Tuesday, July 24, 2012

gurugaurav2


अनेक अध्यायात ज्ञानदेव आपले अध्यात्मिक गुरु निवृत्तीनाथ यांना नमन करून निरुपणाला प्रारंभ करतात याचे कारण असे कि ते आपल्या गुरुना परमात्म स्वरूपाचे प्रतिक मानतात .गुरुसाठी त्यांनी सूर्य, गणपती ,माता इत्यादी रूपके योजिली आहेत. श्रीगुरुंच्या अध्यात्मिक स्वरूपाबद्दल ते म्हणतात
नमो सुभावभजनभाजना  ।भावेभकुमभ भंजना ।विश्वोद्भवभुवना ।श्रीगुरुराया ।
शुध्द भावाने भजन करण्यास योग्य ,संसार रुपी हत्तीच्या गन्द्स्थालाचा नाश करणारे ,व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे ,गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो .
गुरूच्या सामर्थ्याबद्दल ते म्हणतात
तुमचा अनुग्रहो गणेशु ।जै दे आपुला सौरसु । तै सारस्वती प्रवेशु ।बाळकाही अथी ।
तुमची कृपा हाच  गणेश ,तो जेंव्हा आपले सामर्थ्य देतो ,तेंव्हा सर्व विद्ध्यामध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो .
गुरूची महानता वर्णन करण्यास साधन नाही हे सांगताना ते म्हणतात
केउता कल्पतरुवरी फुलोरा ।कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ।ऐसा कवणे वासी कापुरा ।सुवासू  देवो ।
कल्पतरूचे फल मिळण्यास फुलोरा कशाला पाहिजे ?क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा?कोणत्या वासाने कापुराला सुगंधित करावे ?याप्रमाणे गुरुचे वर्णन करण्यास योग्य साधनच  नाही .
शुध्द अपरोक्ष ज्ञानाने सुसंपन्न ,विद्या कमलिनीला विकसित करणारे ,परा वाणीचे अधिष्ठान असलेल्या मूळ मायेशी विलास करणारे ,संसार अंधाराला नाहीसा करणारे प्रतिसूर्य अशा गुरुना  नमन असो .
अखिल जगाचे रक्षण करणाऱ्या ,चिंतामणिप्रमाणे आपल्या शक्तीने जगाचे मंगल साधणार्या व वनातील चंदनाप्रमाणे सर्व आप्तांना आपल्यासारखे बनवणार्या अशा सर्व जगताला आराधना करण्यास योग्य अशा श्रीगुरुना नमन असो .चकोराला जसे चंद्र ,तसे चतुर पुरुषाला आल्हाद देणार्या ,अत्मानुभावाचे राजपद भोगणार्या ,वेदातील गुणाचा सागर असणार्या ,शुध्द भाव हेच ज्यांचे भजन अशा श्रीगुरुना वंदन असो .
आपली उदार वाणी जेंव्हा :भिऊ नकोस :असे आश्वासन देते तेंव्हा नवरस रुपी दिवे प्रज्वलित होतात .आपले प्रेम हीच कोणी सरस्वती ,तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करतो .एवढ्या सर्व गोष्टी ज्यांच्या सामर्थ्याने होतात त्यांच्या वर्णनासाठी मी काय विशेषण वापरू ?म्हणून मी निमुटपणे त्यांना नमस्कार करतो हेच ठीक .
या शब्दरूपी अरण्यात हिंडताना वाचारूपी वृक्षास विचाररूपी फळे आलेली दिसत नाहीत ,तेथे गुरुकृपेने माझी वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली .माझ्या  बुद्धीला देह्तादात्म्यापासून सोडवून तिची आनंदरूपी खजिन्याची खोळी केली व मग माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसागरात महाविष्णू झाले .श्री गुरूंच्या या अनंत लीलांचे वर्णन मी कसे करू ?
आपल्या रसाळ वाणीने गुरु हे साक्षात ईश्वररूप आहेत हा भाव श्री ज्ञानेश्वर विविध अंगाने फुलवतात व श्रोत्यांना गुरुशिष्य नात्याच्या मनोहारी रूपाचे दर्शन घडवतात .

No comments:

Post a Comment