Friday, November 30, 2012

aasuri sampatti

सोळाव्या अध्यायात असुरी संपत्तीचे सहा प्रकार वर्णन करताना श्री भगवंत म्हणतात कि हि आसुरी संपत्ती त्याज्य असल्याने निरुपयोगी आहे ,पण तिचा त्याग करण्याकरिता ती आधी जाणली पाहिजे .
दंभ ,दर्प ,अभिमान ,क्रोध ,पारुष्य व अज्ञान हे सहा आसुरी गुण आहेत .यांच्यात जीवनाचा सर्वनाश करून त्याला हमखास नरकात पोहोचवण्याची शक्ती आहे .
आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने सांगणे हा दंभ होय .विद्या ,पैसा अथवा मान यांची अल्पशी जरी प्राप्ती झाली तरी मस्त होणे हा दर्प ,ईश्वर व वेदाचे नाव काढले कि ज्यामुळे डोके फिरते तो अभिमान ,दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मनात जळफळणे  हा क्रोध ,दगडाप्रमाणे निर्दय अंतकरण हे पारुष्य ,विधिनिषेध व पापपुण्य यातील फरक न कळणे हे अज्ञान .
या दोषांच्या आहारी गेलेली मनुष्ये धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती हे तत्व जाणत नाहीत .त्यांच्यामध्ये पावित्र्य ,सदाचार ,सत्य हे काही नसते .काही एक न करताही ते स्वभावतःच वाईट असतात .हे जग ईश्वर रहित व धर्म व्यवस्थेरहित आहे असे ते मानतात .हे कामी पुरुष क्षणिक शरीराच्या खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. या कामाग्निचे कधीच समाधान होऊ शकत नसल्याने ते नेहमी हपापलेले असतात व कामाबरोबर दंभ व अभिमान यांचा समुदाय जमवतात .त्यांची कर्मप्रवृत्ती कामोप्भोग हेच अंतिम सत्य आहे असा  निश्चय केलेली असते -त्याकरिता ते अन्यायाने द्रव्य संचय करतात .दुसर्याच्या प्राणाचा घात करून द्रव्यप्राप्त करून  त्यांना संतोष होतो  ही हाव  संपत नाही .असे हे काम ,क्रोध ,लोभ या त्रिदोशानी  युक्त पुरुष शेवटी नरकाच्या ठिकाणी पतन पावतात ,हे त्रिदोष हे नरकाचे द्वार ,आत्म्याच्या नाशाचे कारण आहेत ,सर्व दुख्खाकडे नेणाऱ्या वाटेचे हे तीन वाटाडे आहेत ,त्याने यज्ञ करावयाचे ठरवले तरी त्यासही  तो दुसर्यांना लुबाडण्याचे साधन बनवितो .त्यांचा नरकातून तामसयोनीत   पुनर्जन्म होतो .
श्री ज्ञानेश्वरांची दृष्टी आत्मोध्धार साधण्याच्या प्रवृत्तीवर व माणसाच्या चांगुलपणावर आहे ,म्हणून ते यासही मार्गदर्शन करतात
या कारणे पै बापा ।जया आथी अपुली कृपा ।तेणे वेदान्ताचीया निरोपा ।आन न कीजे ।४५५ अ १७
श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार बजावून सांगतात कि काम ,क्रोध ,लोभ ही त्रिपुटी सर्वस्वी निंद्य आहे ,म्हणून ती टाकावी .या तीन्हीपासून मुक्त झालेला मनुष्यच श्रेष्ठ गती पावण्यास योग्य होतो .यानंतर चारी पुरुषार्थ पैकी एकाची वाट चालू लागल्याने त्याचे अंतकरण आनंदी राहील व त्यास मोक्ष मार्गात सज्जनांचा संग लाभेल ,तो जन्म मृत्युच्या फेर्यातून सुटेल व अत्मानंदाचे गाव ती गुरुकृपा त्यास प्राप्त होईल .मग आत्मनुभावाचे वाटेने सुखाने चालता येईल .श्रुती माउली हि  जीवाचे शिवाशी मिलन घडवते ,म्हणून वेदाज्ञा मानून संपूर्ण पुरुषार्थाचे वाटेने चालावे हा दोष्मुक्तीचा उपाय भगवंतानी सुस्पष्ट रीतीने सांगितला .

Wednesday, November 28, 2012

purushottam 2


क्षर व अक्षर या दोन्हीहून वेगळा ,जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो ,जो स्वतः आदि व अंत नसलेला ,अव्यय आहे त्या उत्तम पुरुषास ,पुरुषोत्तमास परमात्मा म्हणतात .
ज्यावेळी" अहं ब्रम्हास्मि "या वृत्तीरूप  ज्ञानाने अज्ञान नाहीसे होते ,त्यावेळी आत्मसाक्षात्कार देऊन ते ज्ञानही नाहीसं होते .ज्यास मी ब्रम्ह हे वृत्तीज्ञान फक्त शिल्लक राहिले ,तो पुरुषोत्तम होय .
प्रलय कालच्या तेजाने दिवस व रात्र दोन्हीचा ग्रास करावा त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या मुळे ज्याने  स्वप्न ,सुषुप्ती अथवा जागृती या तिन्ही अवस्था पार केल्या आहेत तो उत्तम पुरुष होय .
ज्याठिकाणी एकपण नाही ,पण द्वैतही नाही ,आहे अथवा नाही ,हे दोन्हीही नाही ,अनुभव जेथे दिपून नाहीसा झाला ,असे ते जे काही आहे ते उत्तम पुरुष आहे .न बोलण्यानेच त्याचे वर्णन होते ,इतर काही म्हणजे जीव ,शिव व ब्रम्ह न होऊनच त्याचे होणे आहे ,जो विश्वाच्या उत्पत्ती ,विस्तार व ग्रासाला  व्यापुनही उरला आहे तो परमात्मा आहे . 

Tuesday, November 27, 2012

purushottam 1

भगवंत म्हणतात ,या संसारात क्षर व अक्षर हे दोन पुरुष आहेत .सर्व भुते म्हणजे क्षर ,हा क्षर पुरुष आंधळा म्हणजे ज्ञान दृष्टी विहीन , वेडा म्हणजे भ्रमाने देह म्हणजेच मी ,असे मानणारा ,पांगळा म्हणजेच भौतिक गोष्टींवर अवलंबून असणारा असा आहे .
जो अक्षर पुरुष तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी उभा आहे .तो यथार्थ ज्ञानाने मी ब्रम्ह असेही समजत नाही ,व विपरीत ज्ञानाने मी देह असेही समजत नाही .निव्वळ अज्ञान हे अक्षर पुरुषाचे स्वरूप होय .
क्षर  पुरुषाची उपाधी म्हणजे देहविषयक कल्पना व स्वतः क्षर पुरुष हे दोन्ही जेथे लीन होतात त्याला अव्यक्त म्हणतात .आणि संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा होतो ,पण आत्मबोध होत नाही त्या केवळ अज्ञान अवस्थेला अक्षर हे नाव आहे .ते अव्यक्त हे या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे या अव्याक्तातुंच जीव व विश्व या कल्पनांचा जन्म व लय  होतो
जे काही लहान ,मोठे ,जंगम ,स्थावर ,मन व बुद्धी याकडून जाणले जाते ,पंच महाभुतानी तयार झाले आहे ,नाम व रूप यात सापडते ,जे प्रत्येक क्षणी उत्त्पन्न होऊन नाहीसेही होते ,त्याला जग म्हणतात .३६ गुणापासून बनलेले हे साकार जगत म्हणजेच आपण असे चैतन्य मानू  लागले ,असा आपलाच आपल्याला विसर पडलेल्या चैतन्याला क्षर पुरुष हे नाव आहे त्याच्यात आत्मस्वरूप आहेच ,म्हणून तो पुरुष ,पण तो शरीराशी एकरूपता मनात आहे ,जे नाशिवंत आहे ,म्हणून तो क्षर .
क्षर  व अक्षर  या दोन्ही पुरुषांनी संसार भरला आहे .

Saturday, November 24, 2012

chidsury nivruttinath

पंधराव्या अध्यायाच्या शेवटी पुरषोत्तम रूपाचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञान कांडाचा भाग संपला .आता सोळाव्या अध्यायात ज्ञानोत्तर प्रेममय भक्तीकडे ज्ञानेश्वरी जाते ,म्हणून त्याची सुरवात होते गुरु शिष्यातील प्रेमाच्या वर्णनाने .आता गुरु शिष्यां दोही ।स्नेहो लाहला ।४६
आपल्या गुरुचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर चित सूर्याचे रूपक वापरतात .ते गुरूंच्या अलौकिक अध्यात्मिक सामर्थ्याचे लौकिक सूर्याच्या सामर्थ्याशी तुलना करून वर्णन करतात .ते म्हणतात 
विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा आणि अद्वैत स्थितीरूपी कमळाचा विकास करणारा हा गुरु निवृत्तीनाथ रुपी सूर्य उगवला आहे .हा आश्चर्य कारक आहे कारण लौकिक सूर्य जगताचे प्रकाशन करून द्वैत वाढवतो ,तर हा जगदाभास नाहीसा करून अद्वैत स्थितीचा विकास करतो .हा सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञान रुपी चांदण्याही नाहीशा करतो व ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या निरभ्र दिवसाची प्राप्ती करून देतो .
जेणे निवळ लिये सवळे ।लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।सांडिती देहाहंतेची अविठावे ।जीवपक्षी ।
त्याच्या उदयाने जीवनरूपी पक्षीआत्मज्ञान रुपी दृष्टी प्राप्त होऊन "मी देह आहे "या समजुतीचे घरही सोडतात .
लिंगदेह रुपी कमळातील जीव चैतन्य रुपी भ्रमराची सुटका होते .भेदरूपी नदीच्या काठावर शास्त्रांच्या विसंगत पणामुळे अडचणीत सापडलेले बुद्धी व बोध हे दोन  चक्रवाक पक्षी ,त्यांना श्रीगुरुरुपी सूर्य ऐक्याचा आनंद मिळवून देतो .या गुरूच्या प्रकाशात भेदाची चोरवाट नाहीशी होते आणि आत्मप्राप्तीसाठी प्रवास करणारे साधक आत्मनुभावाच्या वाटेने निघतात .याच्या विवेकरुपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सुर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या संसाराची जंगले जाळून टाकतात .
शिष्याच्या अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर हा ज्ञानसूर्य आला असताना त्याची स्वरुप्भ्रांती ही पडछाया त्याच्या आत्मानुभव रुपी पायाखाली नाहीशी होते .
मायारूपी रात्रीचा नाश झाल्याने त्यातील विश्वाभास रुपी स्वप्नाचा नाश होतो व अद्वैतज्ञान रुपी नगरात ब्राम्हनान्दाची रेलचेल होते ,मुक्त कैवल्य रुपी दिवस सदा प्राप्त होतो .
हा ज्ञानसूर्य नेहमीच उगवलेला आहे ,तो न दिसणे हे अज्ञान हे दिसणे या ज्ञानासह नाहीसे करतो व या दोन्हींनी झाकलेले मूलस्वरूप सर्वत्र प्रकट करतो .
या श्रीगुरुरुपी ज्ञान्सुर्याचा महिमा वर्णन करताना स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा व स्तवन ही त्रिपुटी श्रीगुरुच्या स्वरुपात लयाला जाईल ,तरच ती गुरुना  शोभेशी स्तुती होईल असे श्री ज्ञानदेव म्हणतात .