Saturday, July 28, 2012

bhagvantache vishrantisthan

ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचा निर्देश ज्ञानेश्वरांनी "भगवंताचे विश्रांतिस्थान "असा केला आहे .
तो हा अकरावा अध्यायो ।जो देवाचा आपणपे विसंवता ठावो ।13
जे विश्वरूप नारद इत्यादी अनेकांनी वर्णन केले ,पण पाहिले कोणीच नाही ,ते फक्त भगवंताच्या द्वारेच पाहता येईल हे अर्जुनाला उमगले व म्हणून त्याने हे विश्वरूप दर्शन घडवण्याची भगवंताना प्रार्थना केली .अर्जुन हा भगवंताचा अनोन्य भक्त असल्याने आपले चतुर्भुज रूप सोडून विश्वरूप प्रकट करण्यास भगवंतांनी जराही विलंब लावला नाही .हा विश्वरूप दर्शन सोहोळा मराठीतून वर्णन करण्याने सर्वास  त्याचा आनंद उपभोगता आला .येथे शांत रसाच्या  घरी अदभूत रस पाहुणा आला आहे व इतरही सारे रस वर्हाडी बनून आले आहेत .
तीर्थस्थानी भगवंताचा निवास असतो ,आणि अकरावा अध्याय हा प्रयाग तीर्थच बनला आहे कारण तेथे शांत व अद्भुत हे दोन रस गंगा व यमुना बनून त्यांचा मिलाप होतो, तसेच गीता ही या संगमात गुप्त सरस्वती आहे .म्हणून हा त्रिवेणी संगम सर्वाना प्राप्त झाला आहे .श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि मला कारण करून करून माझे गुरु निवृत्तीनाथ यांनीश्रवणाच्या  द्वाराने या तीर्थात प्रवेश करणे सर्वाना सोपे केले आहे ,म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक बुद्धीने स्नान करून जसे प्रयागतीर्थी माधवाचे दर्शन घेतात तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे व संसाराला तिलांजली द्यावी .
पुठे ते म्हणतात कि ह्या अध्यायात मोक्ष स्पष्ट झाला आहे .हा अध्याय देवांचे खास विश्रांतीचे स्थान आहे व अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे ,कारण तो येथे येऊन पोहोचला आहे .
जनसामान्यासाठी प्रयाग तीर्थात बुडण्याची भीती असते ,ती येथे नाही ,म्हणून सर्वांनी येथे भगवंताचे दर्शन घेण्याने संसाराचे बंध तुटतील हे ज्ञानेश्वरांचे आश्वासन सर्वांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते .

No comments:

Post a Comment