Wednesday, April 18, 2012

krutarthpurush dnyaneshwar

भगवंत कृतार्थ पुरुषाची व्याख्या सांगतात 
कर्मण्या कर्म य :पश्येद कर्मणी च कर्मय :।स बुद्धिमान मनुष्येसू स युक्तः कृत्स्नकर्मकृत ।१८ अ ४ 
कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो व अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो ,तो मनुष्यामध्ये बुद्धिमान ,योगी ,सर्व कर्मकर्ता  जाणावा .
या कल्पनेचा विस्तार करताना श्री ज्ञानदेव म्हणतात ,सर्व कर्मांचे आचरण करत असताना जो आपण खरोखर कर्म करत नाही हे जाणतो आणि कर्म फळाची आशा धरत नाही ,तो ज्ञानी होय .तो दिसताना सामान्य माणसासारखा दिसतो ,पण तो इंद्रियांच्या अधीन नसतो .तो स्वतः विश्व रूप असतो ,मी आणि हे जग त्यासाठी वेगळे नसते .त्याच्या ठिकाणी कर्माचा तिरस्कार नसतो ,पण फळाची आशाही नसते . हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले पुरे करीन ह्या कल्पनाही त्याच्या मनात येत नाहीत ..
ज्ञानरूपी अग्निद्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रम्हच आहे 
व्यक्त्वा कर्मफलासंग नित्य तृप्तो निराश्रयः ।कार्माण्याभी प्रवृत्तोपी नैव किंचित करोति सह ।२० 
कर्म फळाची आसक्ती सोडून नित्य तृप्त आणि निराश्रय झालेला मनुष्य लोक दृष्टीने कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झालेला दिसत असला तरी वास्तविक तो काही करत नाही .तो शरीराविषयी उदास असतो ,फळाच्या उपभोग विषयी निरिच्छ असतो ,तो नेहमीच आनंदरूप होऊन राहिलेला असतो ,तो संतोषाच्या गाभार्यात जेवत असताना आत्म्बोधाच्या  पक्वान्नाला  पुरे म्हणत नाही .
 इच्छारहित ,चित्त आणि शरीर -इंद्रिये संधान यांचे पूर्ण नियमन केलेला ,सर्व उपाधीचा त्याग केलेला ,तो शारीरिक कर्म करत असताना देखील कर्मफळ त्यास बाधत  नाही .अहंकार आणि आशा  यांचा त्याने सर्वथा त्याग करूनपरम आनंदात  केवळ रुची ठेवली असते ज्यावेळी जे मिळेल त्यात तो संतुष्ट असतो .त्याला आपले आणि परके नसतात ,हे विश्वच  त्याला आपल्याहून  वेगळे भासत नाही .तो देहधारी असला तरी निर्गुणचैतन्न्या सारखा दिसतो .त्याने केलेली यज्ञादिक कर्मे त्याच्याच ठिकाणी लय  पावतात ,म्हणून कर्म ब्रम्ह आहे असे साम्य त्याच्या प्रतीतीला आल्याने त्याने कर्तव्य कर्म केले तरी ते नैष्कर्म्य  होय .
श्री ज्ञानेश्वरांचे स्वतःचे परिपूर्ण आयुष्य म्हणजे कृतार्थ पुरुषाचे मूर्तिमंत उदाहरण होय .
ते सर्व सजीव आणि निर्जीवांमध्ये स्वतःला पाहत होते याची प्रचीती त्यांनी रेड्यामुखी वेद वदवून आणि भिंत चालवून दिली .
श्री ज्ञानदेवांच्या सदेह असण्याच्या काळात समाजाने त्यांना नाना प्रकारच्या अवहेलनाना सामोरे जावयास लावले -परंतु ते आत्मज्ञानाने सदैव आनंदरूप असल्याने या सर्व संकटांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकला नाही .त्यांनी समाजाच्या भल्यासाठी जे ग्रंथ लेखन केले ते करताना सुरवात व शेवट याविषयी कोणतेही संकल्प केले नाहीत ,तरीही पूर्ण आत्मविश्वासाने हे ग्रंथलेखन पूर्ण केले ,कारण ते कर्माच्या बंधनात अडकले नव्हते .
लहान वयातही त्यांच्या  लेखनात लौकिक जगातील सर्व अनुभव ,मानवी भावनांचे कल्लोळ ,वेगवेगळ्या भौगोलिक जागांचे संदर्भ हे सर्व येताना बघितल्यावर पटते की त्यांनी काही न करता सर्व केल्याप्रमाणे आणि कशाचाही उपभोग न घेता ते भोगल्याप्रमाणे आहेत .
आपल्या सर्व लेखनाचे श्रेय ते वारंवार आपले गुरु आणि श्रोते तसेच संतकृपा यांना देतात ,तेंव्हा त्यांनी आपण आणि हे विश्व यातील भेद नष्ट केला आहे ,ते विश्व रूप झाले आहेत हे पटते
स्वतःचे वैयक्तिक मानवी आयुष्य जगताना कोणत्याही मानवी लौकिक गोष्टींची आस नसताना केवळ समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जो ग्रंथ यज्ञ आरंभिला आणि ज्ञान हे समाजाभिमुख करण्याची तळमळ  दाखविली ,हे त्यांच्या निष्काम कर्म वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण होय .

No comments:

Post a Comment