गीतेच्या अठराव्या अध्यायातील ६६ व्या श्लोकावर निरुपण करताना श्रीज्ञानेश्वर विधान करतात कि जे काही वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनाला देण्याकरता भगवंतानी त्याला आलिंगन दिले व आपल्या हृदयातील बोध त्याच्या हृदयात घातला ,व याप्रमाणे वेदाचे मुल जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट केले .
एंव वेदाचे मुलसुत्र ।सर्वाधीकारेव पवित्र ।श्रीकृष्णे गीताशास्त्र ।प्रकट केले ।
असे म्हणण्याचे कारण सांगताना ते म्हणतात कि ज्याच्या निश्वासात वेद उत्पन्न झाले ,तोच श्रीकृष्ण हे गीताशास्त्र आपल्या मुखाने प्रतिज्ञा पूर्वक बोलला ,म्हणून वेदांना मुलभूत गीता हे योग्य आहे .
तसेच ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो ,त्याप्रमाणे संपूर्ण वेद गीतेत सूक्ष्म रूपाने आहे .पहिल्या अध्यायापासून सतराव्या पर्यंत देवांनी वेदाची तीनही कांडे ,कर्म ,उपासना व ज्ञानकांड या सर्वांचे विवेचन केले आहे .म्हणून गीता हा मूर्तिमंत वेदच आहे ,पण औदार्याने तो वेदांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे विधान ते करतात -याचा खुलासा करताना ते म्हणतात कि वेद मुळचा संपन्न ,पण कृपण आहे ,कारण तो ब्राम्हण ,क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णानीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे ,स्त्रीशुद्रआदिकाना त्याच्या पासून वंचित ठेवले आहे .हा मागील कमीपणा घालवण्यासाठी व सर्वांना सेवन करण्यास योग्य होण्याकरता वेद गीतारुपाने प्रकटला आहे .अशारितीने वेदही आता सर्वाना सेवन करण्यास योग्य झाला आहे .