Saturday, November 24, 2012

chidsury nivruttinath

पंधराव्या अध्यायाच्या शेवटी पुरषोत्तम रूपाचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञान कांडाचा भाग संपला .आता सोळाव्या अध्यायात ज्ञानोत्तर प्रेममय भक्तीकडे ज्ञानेश्वरी जाते ,म्हणून त्याची सुरवात होते गुरु शिष्यातील प्रेमाच्या वर्णनाने .आता गुरु शिष्यां दोही ।स्नेहो लाहला ।४६
आपल्या गुरुचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर चित सूर्याचे रूपक वापरतात .ते गुरूंच्या अलौकिक अध्यात्मिक सामर्थ्याचे लौकिक सूर्याच्या सामर्थ्याशी तुलना करून वर्णन करतात .ते म्हणतात 
विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा आणि अद्वैत स्थितीरूपी कमळाचा विकास करणारा हा गुरु निवृत्तीनाथ रुपी सूर्य उगवला आहे .हा आश्चर्य कारक आहे कारण लौकिक सूर्य जगताचे प्रकाशन करून द्वैत वाढवतो ,तर हा जगदाभास नाहीसा करून अद्वैत स्थितीचा विकास करतो .हा सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञान रुपी चांदण्याही नाहीशा करतो व ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या निरभ्र दिवसाची प्राप्ती करून देतो .
जेणे निवळ लिये सवळे ।लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।सांडिती देहाहंतेची अविठावे ।जीवपक्षी ।
त्याच्या उदयाने जीवनरूपी पक्षीआत्मज्ञान रुपी दृष्टी प्राप्त होऊन "मी देह आहे "या समजुतीचे घरही सोडतात .
लिंगदेह रुपी कमळातील जीव चैतन्य रुपी भ्रमराची सुटका होते .भेदरूपी नदीच्या काठावर शास्त्रांच्या विसंगत पणामुळे अडचणीत सापडलेले बुद्धी व बोध हे दोन  चक्रवाक पक्षी ,त्यांना श्रीगुरुरुपी सूर्य ऐक्याचा आनंद मिळवून देतो .या गुरूच्या प्रकाशात भेदाची चोरवाट नाहीशी होते आणि आत्मप्राप्तीसाठी प्रवास करणारे साधक आत्मनुभावाच्या वाटेने निघतात .याच्या विवेकरुपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सुर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या संसाराची जंगले जाळून टाकतात .
शिष्याच्या अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर हा ज्ञानसूर्य आला असताना त्याची स्वरुप्भ्रांती ही पडछाया त्याच्या आत्मानुभव रुपी पायाखाली नाहीशी होते .
मायारूपी रात्रीचा नाश झाल्याने त्यातील विश्वाभास रुपी स्वप्नाचा नाश होतो व अद्वैतज्ञान रुपी नगरात ब्राम्हनान्दाची रेलचेल होते ,मुक्त कैवल्य रुपी दिवस सदा प्राप्त होतो .
हा ज्ञानसूर्य नेहमीच उगवलेला आहे ,तो न दिसणे हे अज्ञान हे दिसणे या ज्ञानासह नाहीसे करतो व या दोन्हींनी झाकलेले मूलस्वरूप सर्वत्र प्रकट करतो .
या श्रीगुरुरुपी ज्ञान्सुर्याचा महिमा वर्णन करताना स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा व स्तवन ही त्रिपुटी श्रीगुरुच्या स्वरुपात लयाला जाईल ,तरच ती गुरुना  शोभेशी स्तुती होईल असे श्री ज्ञानदेव म्हणतात .

No comments:

Post a Comment