Saturday, July 21, 2012

sarvshreshth bhaktimarg

भक्तिमार्ग ,योगमार्ग आणि ज्ञानमार्ग हे परमेश्वर प्राप्तीचे मुख्य मार्ग होत .
योगमार्ग अवलंबणारे साधक पाच प्राणाबाहेर यम नियमांचे कुंपण घालून त्यावर प्राणायामरुपी तोफा ठेवतात व  जीवन कलेचा मार्ग धरून ,इंद्रियांना आत बांधून आणून संकल्प नाहीसे करतात व ध्यान आणि समाधीचे मार्गाने स्वरूप ऐक्यापर्यंत पोहोचतात .पण हा  मार्ग फार कष्ट दायक ,आचरणास कठीण आहे ,म्हणून सर्वांसाठी योग्य नाही .
इये प्रकृती पुरुषे दोन्ही ।उपजली जायच्या अमन मनी ।तो पितामह त्रिभुवनी ।विश्वाचा मी ।272
ज्ञान मार्गाबद्दल  बोलताना भगवंत म्हणतात कि जीव हा ज्ञान मार्गाने गेल्यावर ईश्वराच्या भिन्न पणाचे फोलपण जाणवून तो भेद नाहीसा करतो -त्याचे मनात ज्ञानरूपी अग्नी सदैव प्रज्वलित असल्याने तो सुखदुखाविषयी चित्त्ताची समता मिळवतो.तो ब्रम्ह विचाराचा महामंत्र जप करतो व आत्म बुद्धीने  स्वतः,पंचमहाभूते विषय व इंद्रिये ही सगळी एकच आहेत हे जाणतो व मग"मी जीव "ही त्याची कल्पना नाहीशी होऊन तो सर्व जगत ब्रम्हरूपच  आहे या ज्ञानाने परिपूर्ण होतो .हा मार्ग उत्तम असला  तरी प्रत्येक जीव या मार्गाने जाण्यास योग्य नसतो ,म्हणून तो सामान्य जनांसाठी अवघड ठरतो .
भक्तिमार्गाने जाणार्या भक्ताचे वर्णन करताना भगवंत त्याला शान्तिरुपी वेलीला फुटलेल्या कोवळ्या पानाची उपमा देतात .त्याच्या सहज  कर्मा चरणात नीती जगलेली दिसते .त्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झाली असते कि ते मोक्षाला 'पलीकडे हो 'म्हणतात
जया भक्तीची येतुली प्राप्ती ।जे कैवल्याते परौते सर म्हणती ।जयाचिये लीलेमाजी नीती ।जीयाली दिसे ।292
भक्त  हे स्वतः उपासक व देव एक उपास्य असा भेद नाही हे जाणून मीच होऊन माझी सेवा करतात .माझ्या नाम घोषाने ते विश्वाची दुखे :नाहीशी करतात व सर्व जग ब्रम्हानंदाने कोंडून भरतात. ते राजा रंक ,लहान मोठा असा भेद न करता जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात ,म्हणून माझे नामच त्यांचे वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असते ,म्हणून एक वेळ मी वैकुंठात नसतो ,योग्यांच्या हृदयातही नसेन ,पण माझे भक्त जेथे माझा नाम घोष करतात तेथे मी नक्की सापडेन .
श्रेष्ठ प्रतीच्या भक्ताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात कि वस्त्रात जसे अखंड सुतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात ते मलाच ओळखतात . कोणताही भेद न करता ते प्रत्येकास परमात्मा समजून लोटांगण घालतात .ते नेहमी निराभिमान असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते ,म्हणून ते सहजगत्या माझ्या रुपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात .
अशारितीने आपल्या कायिक ,वाचिक ,मानसिक या सर्व कर्माने ते माझे भजन करतात , त्याना मरण येण्यापुर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी ऐक्य होते , ते मग मरणानंतर इतर गतीस कसे जातील ?अशारितीने जिवंत पणीच मोक्ष प्राप्त करून देणारा भक्तिमार्ग हा इतर दोन मार्गापेक्षा श्रेष्ठ ठरतो हे सत्य होय .

No comments:

Post a Comment