Wednesday, January 16, 2013

ved aani geeta

गीतेच्या अठराव्या अध्यायातील ६६ व्या श्लोकावर निरुपण करताना श्रीज्ञानेश्वर विधान करतात कि जे काही वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनाला देण्याकरता भगवंतानी त्याला आलिंगन दिले व आपल्या हृदयातील बोध त्याच्या हृदयात घातला ,व याप्रमाणे वेदाचे मुल जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट केले .
एंव वेदाचे मुलसुत्र ।सर्वाधीकारेव पवित्र ।श्रीकृष्णे गीताशास्त्र ।प्रकट केले ।
असे म्हणण्याचे कारण सांगताना ते म्हणतात कि ज्याच्या निश्वासात वेद उत्पन्न झाले ,तोच श्रीकृष्ण हे गीताशास्त्र आपल्या मुखाने प्रतिज्ञा पूर्वक बोलला ,म्हणून वेदांना मुलभूत गीता हे योग्य आहे .
तसेच ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो ,त्याप्रमाणे संपूर्ण वेद गीतेत सूक्ष्म रूपाने आहे .पहिल्या अध्यायापासून सतराव्या पर्यंत देवांनी वेदाची तीनही कांडे  ,कर्म ,उपासना व  ज्ञानकांड  या सर्वांचे विवेचन केले आहे .म्हणून गीता हा मूर्तिमंत वेदच आहे ,पण औदार्याने तो वेदांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे विधान ते करतात -याचा खुलासा करताना ते म्हणतात कि वेद मुळचा संपन्न ,पण कृपण आहे ,कारण तो ब्राम्हण ,क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णानीच ऐकावा अशी त्याची आज्ञा  आहे ,स्त्रीशुद्रआदिकाना त्याच्या पासून वंचित ठेवले आहे .हा मागील कमीपणा घालवण्यासाठी व सर्वांना सेवन करण्यास योग्य होण्याकरता वेद गीतारुपाने प्रकटला आहे .अशारितीने वेदही आता सर्वाना सेवन करण्यास योग्य झाला आहे .

Tuesday, January 15, 2013

vinamr dnyandev

ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत विनयशील होते .आपल्या सार्या कर्तृत्वाचे श्रेय ते आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना देतात .या त्यांच्या सांगण्यात लीनता आहे ,पण दीनता नाही याची प्रचीती ते वेळोवेळी मराठी भाषेचा आपला अभिमान व्यक्त करताना व ज्ञानेश्वरी लेखनाच्या आपल्या प्रतीद्नेबद्दल बोलताना देतात .
इये मराठीचिये नगरी ।ब्रम्ह विध्येचा सुकाळू करी ।
अशी ते गुरुना  प्रार्थना करतात व त्याच वेळी
माझ्या मराठीचा बोल कौतुके ।अमृतातेही पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।
अशा प्रकारे मराठी भाषेचा अभिमान व आपल्या प्रतिभेवरील विश्वास व्यक्त करतात .
अठराव्या अध्यायात व्यासांची गीता व आपली ज्ञानेश्वरी याबद्दल बोलताना ते म्हणतात
तैसा व्यासांचा मागोवा घेतु ।भाष्यकारान्ते वाट पुसुतू ।
अयोग्यही मी न पवतु ।कें जाईन ।
व्यासमुनी व भाष्यकार या आद्य गुरूना वाट विचारत मीही गीतार्थाच्या पर्यंत पोहोचू शकेन असा विश्वास ते व्यक्त करतात .
या ग्रंथ रचनेचे सारे श्रेय आपल्या गुरूना देताना ते म्हणतात कि गुरुकृपेमुळे माझे नित्य नवे  श्वासो श्वासही काव्य ग्रंथ होतात .आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरुना देताना ते म्हणतात कि कलसुत्राचे बाहुले सूत्राने चालते त्याप्रमाणे मला पुढे करून गुरु बोलत आहेत .
सायीखेडयाचे बाहुले ।चालविल्या सुत्राचेनि चाले ।तैसा माले दावित बोले ।स्वामी तो माझा ।
याशिवाय या ग्रंथ रचनेचे श्रेय ते वारंवार श्रोत्यानाही देतात .संत श्रोत्यांच्या सहवासामुळेच आपण हे काम करू शकलो असे विनम्र पणे म्हणतात .तुमच्या कृपेने ही ग्रंथ रुपी सृष्टी मी निर्माण करू शकलो ,हा उपकार त्रैलोक्यात निरुपम आहे असे ते म्हणतात व उपसंहारात याच विश्व रुपी देवाला
    जो जे वांछील तो ते लाहो
असे पसायदान मागतात .









Monday, January 14, 2013

satvgun

आदिब्रम्हाच्या आधारावर मायेने निर्माण केलेली ही अवघी सृष्टी त्रिगुणात्मक आहे असे म्हटले जाते .सत्व ,रज व तम या गुणांच्या आधारावर वृत्ती ,कर्म ,कर्मफल या सार्यांची विभागणी केली जाते .यापैकी सत्वगुणाचे महत्व सांगताना भगवंत म्हणतात ,माझ्या विभूती पैकी सत्वगुणसंपन्ना मध्ये जे सत्व आहे ते मी आहे .
सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन करताना सत्वगुण युक्त व्यक्तीची लक्षणे ते सांगतात ,ते म्हणतात ,-संकल्प -विकल्पाची ओढ टाकून ,रज तम वृत्तीचे ओझे टाकून ,आत्म चिंतनाचे प्रेम भोगणारी वृत्ती स्थिर बुद्धीने आत्म स्वरूपी अनन्य होते ,यास सत्वशुद्धी म्हणतात .
तैसी संकल्प विकल्पाची ओढी ।सांडूनी रज तमाची कावडी । भोगिता निजधर्माची आवडी ।बुद्धी उरे ।अ १६ओवी ७६
अठराव्या अध्यायात भगवंत सांगतात कि ज्ञाता ,ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्माची प्रेरणा आहेत व करता कारण व कार्य हा कर्माचा साठा आहे .आत्मा हा कर्मापासून वेगळा आहे .सांख्य शास्त्राने सांगितले आहे कि ज्ञान ,कर्म व करता ही सत्व ,रज व तम या गुण भेदाने तीन प्रकारची आहेत ,सत्व गुणाने केलेले कर्म हे  आत्म्याला कर्माच्या बंधनातून मुक्त करते ,म्हणून प्रत्येकाने सत्वगुनाच्या पातळीवरील जीवन स्वीकारायचे आहे व रज तमाच्या पातळीचा सर्वस्वी त्याग करायचा आहे .

Wednesday, January 9, 2013

maharshi vyas

महाभारताचे निर्माते महर्षी व्यास,ज्यांच्या प्रज्ञेने असा इतिहास निर्माण केला कि आजही जे महाभारतात नाही ते कोठेही नाही .
ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी महर्षी  व्यासांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले आहे .
पहिल्या अध्यायात ओंकार रुपी परमात्म्याचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि व्यासांची बुद्धी हीच ओंकार रुपी गणेशाच्या कमरेची मेखला आहे .याच अध्यायात पुढे गीतेचे महत्व  .सांगताना ते म्हणतात कि ही कथा प्रत्यक्ष ब्रम्ह असून सर्व शास्त्रात श्रेष्ठ ,सर्व विध्यांचे मूलस्थान आहे ,व्यासांच्या विशाल बुद्धीत स्फुरण पाऊन  ही सरस्वतीच येथे प्रकट झाली आहे .जसे सूर्याच्या प्रकाशात त्रैलोक्य उज्ज्वल दिसते ,तसे व्यासांच्या बुद्धीने उजळलेले विश्व दिसते ,त्यांच्या वाणीतील तेजाने सर्व विश्व उज्ज्वल झाले आहे .व्यसनी आपल्या बुद्धिरूपी रवीने वेद रुपी समुद्राचे मंथन करून भारत रुपी लोणी काढले .त्याला ज्ञान रुपी अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कढ दिल्यावर त्याचे गीता रुपी सुगंधी तूप बनले .अशारितीने विशाल बुद्धी व्यसनी महाभारतातील भीष्म पर्वात शांत रसाने भरलेली गीता सांगितली .
पुढे गीतेच्या अठराव्या अध्यायाचे महत्व वर्णन करताना ते म्हणतात कि व्यास मोठे बुद्धिमान कारागीर होते .त्यांनी वेद रुपी रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषिद अर्थ रुपी पठारावर खणायला आरंभ केला ,तेंव्हा धर्म ,अर्थ ,काम या पुरुषार्थ रुपी जो चारा निघाला ,त्याचा महाभारत रुपी कोट त्यांनी गीता मंदिराभोवती केला .मग आत्मज्ञान रुपी अखंड दगड निघाला ,त्याचा श्रीकृष्णार्जुन संवाद रुपी चिरा तयार केला .निवृत्ती रुपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून मोक्षाच्या स्वरूपाचा आकार आणला .पंधरा अध्यायात गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले .सोळावा अध्याय हा गळ्यातील डेरा व सतरावा हा कळसाच्या  बैठकीचा ओटा होय .अठरावा अध्याय हा कळस व त्यावर व्यास हे ध्वजाच्या ठिकाणी लागले .
आई मुलाला भरवताना त्याला खाता येईल असे घास करते ,त्याप्रमाणे श्रीकृष्णार्जुनांची कठीण कथा व्यासांनी  वाटेल त्याला तळहातावर घेते येईल इतकी सोपी केली ,शब्दांनी जे कळत नाही  ते अनुष्टुभ छंदात बसवून सर्वांच्या समजुतीला उतरेल असे व्यासांनी केले .जगावर मोठा उपकार झाला कि त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला .आता बाप पुढे जात असताना मुल त्याच्या पाव्लामागोमाग जाते ,त्याप्रमाणे व्यासांचा मागोवा  घेत व भाष्यकारांना वाट  पुसत श्रीज्ञानेश्वर गीतार्थाच्या योग्य ठिकाणी जाण्याची आपल्या गुरुकृपेच्या आधारे प्रतिज्ञा करतात .  

Monday, January 7, 2013

mokshprapti

अठराव्या अध्यायात भगवंत वैरागी पुरुष ब्रम्हप्राप्तीपर्यंत कसा पोहोचतो हे सांगतात .
ते म्हणतात ,जसे सूर्य उगवताच अंधार हा प्रकाशच होतो .तसे कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबर द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्म स्वरूपी स्थिर होते .,परंतु दुसर्यांना महावाक्याच्या श्रवणा बरोबर ब्रम्हरूप होता येत नाही ,तर त्याला  कर्ममार्गाने बुद्धीवरील दोषांचे विवरण करावे लागते .स्वधर्माचे पालन करून कर्म रुपी अग्नीमध्ये चित्तावरील रज ,तम हे मल दोष जाळावे लागतात .
एरव्ही स्वकर्माचेनी वन्हि ।काम्य निशिधाच्या इंधनी ।रजतमे कीर दोन्ही ।जाळिली आधी ।९९२अ १८
मग पुत्र द्रव्य आणि स्वर्गादी लोक या तिन्ही विषयी इच्छा वर त्याला ताबा मिळवता येतो .
त्याज्य व अत्याज्य असा सारासार विवेक न करता हव्या त्या विषयांचा उपभोग घेतल्याने विटाळलेली  इंद्रिये प्रत्याहार रुपी तीर्थात स्नान घालून त्याने शुध्द केली .
स्वधर्मा चरणाचे फल  ईश्वराला अर्पण करून त्याच्याकडून वैराग्याचे बल मागून घेतले .
  आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक अशा ज्ञानाच्या उत्कर्षाच्या प्राप्तीची सर्व सामग्री त्याने अशा पध्दतीने मिळवली  ,आणि त्याचवेळी सत्गुरू भेटले .व त्यांनी ज्ञानाचा चांगला उपदेश केला .या उपदेशामुळे ब्रम्हच सत्य व इतर सर्व मिथ्या हा अनुभव दृढ केला
शुध्द बुद्धीने युक्त ,सात्विक धैर्याने स्वतःचे मन व बुद्धी ,इंद्रिये यांचे नियमन करून ,शब्दादी विषयांचा त्याग करून ,प्रीती आणि द्वेष दोन्ही सोडून ,एकांत सेवन करणारा ,मिताहारी ,वाणी ,शरीर व मन यांचे पूर्ण नियंत्रण केलेला ,ध्यान योगपर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला ,अहंकार ,बल ,दर्प ,काम ,क्रोध ,परिग्रह या सर्वांचा त्याग करून ममत्व बुद्धी विरहीत ,शांत झालेला साधक ब्रम्ह रूप होण्यास योग्य होतो .
शोक न करणारा व इच्छाही न करणारा ,सर्व भुतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला पुरुष श्रेष्ठ भक्ती प्राप्त करतो .तो ब्रम्ह भावाची प्राप्ती होण्याची योग्यता धारण करतो .
ज्ञान व भक्ती या दोन्हीच्या योगाने प्रथम भगवंत कोण व कसा आहे हा आत्म बोध प्राप्त करून घेऊन मग तो त्याच्याशी पूर्ण समरस होतो ,स्वतःच ब्रम्हरूप होतो .