Friday, August 31, 2012

panchampurushaarth-bhaktiyog

मानवी जीवनात चार पुरुषार्थ मानले आहेत -धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष .-मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ .मोक्षाप्रत जाण्यासाठी गीतेने कर्म ,ज्ञान ,योग हे मार्ग सांगितले आहेत ,पण या सर्वाना श्रीज्ञानेश्वरांनी साथ अवश्य मानली ती भक्तीची .या प्रत्येक मार्गावर भक्तीची भावना साथीला असल्यासच मोक्ष मिळतो हे त्यांनी प्रत्येक कांडात सांगितले .वेदांताने न सांगितलेले हे रहस्य ज्ञानेश्वरांनी प्रकट केले .भक्तीला त्यांनी पंचमपुरुषार्थ  संबोधून चारही पुरुषार्थापेक्षा उच्च जागी प्रतिष्ठित केले।चहूपुरुषार्थाशिरी भक्ती जैसी ।
आर्त .जिज्ञासू ,अर्थार्थी व ज्ञानी हे भक्ताचे चार प्रकार .शारीरिक व मानसिक व्याधीपासून सुटका मागणारा तो आर्त ,सर्व जाणून घेण्यापर्यंतच मनाची मजल असणारा तो जिज्ञासू ,अर्थ व सर्वच लौकिक गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा धरणारा तो अर्थार्थी ,हे तिन्ही काम्य आहेत ,-मनात कामना धरून देवाकडे जाणारे आहेत ,ज्ञानी हा ईश्वर प्राप्तीचा बोध मनात जागा व्हावा ,अनुभूती मिळावी असा मुमुक्षु असतो ,हा खरा भक्त .
मग चौथियेचे ठायी ।काहींची करणे नाही ।म्हणोनी भक्तु एक पाही ।ज्ञानिया जो ।
हा मुमुक्षु प्रत्यक्ष भगवंताचेच रूप होऊन राहतो ,पण शिवाय भक्त म्हणून उरतो .सृष्टीच्या व्यवहारात त्याचे काही मागणे नसते .जन्म जन्मांतरीच्या भक्तीनेच हि अवस्था प्राप्त होते .गुरुकृपेने याचे मन आणि बुद्धी पूर्ण साम्यावस्थेत जाते .हे जग व तो यात भेद उरत नाही .सारे जगच भगवंतमय  होते . असा निष्काम भावनेने ज्ञानोत्तर स्थितीत समाजासाठी कर्म करणारा भक्त हा पंचम पुरुषार्थी होय .त्याही कार्य करणे उरले ।लोकालागी
 अविध्येचा नाश करणाऱ्या ज्ञानाच्या साधनेने मोक्ष प्राप्त होतो ,पण बरोबर भक्तिभावाची पूर्तता झाल्यावरच भगवंताचे दर्शन होते ,व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही भगवंताचीच रूपे ,भक्तीने व्यक्तरुपाची प्राप्ती होते ,तर योगाने अव्यक्ताची .पण भक्तिमार्गात योगासारखे दुखदायक कष्ट नाहीत ,उलट या मार्गात साधकाचे रक्षण करण्यास मी सदैव तयार  असतो ,अशा भक्तांच्या योग्क्षेमाचा भार  मी वाहतो ,संसार सागरातून त्यांना लीलया पार करतो ,नामस्मरणाचा मार्ग दाखवून त्यांचा उध्दार करतो असे भगवंत म्हणतात .
माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेन्द्रीयासाहित मनाची मोहोर लाऊन जे भक्त जिवाभावाने मला रात्रंदिन भजतात  त्यांना मी श्रेष्ठ मानतो .निश्चय करणारी बुद्धी आणि संकल्पविकास करणारे मन ही दोन्ही माझ्या प्रेमाने भरून जाणे  याचे नाव भक्ती .असे झाले म्हणजे देहाभिमानी वृत्ती देहास सोडून हळूहळू माझ्याकडे येते , मनाला हि भक्तीची गोडी लावण्याकरिता पुनःपुन्हा तीच गोष्ट करावी लागते ,याला अभ्यास म्हणतात .ज्यांना अभ्यास शक्य नाही त्यांनी आपली नित्यकर्मे निष्काम वृत्तीने फल ईश्वरार्पण करून केली तर भक्ती साध्य होते .अशा रीतीने कर्मफलत्याग ,अभ्यास ,ज्ञान, ध्यान या पायर्यांनी चढत जाऊन माझी पूर्णब्रम्हस्थिती साधकाला प्राप्त होते हाच भक्तिरूप पंचम पुरुषार्थ होय .
तरीझडझडोनी  वाटेला निघ । इये भक्तीचीये वाटे लाग ।जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।
ईश्वराच्या ठायी असलेली अनन्यता म्हणजे भक्ती
हे विश्वची माझे घर ।ऐसी मती ज्याची स्थिर ।किंबहुना चराचर ।आपण झाला ।
मग यावरी पार्थ ।माझ्या भजनी आस्था ।तरी तयांते मी माथा ।मुकुट करी  ।
ज्ञानाने विश्वात्मक अनुभव घेतल्यावरही भक्तिमार्गाने चालणाराला भगवंत आपल्या माथी मुकुटासारखे धारण करतात .भगवंत आणि भक्त मिळून भक्तीसौंदर्याचे  एकरूप चित्र उभे करतात .असा भक्तियोग आचरणारे ज्ञानेश्वर हे भगवंताचे लाडके होत यात नवल काय ?

No comments:

Post a Comment