पाचव्या अध्यायातला दुसरा सिद्धांत आहे अहं मुक्तीचा .
तैसा कर्तृत्वाचा मदु ।आणि कर्मफलाचाआस्वाडू ।
या दोन्हीचे नाव बंधू ।कर्माचा किं ।अ १८ ओ २०५
कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची अपेक्षा या दोन्हीचे नाव कर्माचा बंध आहे .मी करता ,मी भोक्ता हा अहंकार दूर झाला की सर्व कर्मे करूनही तो अकर्ताच राहतो म्हणून हा जो कर्मयोगी तोच संन्यासी .
या योगी पुरुषाच्या सर्व व्यापाराचे वर्णन श्री ज्ञानदेवांनी फार समर्पक उपमा देऊन केले आहे .
दीपाचेनि प्रकाशे ।गृहीचे व्यापार जैसे ।देहिन कर्मजात तैसे ।योगयुक्त ।५ ओवी ४९
आत्मज्ञानाच्या दीपाच्या प्रकाशात योग्याचे सर्व व्यापार सुरु असतात ,पण केवळ साक्षीपणे ,तो कर्माच्या बंधनात सापडत नाही ,म्हणून त्याच्या परिणामातून हि मुक्त होतो ,मग त्याच्या या सर्व क्रिया ह्या अक्रीया होतात ,म्हणून हा जसा कर्मयोगी तसाच संन्यासी .
अशा योग्याच्या कर्माचे वर्णन करताना ते म्हणतात
आता करता ,कर्म करावे ।हे खुंटते त्या स्वभावे ।आणि करी जरी आघवे ।तरही अकर्ता तो ।
करता, कर्म आणि क्रिया ही त्रिपुटी त्याच्याबाबत संपते ,म्हणून हे कर्म निष्कर्म होते .कर्म हा प्रकृतीचा अटल पसारा आहे -आत्म रूपाचे या पसार्याशी काही देणेघेणे नाही ,हे तो जाणतो म्हणून तो फल ब्रह्मार्पण करतो ,त्यामुळे त्या कर्माचा दोष त्याला चिकटत नाही .अशाप्रकारे कर्मयोग्याचे कर्म हे करितेविन कर्म ,म्हणजेच नैष्कर्म्य आहे ,कारण तो जाणतो की त्याच्या आत्म रूपाचे या प्रकृतीजन्या कर्माशी काही देणेघेणे नाही ,म्हणून त्याने स्वतःला फळ हेतूपासून तोडलेले असते ,हेच योग तत्व पाचव्या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी गव्हारले आहे .
No comments:
Post a Comment