सर्व नाशिवंत असल्याने मिथ्या आहेत .ही नाशिवंत गोष्ट टाकल्यावर एकमात्र अविनाशी आत्मतत्व उरते .
शरीर आणि चैतन्य यातला फरक ज्यांनी ओळखला त्यांना नक्की माहित आहे की शरीराद्वारा  निर्माण होणारे भोग आणि कर्म हि शाश्वत वाटणे हा मात्र भास आहे
ब्रह्म आणि त्याचे जीवातील रूप आत्मा ,तो शाश्वत आणि सर्वव्यापी आहे ,तो जन्म मरण रहित असून निर्गुण निराकार आहे .त्यास नाम ,वर्ण ,आकार अशी कोणतीही चिन्हे नाहीत .तो कोणाकडून मारला जात नाही ,तो कोणास मारत नाही ,
ज्याप्रमाणे स्वप्नातून जाग आल्यावर स्वप्नातल्या गोष्टी खोट्या वाटतात ,त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी त्याच्या मूलरूपाचा नाश होत नाही हे लक्षात आल्यावर ते या शरीरासाठी शोक करत नाहीत .
जैसे स्वप्नामाजी देखिजे ।तें स्वप्नीची साच आपजे ।मग चेउनिया पाहिजे ।तंव काही नाही ।
तैसे शरीराच्या लोपी ।सर्वथा नाश नाही स्वरूपी ।म्हणुनी तू हे न आरोपी ।भ्रांती बापा ।
शरीराच्या अंती आत्म रूपाचे  काय होते हे सांगताना ते म्हणतात
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे ।मग नूतन वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे ।चैतन्य नाथे   ।
आत्मा हा अनादि,शाश्वत ,उपाधिरहित आणि शुद्ध आहे ,म्हणून त्याचा शस्त्राने घात होत नाही .हा सर्व ठिकाणी नेहमी भरलेला आहे ,पण तो तर्काच्या दृष्टीला दिसत नाही .व मनास हाती लागणे शक्य नाही  हा सत्व ,रज ,तम गुणांच्या विरहीत आणि विकार रहित आहे .
आत्म्याच्या जन्म मरण या फेऱ्यातील सातत्य  समजावताना  ते सांगतात की गंगाजल सतत समुद्रास मिळत असलेतरी  त्याची सुरवात आणी प्रवाह कधी खंडीत होत नाही ,त्याप्रमाणे जन्म मरणाच्या फेऱ्यात आत्म्याचे अस्तित्व हे अखंडीत आहे .
जे आदि स्थिती अंत ।हा निरंतर असे नित्य ।जैसा प्रवाह अनुस्यूत ।गंगाजलाचा ।
या चैतन्याचा विचार केला तर जीवाचे व्यक्त रूप हे मायेमुळे आहे ,या व्यक्त रुपास उदय आणि अस्त हे चुकवता येत नाहीत ,पण म्हणून त्यासाठी शोक करणे योग्य नाही .
घट माथु घडले ।तेची पाठी मोडले ।परी आकाश ते संचले ।असतची असे ।|
तैसे अखंडे आत्म सत्ते |अज्ञानदृष्टीकल्पिते ।हे देह्ची होतेजाते ।जाणती फुडे ।अ १५ ओवी ३८९ /३९०
ज्याप्रमाणे घट आणि माठ तयार केले आणि मोडून टाकले ,तरी त्यांच्या आतील आकाश हे न होता व न मोडता आहे तसेच आहे ,अखंड आत्म सत्तेवर अज्ञानाने कल्पना केलेले अनात्म देह उत्पन्न होतात आणि नाश पावतात ,पण त्यातील आत्म तत्व हे अबाधित असते .हे ज्ञानी लोक जाणून घेतात .सांख्य योग आणि कर्म योग या दोन्ही मार्गांनी हे साधता येते .

Tuesday, February 14, 2012

shrota-gaurav

पहिल्या अध्यायाच्या २८ व्या ओवीत श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सकल   कथांचे जन्मस्थान असलेली कथा ऐकण्यास येण्याचे आवाहन करतात .त्यांच्या श्रोत्यांमध्ये अनेक संत ,महंत उपस्थित होते ,त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना तुम्ही मायबाप व मी अपत्य असे नाते ते धारण करतात .आपल्या रसाळ काव्याने गीतेचे स्वरूप स्पष्ट करताना ते म्हणतात की महाभारत हा शब्दब्रम्हाचा  सागर -व्यास मुनींच्या बुद्धीने त्याचे मंथन करून गीता रुपी लोणी काढले ,आणि त्यास ज्ञान अग्नीची आच देऊन विवेकाने त्याचे तूप बनवले .
श्रोत्यांना श्रेष्ठता देताना ते म्हणतात की अहो ,अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची तुमची योग्यता आहे ,म्हणून पाया पडून विनंती करतो की अवधान द्यावे .श्रोत्यांपुढे आपले सानपण वर्णन करताना ते स्वताला सुर्यासामोरील काजव्याची ,चोचीने सागर मोजू पाहणाऱ्या ठीठ्वीची  उपमा देतात .
श्रोता असलेल्या संतांचे सामर्थ्य वर्णन करताना ते म्हणतात जेथे वेद वेडावला तेथे मी काय ?एरवी मी मूर्ख ,पण जसे परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते ,व अमृत मिळाल्यावर मृताला जीवन लाभते ,त्याप्रमाणे संतकृपेने मी हे धाडस करू शकलो संत कृपेचा आधार मागताना ते विनंती करतात
    तरी न्यून ते पुरते ।अधिक ते सरते ।करुनी घ्यावे हे तुमते ।विनवीत असे ।
श्रोत्यांनी कसा रसास्वाद घ्यावा हे सांगताना ते मधुर शब्द योजना करतात .ते म्हणतात ,ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्र किरणातील कोवळे अमृतकण चकोराची पिल्ले अतिशय हळुवारपणे टिपतात ,त्याप्रमाणे श्रोत्यांनी आपल्या मनास  मृदुलत्व आणून ही कथा अनुभवावी ,तिची प्रतीती घ्यावी ,त्याकरिता चित्तातील मळ आणि निक्षेप हे दोष काढून चित्त एकाग्र करावे .
पुढे श्री ज्ञानदेव सांगतात की गीतेची चर्चा शब्दाशिवाय करावी ,म्हणजे त्यावर विचार जास्त करावा .इंद्रियांना न समजता हिचा उपभोग घ्यावा ,कारण  आत्मानंद हा अतींद्रिय अनुभव आहे .
सहाव्या अध्यायातही  एकदा त्यांनी गीताभ्यास करताना शब्दापलीकडे जाण्याची गोष्ट सांगितली आहे .
आहा बोलाची वालीफ फेडिजे ।आणि ब्रम्हा चिया अंगा घडिजे ।
हा ग्रंथ मननाचा विषय आहे -चर्चेचा नाही .या ग्रंथामुळे येणाऱ्या आत्मानुभावाला  ते उपमा देतात की जसे भुंगे कमळातील पराग नेतात ते पाकळ्यांना कळत नाही ,त्याप्रमाणे या ग्रंथाचे सेवन करावे .
दुसरी उपमा देताना ते म्हणतात की ज्याप्रमाणे चंद्र विकसि कमल चंद्र उगवताच आपले स्थान न सोडता त्याचे प्रेमसुख उपभोगते ,त्याप्रमाणे मन स्थिर करून आत्म तत्वाचा आनंद घेतला पाहिजे
शेवटी ते म्हणतात की असा गंभीर आणि स्थिर अंतकरण असणारासच गीतेचे मर्म कळू शकेल .

Sunday, February 5, 2012

gurugourav 1

ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका असताना गुरुगौरव दीपिकाही आहे .ओंकारस्वरूप गजानन आणि श्री सरस्वती यानंतर त्यांनी श्री गुरुचरणांना वंदन केले आहे .
संसारपुरातून तारणारे ,बुद्धीला विवेकाची दिशा देणारे ,साऱ्या मनोकामना पूर्ण करणारे असे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात "मुळांना सिंचन केल्याने सारा वृक्ष बहरतो ,सागर स्नान केल्याने  साऱ्या तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लाभते ,त्याप्रमाणे एका गुरुभक्तीने ब्रम्हप्राप्तीचे  सारे मार्ग एक होतात .
गुरूचा महिमा सांगताना ते त्यांना माउली म्हणतात ,गुरूच्या पाऊली सारस्वत पिकते म्हणून मी गुरूची सावलीसारखी साथ करतो ,असे म्हणून आपल्या साहित्य निर्मितीचे सारे श्रेय गुरुना देतात .ज्ञानेश्वरीत निदान ३०० ओव्या गुरुकृपा वर्णन करतात .
गुरुवर्णन करताना ते म्हणतात ,माझे गुरु धर्माचे मूर्त भांडार आहेत ,सद्गुरुकृपेच्या दीप प्रकाशात मला श्रीकृष्ण बोधाचे रूप दिसेल ,जिथे दृष्टी पोहोचत नाही आणि जे दृष्टीविना पाहता येते ते ब्रम्ह पाहण्याचे भाग्य मला गुरूमुळे प्राप्त झाले .
गुरूंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना ते म्हणतात की त्यांनी संस्कृत भाषेचा अवघड तट फोडून सोप्या मराठी शब्दांचा घाट बांधला -आता त्यांच्या बलाने मी बोलेन ,अव्यक्ताला शब्द माध्यमातून व्यक्त करीन ,अतिन्द्रीयाला इंद्रीयाकरवी भोगवीन -श्रीज्ञानेशांचा हा गाढ आत्मविश्वास त्यांच्या गुरुवरील विश्वासाचेच प्रतिक होय .
सद्गुरूच्या कृपेचे वर्णन करताना ते म्हणतात ,आपला कृपाप्रसाद पूर्ण चंद्र तर माझी गीतास्तुती पोर्णिमा आहे ,आपल्यामुळे माझ्या ज्ञानसागराला भरति येईल व ग्रंथाचे निरुपण रसाळ होईल .
तेराव्या अध्यायात ते म्हणतात की आत्मज्ञान हे केवळ वाचन ,अभ्यास याने प्राप्त होत नाही ,तर ते गुरुकृपेनेच प्राप्त होते ,हे त्यांची निष्ठा आहे .
अशा आपल्या गुरुना ते चिंतामणीची उपमा देतात आणि आपले सारे मनोरथ पूर्ण करण्याचे श्रेय देतात 
या साऱ्या कथनातून प्रकट होणारी त्यांची भावकोमलता आणि विनम्र वृत्ती ,यांचा उगम त्यांच्या गुरुभक्तीतचआहे .
श्री ज्ञानेश्वरांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचे सर्वस्व त्यांचे गुरूच आहेत .गुरूंच्या पायी असणारा उत्कट समपर्ण भाव ,श्रद्धा भक्ती ,प्रेम ,निष्ठा या विषयांना ज्ञानेश्वरीचा जो मुळ विषय 'गीताटीका ' यापासून वेगळे काढता येत नाही    

Friday, February 3, 2012

vivek 1

आधीची विवेकाची गोठी ।वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराज किरीटी ।परिसत असे ।
मुळची गीता आत्मानात्म विचाराची गोष्ट ,त्यात श्रीकृष्ण प्रतिपादन करत आहे ,आणि भक्तराज अर्जुन ऐकत आहे .
विवेक म्हणजे सारासार विचार .
विविच्याते इति विवेक :म्हणजे ज्याचे पृथकरण केले जाते तो विवेक .सारासाराचे पृथकरण विवेकाने केले जाते .विवेक हे एक तपच आहे .
तैसे देहजीवाचिये मिळणी ।जो उदयजला सुये पाणी ।तो विवेक अन्तकारणी जागवी जो ।१६\११०
तप  या दैवी संपत्तीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात ,   देह आणि आत्मा या मधील फरक जाणणारा आत्मानात्म विचार हा विवेक जो अन्तकारणी सतत जागा ठेवतो तो तप या शब्दाचा अर्थ आहे .
संसारात अथवा परमार्थात कोठेही विवेकाशिवाय कोणतीही गोष्ट योग्य करता येत नाही ,आत्मानात्म विवेकानेच परमात्म्याचा लाभ होतो 'श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि सदगुरू माझ्या हृदयात आहेत म्हणून मला विवेक आदरणीय आहे .
चांगले काय आणि वाईट काय हे निश्चयाने सांगता येणे म्हणजे विवेक ,हे चांगले अखंड ,नित्य, सर्वकालीन ,आणि सर्वांसाठी असले पाहिजे .जे नैतिक दृष्ट्या कायम सर्वाना कल्याणकारक आणि आनंददायी आहे ते चांगले .
असा विवेक जागा असतो तेंव्हा मनुष्य स्वार्थी असत नाही ,तोस्वतः बरोबर सर्वांचा विचार करतो .असा विवेक अखंड राहावा म्हणून गरज असते वैराग्याची ,जर आपले मन गरजेपेक्षा जास्त एखाद्या विषयात गुंतले तर लोभामुळे विवेक जातो -स्वार्थ मध्ये येतो .म्हणून वैराग्य म्हणजे कोणत्याही लोभात गुंतून न पडणे .
  देखा विवेकवंतु सुविमळु ।तोची शुण्डदंडु   सरळु ।जेथ परमानंदु केवळु ।महासुखाचा ।
गणपतीची सरळ सोंड निर्मल आणि विवेकवंत म्हणजे बर्यावाईटाची निवड करण्यास समर्थ आहे
महाभारतास विवेक तरुंचे उद्यान म्हटले आहे .
म्हणोनी आईके देवा ।हा भावार्थु आता न बोलवा ।मज विवेकू सांगावा ।म्हहाराजी ।३ /१७
तिसऱ्या अध्यायात कर्म कि ज्ञान या घोटाळ्यात पडलेला अर्जुन विनवणी करतो कि देवा आता गुढार्थाने उपदेश करू नका ,मला विवेक लक्षण सोपे करून सांगा .
आपल्या अवतार बरोबर विवेकलक्षण जोडताना भगवंत म्हणतात ,
ऐसेची काजालागी ।अवतरे मी युगीयुगी ।परि हेच ओळखे जो जगी । तो विवेकिया ।४ /४०७
सज्जनांच्या रक्षणाकरता ,दुर्जनांच्या नाशाकरिता ,धर्म संस्थापनेकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो -हे तत्व जो ओळखतो तो विवेकी होय .
विवेकाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी सगळीकडेच येतात
 ऐसा जंव पार्था ।विवेक नूधवी माथा ।तंव अंत नाही अश्वत्था ।भवरुपा  यया ।
जोपर्यंत विवेकाने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थाला अंत नाही .
विवेक अपुले काम ।स्मरूनी ठाकी जे धाम ।निष्कर्षाचे निस्सीम ।किंबहुना कि ।४ /४०७
चौथ्या अध्यायात ब्रह्म आणि स्वतः यात भेद नाही हे सांगताना भगवंत म्हणतात ,विवेकविचाराने आपले काम पूर्ण केल्यावर जो येथे पोहोचतो ते ज्ञानेचे अंतिम स्थान मीच आहे .