Friday, July 27, 2012

bhaktimaarg

भक्तीमार्गातील ईश्वरज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा भगवंतानी गीतेच्या दुसर्या व तिसर्या अध्यायात वर्णन केला आहे ,तो आहे ज्ञान प्राप्तीचा .भगवंत मानतात कि देव आणि महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. जो मला जन्म रहित ,अनादि ,व लोकमहेश्वर असे जाणतो तो मानवामध्ये ज्ञानी आहे .व तो सर्व पापापासून मुक्त होतो .यापुढील टप्पा आहे हे ईश्वराचे व्यापकपण समजून व सर्व काल माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन ते मला भजतात .
कां जे ऐसे किरीटी ।माते भजे  जो अभेदा  दिठी ।तयाचिये  भजनाचीये नाटी ।सूती मज ।109 अध्याय 10
कारण कि अर्जुना अशा अभेद भक्तीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे .
या  भक्तीयोगाचे  निशंक मनाने  आचरण करावे.
जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तियोगु निश्चित ।जाण माझा ।
जो जो प्राणी दिसेल तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजणे हाच माझा भक्तियोग आहे असे भगवंत निश्चयाने सांगतात .
याच्याही पुढील पायरी आहे कि हे भक्त माझेच स्वरूप बनतात ,या अनुभवाने तृप्त होतात ,त्याच्या भूलीमुळे जन्म मरण विसरतात .त्यांच्यातील ब्रम्हानंद ते तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात व सांगताना मिळणार्या  आनंदाने अंगाने व जीवाने विरतात
जैसी कमळ कलिका जालेपणे ।हृदयाचिया मकरंदाते  राखो नेणे ।दे राया रंका पारणे ।आमोदाचे ।127अध्याय 10
ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी  आपल्या आत असलेल्या  सुवासास दाबून ठेवू शकत नाही ,,त्याप्रमाणे हे भक्त राजा रंक सर्वास आनंद वाटतात व दिवस, रात्र ,शरीर ,मन याचे भान विसरतात .
समिपता या नंतरची पायरी आहे की अशा भक्तांना भगवंतच अशी बुद्धी देतात कि जिच्या योगाने ते भगवंताच्या समीप येतील .या भक्तांच्या वाटचालीत भगवंतच कापराची मशाल धरणारा मशालजी होऊन पुढे चालतात अशा प्रेमळ भक्तांची भगवंताच्या घरीही कमतरता असते ,म्हणून ते आपले प्रेमसुख यांच्याकरता जतन करून ठेवतात .यांच्या अंतकरणात राहतात .
हे वर्णन केलेले सारे टप्पे ओलांडण्यास अर्जुन समर्थ आहे अशी स्वतः भगवंताची धारणा आहे .

No comments:

Post a Comment