Friday, August 31, 2012

panchampurushaarth-bhaktiyog

मानवी जीवनात चार पुरुषार्थ मानले आहेत -धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष .-मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ .मोक्षाप्रत जाण्यासाठी गीतेने कर्म ,ज्ञान ,योग हे मार्ग सांगितले आहेत ,पण या सर्वाना श्रीज्ञानेश्वरांनी साथ अवश्य मानली ती भक्तीची .या प्रत्येक मार्गावर भक्तीची भावना साथीला असल्यासच मोक्ष मिळतो हे त्यांनी प्रत्येक कांडात सांगितले .वेदांताने न सांगितलेले हे रहस्य ज्ञानेश्वरांनी प्रकट केले .भक्तीला त्यांनी पंचमपुरुषार्थ  संबोधून चारही पुरुषार्थापेक्षा उच्च जागी प्रतिष्ठित केले।चहूपुरुषार्थाशिरी भक्ती जैसी ।
आर्त .जिज्ञासू ,अर्थार्थी व ज्ञानी हे भक्ताचे चार प्रकार .शारीरिक व मानसिक व्याधीपासून सुटका मागणारा तो आर्त ,सर्व जाणून घेण्यापर्यंतच मनाची मजल असणारा तो जिज्ञासू ,अर्थ व सर्वच लौकिक गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा धरणारा तो अर्थार्थी ,हे तिन्ही काम्य आहेत ,-मनात कामना धरून देवाकडे जाणारे आहेत ,ज्ञानी हा ईश्वर प्राप्तीचा बोध मनात जागा व्हावा ,अनुभूती मिळावी असा मुमुक्षु असतो ,हा खरा भक्त .
मग चौथियेचे ठायी ।काहींची करणे नाही ।म्हणोनी भक्तु एक पाही ।ज्ञानिया जो ।
हा मुमुक्षु प्रत्यक्ष भगवंताचेच रूप होऊन राहतो ,पण शिवाय भक्त म्हणून उरतो .सृष्टीच्या व्यवहारात त्याचे काही मागणे नसते .जन्म जन्मांतरीच्या भक्तीनेच हि अवस्था प्राप्त होते .गुरुकृपेने याचे मन आणि बुद्धी पूर्ण साम्यावस्थेत जाते .हे जग व तो यात भेद उरत नाही .सारे जगच भगवंतमय  होते . असा निष्काम भावनेने ज्ञानोत्तर स्थितीत समाजासाठी कर्म करणारा भक्त हा पंचम पुरुषार्थी होय .त्याही कार्य करणे उरले ।लोकालागी
 अविध्येचा नाश करणाऱ्या ज्ञानाच्या साधनेने मोक्ष प्राप्त होतो ,पण बरोबर भक्तिभावाची पूर्तता झाल्यावरच भगवंताचे दर्शन होते ,व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही भगवंताचीच रूपे ,भक्तीने व्यक्तरुपाची प्राप्ती होते ,तर योगाने अव्यक्ताची .पण भक्तिमार्गात योगासारखे दुखदायक कष्ट नाहीत ,उलट या मार्गात साधकाचे रक्षण करण्यास मी सदैव तयार  असतो ,अशा भक्तांच्या योग्क्षेमाचा भार  मी वाहतो ,संसार सागरातून त्यांना लीलया पार करतो ,नामस्मरणाचा मार्ग दाखवून त्यांचा उध्दार करतो असे भगवंत म्हणतात .
माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेन्द्रीयासाहित मनाची मोहोर लाऊन जे भक्त जिवाभावाने मला रात्रंदिन भजतात  त्यांना मी श्रेष्ठ मानतो .निश्चय करणारी बुद्धी आणि संकल्पविकास करणारे मन ही दोन्ही माझ्या प्रेमाने भरून जाणे  याचे नाव भक्ती .असे झाले म्हणजे देहाभिमानी वृत्ती देहास सोडून हळूहळू माझ्याकडे येते , मनाला हि भक्तीची गोडी लावण्याकरिता पुनःपुन्हा तीच गोष्ट करावी लागते ,याला अभ्यास म्हणतात .ज्यांना अभ्यास शक्य नाही त्यांनी आपली नित्यकर्मे निष्काम वृत्तीने फल ईश्वरार्पण करून केली तर भक्ती साध्य होते .अशा रीतीने कर्मफलत्याग ,अभ्यास ,ज्ञान, ध्यान या पायर्यांनी चढत जाऊन माझी पूर्णब्रम्हस्थिती साधकाला प्राप्त होते हाच भक्तिरूप पंचम पुरुषार्थ होय .
तरीझडझडोनी  वाटेला निघ । इये भक्तीचीये वाटे लाग ।जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।
ईश्वराच्या ठायी असलेली अनन्यता म्हणजे भक्ती
हे विश्वची माझे घर ।ऐसी मती ज्याची स्थिर ।किंबहुना चराचर ।आपण झाला ।
मग यावरी पार्थ ।माझ्या भजनी आस्था ।तरी तयांते मी माथा ।मुकुट करी  ।
ज्ञानाने विश्वात्मक अनुभव घेतल्यावरही भक्तिमार्गाने चालणाराला भगवंत आपल्या माथी मुकुटासारखे धारण करतात .भगवंत आणि भक्त मिळून भक्तीसौंदर्याचे  एकरूप चित्र उभे करतात .असा भक्तियोग आचरणारे ज्ञानेश्वर हे भगवंताचे लाडके होत यात नवल काय ?

Thursday, August 30, 2012

ahinsa

अहिंसा या पदाचे व्याख्यान करताना ज्ञानदेवांनी प्रथम अहिन्सेबद्दलची कर्मकांडातली हास्यास्पद मते सांगून त्यांचे खंडन केले आहे .उत्तरपक्ष करताना ते म्हणतात कि खरी अहिंसा हि मनात उत्पन्न होत असते ,मन हे सर्व इंद्रियांचे प्रेरक असल्याने मनात अहिंसा उत्पन्न झाली असता त्याच्या सर्व शारीरिक क्रियांमध्ये प्राणीमात्रांविषयी प्रेम भरलेले दिसते .आत्मवत सर्व भूतानि ।म्हणजे आपल्याप्रमाणेच सर्व भूतजात आहे असे आत्मज्ञान त्याला झाले म्हणजे मनात साऱ्या प्राणिमात्रांबद्दल निखळ प्रेम निर्माण होते हाच अहिंसेचा मूळ विचार होय .ज्ञानी माणसाच्या मनातील अहिंसेची विविध रूपे अनेक दृष्टान्तानी दाखवताना श्रीज्ञानेश्वर अरूप अहिंसेचे मूर्त रूप आपल्यासमोर उभे करतात .
 पै मोहाचेनि  सांगाडे ।लासी पिले धरी तोंडे ।तेथ दातांचे आगरडे ।लागती जैसे ।
मांजरी आपले पिलू तोंडात धरते तेंव्हा त्याला जसे तिचे दात लागत नाहीत तशी त्याची दृष्टी एकाच वेळी बळकट पण अतिशय नाजूक असते .
का नादब्रम्ह्ची मुसे आले ।कि गंगापय असलेले ।पतिव्रते भाळे ।वार्धक्य का ।
त्याचे बोलणे म्हणजे जणूकाही नादब्रम्ह आकारास आले असे मधुर ,किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र ,किंवा पतिव्रतेला म्हातारपण आले असे रसाळ ,खरे ,मोजके पण सरळ ,कोणाला न खुपणारे असे असते .
तरी चंद्रबिम्बोनी धारा ।निघता नव्हती गोचरा ।परि एकसरे चकोरा।निघती दोंदे ।
चंद्र बिम्बातून निघणार्या अमृताच्या धारा ज्याप्रमाणे डोळ्याला दिसत नाहीत ,पण त्यांच्या योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ,त्याप्रमाणे त्याची दृष्टी प्राण्यांकडे असते .
भ्रमर जसे कमळावर त्याचे केसर  चुरगाळतील या शंकेने नाजूक पाय ठेवतात त्याप्रमाणे सर्वत्र लहान जीव आहेत हे जाणून तो दयेने आपली पावले लपवित चालतो .
 पुढा स्नेह पाझरे ।मांगा चालती अक्षरे । शब्द पाठी अवतरे ।कृपा आधी ।
तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते ,मागून अक्षरे चालतात .कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून येतात त्याचे बोलणे ऐकणाराला तो आपले आईबापच आहे कि काय असे वाटते .
ज्याप्रमाणे जमिनीत पेरलेले बीच वृक्ष होते त्याप्रमाणे त्याचे मनच इंद्रीयाद्वारा पसरले आहे .समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे तो जसा आपल्या पाण्याने खाड्या भरून टाकतो ,तसे चित्तच आपल्या अहिंसारूपी जलसंपत्तीने या इंद्रियांना भरून टाकते
  तो जान वेल्हाळ ।ज्ञानाचे वेलाउल ।हे असो निखळ ।ज्ञानची तो ।
मनाने ,देहाने ,वाचेने हिंसेचा त्याग झालेला पुरुष हा ज्ञानाचे मंदिर होय ,नव्हे तो साक्षात ज्ञानाची मूर्ती होय असे समज .

अरूप

Wednesday, August 29, 2012

adarsh bhakt

आदर्श भक्ताच्या लक्षणांचे वर्णन करताना त्याला ज्याच्याशी एकरूप व्यायचे आहे त्या चैतन्याचाच
आदर्श श्रीज्ञानदेवांनी  त्याच्यापुढे ठेवला आहे .
जो सर्व भुतांच्या ठायी ।द्वेषाते नेणेची काही ।आपपरु नाही चैतन्या  जैसा ।
चैतन्याला जसा आपपर भाव नसतो तसे आदर्श भक्तही जगाशी व्यवहार करताना माझा वा परका असे मनात नाही ,हे समप्रद्न्याचे  लक्षण .ह्या  आदर्श भक्ताची लक्षणे आहेत ,अद्वैष्टा सर्वभूतानां ,मैत्रः ,करुणः निर्मम ,निरहंकारः समसुखः दुखेः -ही सगळी लक्षणे एकाच वेळी भगवंताच्या सगुण रूपाचे व त्याच वेळी आदर्श भक्ताचे वर्णन करतात .आणखी तो कसा असतो ?
संतुष्टः सततं योगी यतात्मा  दृढ निश्चय ।मय्यार्पित मनोर्बुध्दीर
असा हा भक्त भगवंताना अतीव प्रिय असतो .अभ्यास -ज्ञानाच्या मार्गाने येऊन ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणी सद्गुणांचा परमोत्कर्ष असतो .तो लोकमान्य ,लोकांना न कंटालणारा ,हर्ष ,क्रोध ,काम यांच्या अतीत निरपेक्ष ,उदासीन ,अहंकाररहित ,लोकातीत ,शुभाशुभ परित्यागी ,भक्तिमान , समत्व बुद्धीचा ,मानापमानरहित ,निंदा स्तुती यांच्या अतीत ,अनिकेत , स्थिरबुद्धी अशा सर्व  लक्षणांनी युक्त असतो .
अशा या आदर्श भक्ताबद्दल भगवंताना वाटणाऱ्या आपुलकीचे वर्णन त्यांनी अनेक उदाहरणांनी केले आहे .ते म्हणतात ,
मी इतका  प्रसन्न होतो अशा भक्तावर कि त्यांना नमस्कार करायला मीच  जातो ,मग मला वाटते कि नमस्कार हि सामान्य गोष्ट आहे ,म्हणून त्यांना उचलून मी मस्तकावर घेतो ,त्याचा मुकुट केल्याने तोही सुंदर व मीही अधिक सुंदर होतो .त्याच्या लाथेचे  लांच्छन ,भृगुलांच्छन मी जपून ठेवतो ,त्याच्या सद्गुणाचे अलंकार मी धारण करतो ,याला आलिंगन द्यावेसे वाटले तर दोन हात पुरेनात ,म्हणून मी आणखी दोन हात घेऊन आलो .याच्यासाठी मुळात निर्गुण -निराकार असलेला मी सगुण -साकार झालो ,अशा संतांचे भजन कीर्तन करणाऱ्या जागा मला पवित्र वाटतात आणि ते करणारे लोकही मला आवडतात .तो मला इतका आवडतो कि त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावे .अर्जुना ,तुझी शपथ घेऊन सांगतो कि त्याच्या इतके  आवडते आम्हाला दुसरे कोणी नाही।
जे मी प्रीती करी ।कां मनी शिरसा धरी ।एवढी थोरी । ज्या स्थितीये ।
या भक्तीयोग्याच्या स्थितीची थोरवी एवढी कि त्या पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो ,मीच त्याचे ध्यान करतो व त्याला मस्तकी धारण करतो .

Monday, August 27, 2012

gurugourav 3

गुरुकृपादृष्टीरूपी मातेचा जयजयकार करून श्रीज्ञानेश्वर बाराव्या अध्यायाला प्रारंभ करतात .
या दृष्टीचे महिमान वर्णन करताना ते हि दृष्टी शुध्द आहे ,उदार म्हणून प्रसिध्द आहे ,अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहे .या दृष्टीच्या योगाने विषयरूपी सर्पाच्या दंशाने येणारी भ्रांती नाहीशी होते ,या दृष्टीला येणारी प्रसन्नता रूप भरती  जीवाला संसारातील त्रिविध ताप आणि खेद यापासून वाचवते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग प्राप्त होतात व त्याहीपुढे "ते ब्रम्ह मी आहे "अशा स्वरूप सिद्धीच्या प्राप्तीची हौस तीच पुरवते .
गुरूची दृष्टी ज्यावर पडते त्याला जे दिसत नव्हते, कळत  नव्हते  ,ते दिसू,कळू लागते ,शब्दातून व्यक्त करता येते ,आणि याचीच मला गरज आहे ,कारण आता सर्वात अवघड असे देव व भक्त यांच्यातल्या प्रेमाचे वर्णन करायचे आहे ,म्हणून श्रीज्ञानेश्वर म्हणतात की तू माउली  होऊन मला ती शक्ती दे .
म्हणोनी साधका तू माउली ।पिके सारस्वत तुझिया पाऊली ।
याकारणे मी साउली  ।न सांडी तुझी ।५
सर्व विश्वात पसरलेली ,सर्वत्र सारखी ,शुध्द शक्ती तू आहेस ,तू अनवरत -अखंड आनंदाचा वर्षाव करतोस -उदारपणे सगळंच  देऊन टाकतोस -तर ती कृपादृष्टी ,ते तुझे स्वरूप -आनंद ,ते मला दे .असा जेंव्हा तू मला प्रसन्न होशील ,तेंव्हा मी तुझी सावली सोडणार नाही ,कारण मातेच्या सावलीत बालकाला जे सुख मिळते ,ते त्रिभुवनात कोठेही मिळत नाही .मग तुझ्या सावलीत ,तुझ्या पावलांनी सारस्वत माझ्या घरात पिकेल ,मुखातून बाहेर पडेल ,श्रोत्यांना ऐकावयाला मिळेल ,यासाठी तू नुसते माझ्याकडे पहा ,तू नुसते पाहिलेस की हे घडेल ,मग माझ्या मनातले तुझ्याबद्दलचे प्रेम माझ्या शब्दातून उगवून भरघोस वाढेल .
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी ।ते सकळ विध्याचीये सृष्टी ।धात्रा  होय ।९
भक्तांचा कल्पतरू अशा  गुरुदृष्टीरूप आईला ते आपल्या ग्रंथनिर्मितीसाठी विविध गोष्टींची मागणी करतात
शांत ,अद्भुत अशा रसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर ,परमार्थ निरुपणाला शोभतील अशा योग्य अलंकार रुपी  रत्नांची माझे निरुपण हे खाणच होऊन राहील असे कर ,माझ्या या व्याख्यानात गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर ,मराठी भाषारुपी पृथ्वीमध्ये अलंकार रुपी सोन्याच्या खाणी उघड ,व आत्मानात्मविचार रुपी वेलींची जिकडे तिकडे लावणी होऊ दे ,संवादरूपी फळे लगडलेले सिद्धांत रुपी  वृक्षांचे विस्तीर्ण बगीचे तयार कर ,या बागीचातील नास्तिक पणाच्या दर्या आणि वितंडवाद रुपी आड वाटा नाहीशा कर ,आणि कुतर्क रुपी दुष्ट जनावरे हाकून दे .श्रीकृष्ण गुणांचे वर्णन करण्यास मला समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव ,या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व जगाला ब्रम्ह्सुखाचेच  देणेघेणे होऊ दे.  मराठीचिये नगरी  ।ब्रम्हविध्येचा सुकाळू करी ।
                                                घेणेदेणे सुखचि वरी ।हो देई या जगा ।
 यावर श्रीगुरुंनी आता गीतार्थ सांगण्यास सुरवात कर अशी श्रीज्ञानदेवास आज्ञा केली