Monday, July 30, 2012

vishwrupdarshan

विश्वरूपदर्शन हा अकराव्या अध्यायाचा गाभा आहे .श्रीकृष्णाने धारण केलेल्या विविध व्यापक रूपांच्या वर्णनात ज्ञानदेवांच्या प्रतिभेच्या अलौकिकतेचा व उत्तुंगतेचा प्रत्यय येतो .मुळात हे एक भव्य प्रसंग चित्र  आहे ,आणि त्याची विशालता ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने चैतन्यमय केली आहे .हा अनुभव शब्दात पकडणे ज्ञानदेवांना शक्य झाले कारण तेही या अनुभवाचा जणू एक भागच बनून गेले होते .त्यांच्याच अनुभवाची अनुभूती ते वाचकाला शब्दातून देत आहेत असे जाणवते व तो अनुभव हृदयस्पर्शी बनतो .
विश्वृपातून कितीतरी प्रकारच्या ,आकाराच्या ,वृत्तीच्या आकृती प्रकट होत होत्या .कृश ,स्थूल ,ठेंगणी ,उंच ,शांत ,मदांध ,निर्विकार ,आनंदित ,जागृत ,निद्रित अशी विविधता त्यात होती .त्यातही काही मुखे लालनपालन करणारी ,तर काही संहारक ,काही रौद्र तर काही प्रेमळ ,काही धुंद तर काही क्रुध्द ,त्यांच्या रंगातही विविधता -कुणी तप्त सुवर्णाप्रमाणे ,कुणी पिंगट ,कुणी शेंदूरवर्णी   ,कोणी कुंकुम वर्णाचे  ,कोणी तप्त ताम्ब्यासारखे ,काही स्फटिकासारखे स्वच्छह ,काही इंद्रनील वर्णाचे तर काही काळेभोर .
विश्व रूपाच्या प्रचंड मुखावर आदित्य वसू  ,अश्विनकुमार ,रुद्र व वायू हे अमर्याद स्वरुपात स्थित दिसत होते .या विश्व्मुर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी अनेक सृष्ट्या दिसत होत्या .व अनेक ब्रम्हांडे वर खाली भ्रमण करताना दिसत होती .या विश्व रुपात पृथ्वीचा आकार नाहीसा झाला ,आकाश ,सारे स्थावर पदार्थ ,व महाभूते त्याने गिळून टाकली .
 दिव्य्माल्यामबरधरम दिव्य गन्धनुलेपन्म ।

सर्वाश्चर्यमयं देवं अनंतम विश्वतोमुखम ।
दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेला ,दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती ,सर्व आश्चर्यानी युक्त ,अनंत ,सर्वतोमुख ,दिव्य स्वरूप असलेला देव अर्जुनाने पहिला .
ह्या विश्व रूपाचे दर्शन घेताना अर्जुनाचे मन बुद्धी ,व इंद्रिये शांत ,स्तब्ध व एकाग्र झाली .जणू त्याच्या ज्ञानाला मोहिनीअस्त्र घातले .त्याच्या चारी बाजूनी हे विश्व रूपच अनेक रूपे होऊन सर्व अवकाश व्यापून राहिले .त्या रुपाची प्रभा हि  प्रलयकालच्या महातेजाची प्रभा होती .त्याच्या हातातील शस्त्रे हि  प्रलयकालच्या अग्नी ज्वालानाही तोडणारी होती ..या मूर्तीच्या शृंगारातील वस्त्रे ,पुष्पे ,गंध यांची शोभा पाहताना अर्जुन भांबावला व डोळे उघडे असताना बाहेर व मिटले असताना अंतर्यामी सर्वत्र त्याला विश्व रूपच दिसू लागले .अशारितीने अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे सर्व भगवंतानी व्यापून टाकले .त्या विश्वरूपसागरात  आपले सर्व जग त्याला बुडबुड्याप्रमाणे दिसले ,व याच्या तेजाला हजारो दिव्य सूर्याच्या तेजाची उपमाही पुरणार नाही असे त्याला वाटले .या तुझ्या रुपात तुझा आरंभ ,मध्य व शेवट कोठे आहेत असे शोधू गेले असता कळते कि हे तिन्ही तुझ्या ठीकाणी नाहीत .
विश्व रूप दर्शनाच्या ज्ञानेश्वरांच्या शब्दातील वर्णनाने जे उग्र व संहारक दर्शन घडते त्याने भयभीत झालेली सारी सृष्टी जणू दुखःकालिंदीच्या तटावरील झाड होऊन स्तब्ध उभी राहिली होती .

No comments:

Post a Comment