दुसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला अर्जुनाने आपल्या युद्ध न करण्याच्या विचाराचे अनेक प्रकारे समर्थन केले ,नंतर तो शांत बसल्यावर या मोहातून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णांनी आत्मानात्म विचार सांगितला .
हे उपजे आणि नाशे ।तें मायावशेन दिसे ।येर्हवी तत्वता वस्तू जे असे ।ते अविनाशची ।
मुल ब्रह्म ,ज्याने हे सारे जग व्यापले आहे ,ते अविनाशी आहे त्याचा विनाश करू शकण्यास समर्थ कोणी नाही ते सत आहे ,तेच प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने असते त्यास चित -आत्मा असे म्हणतात .
ज्ञानी पुरुष हे जाणतात की मायेच्या सामर्थ्याने जे जन्म व मरण भोगते ते शरीर व जीवन हे असत आहे -नाशिवंत शरीर हे जड असून अनात्म आहे ,त्यात गुप्तपणे राहणारे चैतन्य हे खरे आत्म रूप आहे .
या देहाकडून पंच ज्ञानेन्द्रीयाद्वारा जे ज्ञान मिळते आणि पंच कर्मेंद्रीयाद्वारा जी कर्मे केली जातात ,ती सर्व नाशिवंत असल्याने मिथ्या आहेत .ही नाशिवंत गोष्ट टाकल्यावर एकमात्र अविनाशी आत्मतत्व उरते .
शरीर आणि चैतन्य यातला फरक ज्यांनी ओळखला त्यांना नक्की माहित आहे की शरीराद्वारा निर्माण होणारे भोग आणि कर्म हि शाश्वत वाटणे हा मात्र भास आहे
ब्रह्म आणि त्याचे जीवातील रूप आत्मा ,तो शाश्वत आणि सर्वव्यापी आहे ,तो जन्म मरण रहित असून निर्गुण निराकार आहे .त्यास नाम ,वर्ण ,आकार अशी कोणतीही चिन्हे नाहीत .तो कोणाकडून मारला जात नाही ,तो कोणास मारत नाही ,
ज्याप्रमाणे स्वप्नातून जाग आल्यावर स्वप्नातल्या गोष्टी खोट्या वाटतात ,त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी त्याच्या मूलरूपाचा नाश होत नाही हे लक्षात आल्यावर ते या शरीरासाठी शोक करत नाहीत .
जैसे स्वप्नामाजी देखिजे ।तें स्वप्नीची साच आपजे ।मग चेउनिया पाहिजे ।तंव काही नाही ।
तैसे शरीराच्या लोपी ।सर्वथा नाश नाही स्वरूपी ।म्हणुनी तू हे न आरोपी ।भ्रांती बापा ।
शरीराच्या अंती आत्म रूपाचे काय होते हे सांगताना ते म्हणतात
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे ।मग नूतन वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे ।चैतन्य नाथे ।
आत्मा हा अनादि,शाश्वत ,उपाधिरहित आणि शुद्ध आहे ,म्हणून त्याचा
शस्त्राने घात होत नाही .हा सर्व ठिकाणी नेहमी भरलेला आहे ,पण तो तर्काच्या
दृष्टीला दिसत नाही .व मनास हाती लागणे शक्य नाही हा सत्व ,रज ,तम
गुणांच्या विरहीत आणि विकार रहित आहे .
आत्म्याच्या जन्म मरण या
फेऱ्यातील सातत्य समजावताना ते सांगतात की गंगाजल सतत समुद्रास मिळत
असलेतरी त्याची सुरवात आणी प्रवाह कधी खंडीत होत नाही ,त्याप्रमाणे जन्म
मरणाच्या फेऱ्यात आत्म्याचे अस्तित्व हे अखंडीत आहे .
जे आदि स्थिती अंत ।हा निरंतर असे नित्य ।जैसा प्रवाह अनुस्यूत ।गंगाजलाचा ।
या
चैतन्याचा विचार केला तर जीवाचे व्यक्त रूप हे मायेमुळे आहे ,या व्यक्त
रुपास उदय आणि अस्त हे चुकवता येत नाहीत ,पण म्हणून त्यासाठी शोक करणे
योग्य नाही .
घट माथु घडले ।तेची पाठी मोडले ।परी आकाश ते संचले ।असतची असे ।|
तैसे अखंडे आत्म सत्ते |अज्ञानदृष्टीकल्पिते ।हे देह्ची होतेजाते ।जाणती फुडे ।अ १५ ओवी ३८९ /३९०
ज्याप्रमाणे
घट आणि माठ तयार केले आणि मोडून टाकले ,तरी त्यांच्या आतील आकाश हे न होता
व न मोडता आहे तसेच आहे ,अखंड आत्म सत्तेवर अज्ञानाने कल्पना केलेले
अनात्म देह उत्पन्न होतात आणि नाश पावतात ,पण त्यातील आत्म तत्व हे अबाधित
असते .हे ज्ञानी लोक जाणून घेतात .सांख्य योग आणि कर्म योग या दोन्ही
मार्गांनी हे साधता येते .