Friday, December 14, 2012

krutarth arjun

अर्जूनाने  श्रीकृष्णास संन्यास व त्याग यातील भेद विचारला .खरे तर आत्म ज्ञानाविषयी आता  त्याचा दृढ निश्चय झाला होता ,पण देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना ,त्याच्या भगवंत विषयीच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आपल्याशी त्याने काही कारण नसतानाही बोलावे ,हा संवाद थांबला तर या आनंददायी अनुभवात खंड पडेल म्हणून त्याने त्याग व संन्यास यातील भेद विचारण्याचे निमित्त करून भगवंतास गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायला लावले .या संवादात भगवंत ही भावनेच्या भरात आले ,कारण त्यांचा स्वभाव आहे की भक्त ज्या भावनेने पाहिलं तसे तसे ते होत जातात .म्हणून अर्जुनाच्या पूर्ण स्वाधीन होऊन प्रेमभराने बोलत असताना  देव भानावर राहिले नाहीत व अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले .भक्त व भगवंत हा द्वैत भाव मोडून  सुखाचे एकरूप समोर उभे राहिले .या आनंदाच्या डोहात अर्जुन पूर्ण बुडू लागला तेंव्हा भगवंतानी त्याला भानावर आणले .
या विवेचनाचे शेवटी त्यांनी सांगितले कि सर्व अज्ञानाचा त्याग करून  अद्वैत भावाने मला शरण ये ,म्हणजे मी तुला मुक्ती देईन .मग श्रीकृष्णाने आपला उजवा बाहु पसरून शरण आलेल्या अर्जुनास आलिंगन दिले ,जे वाचेस व बुद्धीस प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनाला देण्याकरता देवांनी आलिङ्ग्नाचे निमित्त केले .व आपल्या हृदयातील बोध अर्जुनाच्या हृदयात घातला .व देव व भक्त हे द्वैत न मोडताही अर्जुनास आपल्यासारखे केले .मग अर्जुनास जो सुखाचा पूर आला त्यात सर्व शक्तिमान देवही बुडू लागले ,समुद्राच्या भरती प्रमाणे नारायणाने हे विश्व कोंडून भरले .
अर्जुन हा या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल ,पण त्याचे जीवित कार्य शिल्लक  असल्याने भगवंत त्याला देह मर्यादा ओलांडू देईनात  .त्यामुळे भगवंतानी तुझा मोह पूर्ण नष्ट झाला का ?असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन मी ब्रम्ह या स्थितीतून मी अर्जुन या स्थितीत आला .मग थरथर कापणार्या हाताने सर्वांगावरील रोमांच दाबून ,प्राण क्षोभाने डोलणाऱ्या अंगाला आपल्याच आधारे स्तब्ध करून ,उभा राहिला .त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते ,नाना प्रकारच्या उत्कंठेने कंठ दाटला होता ,म्हणून वाचा विस्कळीत झाली होती ,प्राणपणाने श्वासो च्श्वास नियमित करून तो भगवंतास म्हणाला ,
नष्टो मोहः स्मृतीलब्धा त्वत्प्रसादन मयाच्युत ।स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनन तव ।७३
तुझ्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला ,मला आपल्या खर्या स्वरूपाचे ज्ञान झाले ,मी संशय रहित झालो ,आता तुझी जी आज्ञा  असेल ती पाळीन .

Thursday, December 6, 2012

om tat sat

भगवंत अर्जुनाला सांगतात कि सात्विक कर्म केल्याने मोक्षाच्या गावात प्रवेश होतो हे खरे आहे ,पण' ओम तत सत 'या ब्रम्ह नामाच्या निर्देशाने भक्ताला भगवंताशी एकरूप होता येते .
ओम तत सत हा तीन प्रकारे ब्रम्हाच्या नावाचा निर्देश श्रुतीने सांगितला आहे .या नामाच्या योगानेच पूर्वी प्रजापतीने ब्राम्हण ,वेद व यज्ञ निर्माण केले .
परब्रम्ह हे नाम रूप रंग रहित आहे ,मग अविध्येच्या अंधारात सापडलेल्या जनांनी ब्रम्हास ओळखावे म्हणून श्रुतींनी ही खुण  केली .जीव व ब्रम्हाचा अनादिकालापासुनचा अबोला फिटावा व ब्रम्ह जीवास अद्वैतपणे भेटावे म्हणूनवेद रुपी  बापाने हा नाम मंत्र शोधून काढला .या एका नावाने ब्रम्हास हाक मारली असता ते अदृश्य असूनही गोचर होते .
तरि अनादी परब्रम्ह ।जे  जगदादी विश्रामधाम ।त्याचे एक नाम ।त्रिधा असे ।२८ अ १७ 
वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थ रुपी शहरात जे परब्रम्हाच्या पंक्तीला आहेत ,त्यांनाच ते कळते .
तरी सर्व मंत्रांचा राजा ।तो प्रणवो आदिवर्णु बुझा ।आणि तत्कारु जो दुजा ।तिजा तत्कारु ।४२ अ १७
जेंव्हा सात्विक कर्म या नामाला मिळून चालते तेंव्हा ते मोक्षाला घरचा चाकर करते .
ज्याप्रमाणे तेल वात व अग्नी ही एकत्र आली असता दिवा लावण्याची युक्ती माहित नसेल तर प्रकाश पडणार नाही ,त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य कर्म योग्य मंत्रोपचारासाहित केले तरी त्याबरोबर या ब्रम्ह नामाचा विनियोग केल्यानेच ते कर्म ब्रम्ह फलास योग्य होते .
सात्विक पुरुष कर्मा चरणाची सुरवात ध्यानाने व वाचेने ओंकार सिद्ध करून करतात -मग अरण्यातील वाटाड्या प्रमाणे ओंकार या कर्माचा सोबती होतो व कर्म निर्विघ्न पार पडते .या क्रिया जेंव्हा फळामध्ये प्रवेश करू लागतात तेंव्हा ते पुरुष तत शब्दाने निर्देशित होणार्या ब्रम्हाला फलासाहित कर्म अर्पण करतात .आता हे ब्रम्हरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद राहतो ,म्हणून कर्ता  स्वतः ब्रम्हरूप होऊन पूर्ण होण्याकरता सत अक्षराचा उच्चार करतो. या सत शब्दाच्या उच्चाराने आणखी एक गोष्ट होते म्हणजे सत्कर्मे करताना काही दोष राहिला असेल तर तो नाहीसा होतो
या सत शब्दाने असत पदार्थ मात्राचा पूर्ण निरास होऊन ब्रम्हाचे निर्दोष रूप दाखवले जाते .
ज्याच्याकडून हे सर्व दृश्यमान जग प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत सत हा मन्त्रो च्चार नेतो ,म्हणून हे तीन अक्षरी नाम केवळ ब्रह्मच आहे .

























Monday, December 3, 2012

VACHIK TAP

तप म्हणजे काय ?तर आपले शारीरिक ,मानसिक अथवा बुद्धीचे बल वाढवण्यासाठी शरीरास झिजवणे .म्हणजे नको असलेली शक्ती कमी करून हवी असलेली वाढवणे .भगवंताच्या जवळ नेणारी शक्ती वाढवणे .
तप हे शारीरिक मानसिक अथवा वाचिक अशा तीन प्रकारचे आहे ,तसेच प्राण्यांच्या स्वाभाविक गुणांप्रमाणे तपही सात्विक ,राजस अथवा तामस  गुणांनी युक्त आहे .वाचिक तप म्हणजे काय हे सांगताना भगवंत म्हणतात ,
जे दुसऱ्याला दुख्ख न देणारे ,सत्य ,प्रिय पण हितकर बोलणे व स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाचिक अथवा वाण्ग्मयीन  तप असे म्हणतात .ज्याप्रमाणे परीस हा स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो ,त्याप्रमाणे श्रोत्यांना सुख होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात असतो ,अथवा
ज्याप्रमाणे पाणी मुख्य झाडाला जाताना पाटाच्या काठावरचे गवतही सहज जगते ,त्याप्रमाणे ज्याच्या बोलण्याने सर्वांचेच हित होते ,
जसे अमृत जीवाला अमर करते ,पाप व ताप नाहीसे करते व पिणाराला गोडीही देते ,त्याप्रमाणे आपल्या बोलण्याने अज्ञान नाहीसे होते ,आत्मस्वरूप प्राप्त होते व कितीही ऐकले तरी या बोलण्याचा वीट येत नाही .
रुग्वेदादी तिन्ही वेद या तापसाच्या वाचारूपी मंदिरात स्थापन केले जातात व मुखाने वेद अथवा भगवंताचे नाम याचे अखंड पठण चाललेले असते .हे सर्व वाचिक तप समजावे .
हेच तप जर फळाची आशा  न धरता ,पूर्ण सत्व्शुध्ढीने युक्त अशा मनुष्यांनी आस्तिक बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात .
वाचिक तप हे पावक म्हणजे दुसर्याला पवित्र करील असे असते ,स्वतः झिजत दुसर्याची वाढ करणे ,आपल्या बोलण्याने दुसर्याची बुद्धी तेजस्वी ,क्रियाशील ,शुध्द वर्तनाची व्हावी हि वाचिक तपाची भूमिका .
गीतेतील तात्विक भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवताना श्रीज्ञानेश्वर आपल्या दृष्टांताने ,अलंकार ,उपमा यांच्या वापराने  या विचाराचे अनुभवाच्या अंगाने दर्शन घडवतात ,अनुभवाच्या भाषेतून आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अनुभव देतात .व्यवहार ,नीतिशास्त्र ,धर्म दर्शन या सर्व गोष्टीना ते अनुभवाच्या भाषेने समूर्त करतात .
आपल्या श्रोतृ वृंदाला बरोबर घेऊन ज्ञानेश्वरीची वाटचाल करताना श्री ज्ञानेश्वरांनी सर्वाना जो अमृतानुभव दिला त्यामुळे या त्यांच्या तपास वाचिक तप म्हणणे सर्वार्थाने योग्य आहे .

Saturday, December 1, 2012

aahar

भगवंत म्हणतात कि प्रत्येक माणसाचा आहार हा त्याच्या आवडीवर अवलंबून असतो व आवड हि गुणांवर अवलंबून असते ,तेंव्हा तीन गुणांप्रमाणे आहारही सत्व ,रज ,तम या तीन प्रकारचा बनला आहे .पण प्रत्येकाने सत्वगुणी आहारच सेवन करावा म्हणजे त्याच्यातील नैसर्गिक राजस व तामस  वृत्तींचा जोर कमी होऊन सात्विक वृत्ती वाढीस लागतील .
सत्वगुणी पुरुषाला मधुर ,स्निग्ध व रसभरीत आहार आवडतो ,अशा आहाराने शरीर रोगमुक्त व मन प्रसन्न राहते .हा आहार सत्व ,बल ,प्रीती व आयुष्य वाढवतो .सात्विक पदार्थ स्वभावतःच रसभरीत व गोड असतात ,स्निग्ध व परिपक्व असतात ,स्पर्शाला मऊ व चविष्ट असतात ,हा आहार थोडासाच सेवन केला तरी पूर्ण तृप्ती देतो .शरीर व मनाला सामर्थ्य पुरवणारा व सात्विक गुणांची वाढ करणारा असा हा आहार आहे .
रजोवृत्तीच्या लोकांना तिखट ,आंबट ,खारट  ,अति उष्ण  ,तीक्ष्ण रुक्ष ,दाह करणारे आहार प्रिय असतात पण हे आहार शेवटी दुखः ,शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत .
हा रजोगुणी अतिशय खारट  पदार्थ खातो व इतके गरम पदार्थ खातो कि जणू अग्नीच गिळत आहे .घाव न घालताही रुपणारे  असे तिखट तो खातो .त्याचे अन्न कोरडे व कडक असते ,जणू अन्नरूपाने तो प्रज्ज्वलित अग्नीच भरतो .असे अन्न खाल्ल्यावर त्याला बेचैनी येते व सतत पाणीपाणी होते .या आहाराचे फल म्हणून शरीरात अनेक आजार एकदम उठतात व  मन दुख्खमय  होते .
ते आहार नव्हती घेतले ।व्याधिव्याळ जे सुटले ।ते चेवावया घातले ।माजवण पोटी ।१५० अ १७
हे अन्न नसून शरीरात रोग रुपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे होय .तमोगुणी पुरुषाचा आहार वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि याची तुम्हाला किळस येईल .जशी म्हैस निर्विकार रीतीने आंबोण खाते तसे तो अन्न खातो .दोषयुक्त ,खाण्यास अयोग्य मानलेल्या पदार्थांच्या ठिकाणीच त्याची हाव वाढते .
मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो ,त्याप्रमाणे शरीरातील रक्त मासादी धातू बनतात व धातुप्रमाणे मनुष्याचा स्वभाव तयार होतो .म्हणून आहाराचा व वृत्तीचा परस्पर संबंध आहे .व म्हणून मोक्षाच्या वाटेने चालणार्यांनी आपली सात्विक वृत्ती वाढीस लावण्यासाठी सात्विकच आहार घ्यावा ,ज्यामुळे आपले मन ,शरीर व बुद्धी समतोल राहील व कफ, पित्त व वात हे त्रिदोष संतुलित राहतील.

daivi sampatti

सोळाव्या अध्यायात भगवंत मोक्षाची अचूक प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीच्या २६ गुणांचे वर्णन करतात .
सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे१ अभय -मृत्यूची भीती नाहीशी होणे .हे अभय निरहंकार वृत्तीने व फलाशा टाकून कर्म करण्याने प्राप्त होते ,अथवा आपलेच रूप सर्वत्र भरले आहे ,मग कोण कुणाला मारणार या विचाराने जो अद्वैत रूप बनला त्यालाही अभय प्राप्त होते .
२सत्वशुद्धी -बुद्धीतील रज -तम जाऊन ,संकल्प -विकल्प उठण्याचे थांबून जिला सत्व स्वरूपच आवडले अशी भगवंताच्या ठिकाणी अनोन्य बुद्धी तिला सत्वशुद्धी असे म्हणतात .
३ज्ञानयोग व्यवस्थिती -ज्ञानाच्या अथवा योगाच्या ठिकाणी चित्तवृत्ती एकाग्र करणे .
४दान - आपपर भाव न ठेवता कायावाचामने करून  संकटग्रस्तांना मदत करणे ते दान
५दम -इंद्रियांचा विषयाचरणापासून संबंध तोडून त्यांना व्रताचरणात गुंतवणे हा दम .
६यज्ञ -वर्णाश्रमाप्रमाणे स्वकर्माचे आचरण निरहंकार बुद्धीने व फलाशा सोडून करणे हा यज्ञ .
७स्वाध्याय -ईश्वर दर्शनासाठी श्रुतींचा अभ्यास अथवा अखंड नामस्मरण करीत राहणे हा स्वाध्याय .
८तप -विवेकाने शरीरातील आत्मा व देह यांच्या सरमिसळीतून आत्मा वेगळा करून त्याच्या स्वरूपाविषयी सदा जागृत राहणे हे तप .
९आर्जव -सर्वांशी सौजन्याने वागणे .
१०अहिंसा -कायावाचामने करून होणाऱ्या सर्व क्रिया जगाच्या कल्याणाकरिता करणे .
११अक्रोध -राग येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी मनात रागाची ऊर्मीही उठत नाही तो अक्रोध .
१२त्याग -मूळ देहाची अहंता टाकून देणे हा त्याग .
१३शांती -जाणण्याचा विषय ,जाणणारा व जाणणे ही जेथे नाहीसे होते ती शांती .
१४  अपैशुन्य-दुसऱ्याच्या दोषांवर त्याला न टोचता त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या गुणाचा उपयोग करणे .
१५ दया -दुखीः लोकांचे दुखः नाहीसे करण्याकरता त्यांना आपपर भाव न ठेवता सर्वस्वाने मदत करण्याची तळमळ ती दया .
१६अलोलुप्य -ऐहिक अथवा पारलौकिक भोग स्वाधीन झाले असताही त्या भोगाबद्दल मनात कंटाळा असणे .
१७मार्दव -सर्वांशी हळुवार प्रेमाने वागणे .
१८लाज -मुक्ती न मिलता देहरूप पुनर्जन्म मिळणे याबद्दल होणारी खंत म्हणजे लाज .
१९अचापल्य -मन व प्राण यांचे नियमन होऊन दाही इंद्रिये शांत होतात ते अचापल्य .
२०तेज -ईश्वराकडे मन धावत असतांना त्याच्या आड येणाऱ्या संकटाना तोंड देण्याचे सामर्थ्य ज्यामुळे येते त्यास तेज म्हणतात .
२१-क्षमा -लोकांचे सर्व अपराध सहन करूनही त्याबद्दल यत्किंचीतही अभिमान नसणे ही क्षमा .
२२धैर्य -त्रिविध ताप उत्पन्न झाले असता त्याचा प्रतिकार करणारे ते धैर्य .
२३शौच्य -अंतरी विमल आत्मज्ञान व बाह्य भागी शुध्द कर्माचरण ते शौच्य .
२४ अद्रोहत्व -आत्म हिताचा  मार्ग अनुसरत असताना ओघाने इतरांचेही सुख साधणे याला अद्रोहत्व म्हणतात .
२५सत्य -ऐकणाराला गोड वाटून निसंदेह करणारे ,परिणामी कल्याणकारक असे जे बोलणे त्याला सत्य म्हणतात .
२६अमानित्व -मनाला पूर्ण योग्य असूनही लोकांनी सन्मान केला असता अवघड वाटतो ,त्या स्थितीला अमानित्व म्हणतात .