Monday, September 10, 2012

MANASPUJA

सर्व उपासनेत मानस पूजेला महत्व आहे .मनाने मनापासून सार्या उदात्त कल्पनेने केलेली पूजा ती मानसपूजा ..समर्थ म्हणतात कि काही कारणाने नैमित्तिक पूजा घडली नाही तर मानसपूजा करावी।
मानसपूजेचे ठायी वाणी नाही उपचारा ।तेथे मनच होय माझी मूर्ती ।मनोमय उपचार संपत्ती ।निर्लोभे भजने अर्पिती ।तेथे मी श्रीपती संतुष्ट ।
म्हणजे  मानस पूजेत उपचारांना तोटा नाही .मन जेवढे मोठे ,तेवढी मानस पूजाही मोठी करता येते .
जे जे आपणासी ठावे ।ते ते कल्पून वाहिजे ।येणेप्रकारे कीजे ।मानसपूजा ।
श्री गुरूंची मानसपूजा कशी करावी याचा वस्तुपाठ  ज्ञानेश्वर १५ व्या अध्यायाच्या १ ते २८ या ओव्यातून घालून देतात .या मानस पुजेची सुरवात ते शुध्द अन्त्करणाच्या चौरंगावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करून करतात .मग श्रीगुरू व आपण स्वतः यांच्या ऐक्य रुपी ओंजळीत सर्व इंद्रिय रुपी कमळ कळ्या भरून त्याचे अर्घ्य श्रीगुरुच्या चरणी देतात ,त्यानंतर एकनिष्ठा रूप स्वच्छह पाण्याने स्नान घालून श्रीगुरुविषयी असलेल्या वासनेचे गंधाचे बोट लावू ,गुरुविषयीचे प्रेमरूप सोने शुध्द करून त्याचे वाळे  गुरूच्या पायी घालू ,अनन्यतेने शुध्द झालेल्या प्रेमाची जोडवी त्यांच्या  पायाच्या अंगठ्यात घालू .आनंद रुपी सुवासाने भरलेले अष्टसात्विक भावाचे आठ पाकळयाचे कमळ त्यांच्या पायी वाहू ,अहं वृत्तीचा धूप जाळू ,,मी या देहाधीकातील कोणी नाही हि जी निराभिमान वृत्ती ,त्या तेजाने गुरूस ओवाळू ,माझे शरीर व प्राण या दोन खडावा करून श्रीगुरुंच्या पायात घालू व भोग व मोक्ष हे त्या चरणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .
या पूजेने काय होईल कि आमच्या दैवी चारी पुरुषार्थ साध्य होतील ,ज्ञान उत्कर्ष पावेल ,या दैवाचे योगाने आमचे वक्तृत्व ज्ञानाचा सागर होईल ,या व्याख्यानापुढे नादब्रम्ह ठेंगणे होईल ,जे ज्ञानाला कळत  नाही  व ध्यानाला सापडत नाही ते ब्रम्ह माझ्या बोलण्यात सापडेल असे भाग्य माझ्या वाचेला गुरुकृपेने लाभेल असे श्री ज्ञानदेव म्हणतात .

No comments:

Post a Comment