Tuesday, September 4, 2012

dnyaneshwari lekhanhetu

गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञान प्रधान शास्त्र आहे ,पण सर्व जीव तर अज्ञानाने बांधलेले आहेत .तेंव्हा अशा अज्ञानी जीवाना मोक्ष पद मिळण्याची योग्यता मिळवण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला आहे .जो खरा ज्ञानी पुरुष आहे तो निष्काम कर्मयोगीच  असतो ,कारण शरीर धारण करीत आहोत तो पर्यंत कर्मत्याग शक्य नाही .जेंव्हा निष्काम कर्मयोगी अंतकरण स्थिर करून इंद्रियांचे व्यापार सुरु ठेवतो तेंव्हा त्याचे कर्म हे संकल्प विरहीत व फलाशा त्यागून केलेले असते ,म्हणून तो खरा कर्मापासून मुक्तच असतो ,त्याला कर्मबंध न लागता मोक्षापर्यंत जाता येते .हा जीवनक्रमच एक नित्य यज्ञ आहे .अज्ञानी पुरुषांना कर्म कसे करावे याचा आदर्श या कर्मयोग्यांच्या जीवनाकडे बघून मिळतो ,म्हणून ज्ञानी पुरुषाने कर्म अवश्य करावीत .
मार्गाधारे वर्तावे ।विश्व हे मोहारे लावावे ।अलौकिक नोहावे ।लोकप्रति ।अ ३ -१८१
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो . ते अर्जुनास उपदेश करतात कि लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे ,शास्त्राने  सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे ,लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये .
श्री ज्ञानेश्वर हे स्वतः जीवन्मुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या उपदेशात दिसते .वैदिक धर्माने ब्रम्हज्ञान हे संस्कृत भाषेत व अधिकाराच्या कक्षेत बांधून ठेवले .त्यामुळे समाजातील मोठा वर्ग हा ज्ञानापासून व मुक्तीच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन मिळण्यापासून वंचित राहिला .ह्या वंचित समाजाला ज्ञानाच्या ,भक्तीच्या कक्षेतआणणे हा ज्ञानेश्वरांनी आपला जीवनधर्म मानला आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राकृत भाषेतील ग्रंथ रचना करण्याचा संकल्प केला .
तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न देता ।एथ मोक्षु असे आयता ।श्रवणाची माजी ।अ ४ -२२३
आपल्या कथेबद्दल ते म्हणतात कि येथे मनाला न मारता ,इंद्रियांना दुखः न देता आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे .आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात कि माझी शब्दरूपी ताटे ,त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने ,ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे .आपले बोल हे केवळ शब्द नसून संसार जिंकणारे शास्त्र आहेत ,ही आत्म्या पर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत असे ते सांगतात म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हे त्यांचे उद्दिष्ट होते .
श्रीगुरुना ज्ञानेश्वर विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रम्ह सुखाचेच देणेघेणे होऊ दे आपली प्रतिज्ञा सांगताना ते म्हणतात कि वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू ,सार्या जगाला आनंदाचा कोट करू .हे गुरु ,परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो .सर्व जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ,सर्व जग आनंदानं भरून टाकण्याची इच्छा करणे यात श्रीज्ञानेश्वरांचे  वेगळेपण आहे आजवर वैयक्तिक मार्गदर्शन केले गेले होते ,पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे ,या मोक्ष मार्गावर भक्तीचा सोपा घाट  कसा बांधावा ,संसारात राहूनही स्वताबरोबर जगाचा उध्दार कसा करावा हे सांगणारी भागवत धर्माची गुढी उभी केली श्री ज्ञानेश्वरांनी ,त्यांना शतशत प्रणाम 

No comments:

Post a Comment