Thursday, April 5, 2012

kam,krodh,lobh,mad ,moh ,matsar -shadripu

निष्काम कर्मयोगाच्या आचरणात येणारे धोके सांगताना श्री भगवान म्हणतात कि प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात .इंद्रीयांपासून मिळणाऱ्या सुखसंवेदनेमुळे लोक विषयांच्या ठिकाणी मोहवश होतात आणि म्हणून कर्माच्या परिणामात सापडतात .जे लोक इंद्रियांचे लाड करतात ,त्यांना विषयरूपी विषाची बाधा होते ,ते अज्ञान रुपी चिखलात फसतात .इंद्रियांना पाहिजे तो विषय देत गेले तर मनाला संतोष होतो ,पण काम आणि त्याच्या परिणामी क्रोध हे घात करणारे आहेत ,म्हणून त्यांची मनास  ओढ लागू देऊ नकोस .
यावेळी अर्जुनाने विचारले कि असे आहे तर ज्यांना सगळे कळते असे ज्ञानी पुरुष ही कोणत्या प्रेरणेने चुकीच्या मार्गाने जातात ?
याचे उत्तर देताना भगवंत म्हणतात कि ज्ञानी पुरुषांना स्वताच्या इच्छे विरुध्द पापाचरण करायला लावणारे काम ,क्रोध ,मोह हे वैरी आहेत .हे असे आहेत कि यांच्या मनात दया नाही ,हे जणू प्रत्यक्ष यम धर्मच आहेत ,हे मुळात रजोगुण पासून बनले आहेत ,पण ते तमोगुणाला फार प्रिय आहेत .यांचे अविवेकाच्या रूपाने जगावर राज्य आहे .हे जीविताचे शत्रू असल्याने मृत्यूचे मित्र आहेत ,या काम ,क्रोधाच्या विनाशकारी व्यापारात आशा  ,भ्रांती आणि तृष्णा या सहाय्यकारी आहेत .यांच्या व्यापाराला जगही पुरे पडत नाही .यांना मोहाच्या घरी मनाचे स्थान आहे आणि त्यांची अहंकाराशी देवघेव आहे .अहंकार आपल्या पोटी सर्व जगास नाचवतो आणि दंभहि यांनीच जगात पुढे आणला .
या विषयांच्या सैन्याने मायेचा व्यवहार वाढतो .शांती ,विचार ,संतोष ,वैराग्य ,निग्रह ,आनंद ,बोध या सर्वाना ते लांब पळवून लावतात .हे कामक्रोध जीवात्म्या जवळच असतात ,शरीराबरोबर उत्त्पन्न होतात आणि अंतकरणास चिकटून राहतात .यांचे बल  असे की हे पाण्यावाचून बुडवतात ,अग्नीवाचून जाळतात  शास्त्र   वाचून ठार करतात ,जाल्यावाचून अडकवतात . हे अंत करणाच्या फार जवळ असल्याने कोणास ही आटोक्यातआणता  येत नाहीत .
काम,क्रोध ,मोहाचे वर्णन करताना श्री ज्ञानदेवांनी काही दृष्टांत दिले आहेत .ते म्हणतात कि ज्याप्रमाणे धुराने अग्नी ,मळाने आरसा आणि वेष्टणाने गर्भ अच्छादलेला असतो त्याप्रमाणे कामाने ज्ञानास आच्छादले  आहे .जसे चंदनाच्या मुलाला साप वेढे घालून बसतो ,तसे हे ज्ञानास कवटाळून बसतात .
ज्याप्रमाणे बी कोंड्या वाचून उत्पन्न होत नाही ,त्यप्रमाणे ज्ञान कधी काम क्रोध मोहवाचून उत्पन्न होत नाही .स्वभावतः ज्ञान निर्लेप आहे ,पण काम क्रोधाच्या आच्छादनामुळे ते प्राप्त करण्यास कठीण आहे .इंद्रिये ,मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थाने  आहेत .,म्हणून अगोदर इंद्रिये ,मन ,बुद्धी यावर स्वबळाने ताबा मिळवावा लागतो ,तेंव्हाच  ज्ञान प्राप्त होऊ शकते .
मग मनाची  धांव पारुषेल ।आणि बुद्धीची सोडवण होईल ।एतुकेनी थारा मोडेल ।या पापियांचा ।२६९
मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल .एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल .
इंद्रीयांपेक्षा मन  श्रेष्ठ ,मनापेक्षा बुद्धी व बुद्धीपेक्षा काम श्रेष्ठ ,म्हणून ब्रह्म प्राप्तीसाठी हे अर्जुना तू इंद्रियांचे नियमन करून ,मनावर संयमाचे राज्य आणून मोकळ्या बुद्धीने कामास जिंकून घे .तरच तू ज्ञानप्राप्तीस योग्य होशील .

No comments:

Post a Comment