Friday, February 15, 2013

विश्व हे मोहरे लावावे २

तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न   देता ।एथ मोक्ष असे आयता ।श्रवणाची माजि ।अ ४ -२२३
आपल्या कथेबद्दल ते म्हणतात कि येथे मनाला न मारता ,इंद्रियांना  दुखः न देता ,आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे -म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते .आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात की ,माझे शब्द रुपी ताटे ,त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने वाढली आहेत ,ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे .
साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र ।पै संसारु जीणते हे शस्त्र ।आत्मा अवतारीते मंत्र ।अक्षरे येथे ।अ १५ -५७६
आपले बोल हे केवळ शब्द नसून ते संसार जिंकणारे शस्त्र आहेत ,ही आत्म्यापर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत  असे ते सांगतात .
श्री गुरुना  ज्ञानेश्वर विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रम्ह्सुखाचेच देणेघेणे होऊ दे .येथेही ज्ञानेश्वरांची इच्छा जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ही आहे हे स्पष्ट होते .यापुढे गुरूना विश्वोध्दाराची मागणी करताना ते म्हणतात ,
याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू ,गीतार्थाने विश्व भरून टाकू ,सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू ,हे गुरु ,परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो ,सुखाचा उत्सव उदयास येवो ,व सर्व जग ब्रम्ह ज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो .ही अशी सर्व जगासाठी प्रार्थना करणे यातच श्री ज्ञानेश्वरांचे वेगळेपण आहे .वैयक्तिक धर्माचरणाचे विविध मार्ग ग्रंथातून पूर्वी सांगितले गेले होते ,पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे ?या मोक्षमार्गावर भक्तीचा सोपा घाट कसा बांधावा ,कर्मयोगी बनून ,संसारात राहूनही स्वतः बरोबर जगाचा उध्दार कसा करावा ,हे सांगणारी भागवत धर्माची गुढी प्रथम उभी केली श्री ज्ञानेश्वरांनी ,त्यांना शतशत प्रणाम .  

Thursday, February 14, 2013

विश्व हे मोहरे लावावे १

गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञान प्रधान शास्त्र आहे ,परंतु सर्व जीव अज्ञानाने बांधले आहेत .तेंव्हा अशा अज्ञानी जीवाना मोक्ष पद मिळवण्याची योग्यता मिळवण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला आहे .जो खरा ज्ञानी पुरुष आहे तो निष्काम कर्म योगीच असतो ,कारण शरीर धारण करीत आहोत ,तोपर्यंत कर्म त्याग शक्य नाही .जेंव्हा निष्काम कर्म योगी अंतकरण स्थिर करून इंद्रियाचे व्यापार सुरु ठेवतो ,तेंव्हा तो खरा कर्मापासून मुक्तच असतो ,कारण त्याचे कर्म हे संकल्प विरहीत व फलाशा त्यागून केलेले असते ,त्यामुळे त्याला कर्म बंध न लागता मोक्षाप्रत जाता येते .-हा जीवन क्रमच एक नित्य यज्ञ आहे .
अज्ञानी पुरुषांना कर्म कसे करावे याचा आदर्श या कर्म योग्यांच्या जीवनाकडे बघून मिळतो ,म्हणून ज्ञानी पुरुषांनी कर्म अवश्य करावी .
  मार्गाधारे वर्तावे ।विश्व हे मोहरे लावावे ।अलौकिक नोहावे ।लोकाप्रती ।अ ३ -१८१
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो .ते अर्जुनासही उपदेश करतात कि लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे ,शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे ,लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये .
श्री ज्ञानेश्वर हे स्वतः जीवनमुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या उपदेशात दिसते .वैदिक धर्माने ज्ञानापासून व मुक्तीच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन मिळण्यापासून वंचित ठेवलेल्या  समाजाला ज्ञानाच्या ,भक्तीच्या कक्षेत आणणे हा ज्ञानेश्वरांनी आपला जीवनधर्म मानला होता ,म्हणून त्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राकृत भाषेतील ग्रंथरचना करण्याचा संकल्प केला .

Sunday, February 10, 2013

prakashmay tejomurti

सहाव्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर योगमार्गाने कुंडलिनी जागृतीचा व नंतर ध्यान समाधीने ब्रम्हरूप होण्याचा प्रवास वर्णन करतात .कुंडलिनी जागृतीनंतर शरीराची अवस्था कशी होते ते वर्णन करताना कवीच्या प्रतिभेला शब्द अपुरे पडतात ,पण तरीही ते एक दृश्य चित्र आपल्या नजरेसमोर उभे करतात
ते म्हणतात ,ज्यावेळी कुन्द्लीनीच्या मुखात चंद्रामृत पडते तेंव्हा तिथून तो रस सर्व अंगात पसरतो ,मग या पिंड रुपी शरीराचे आकाराने जणू अमृतकलाच अवतरते .वरवर त्वचेचे वस्त्र पांघरले  असते -हा त्वचेचा पापुद्रा कोन्ड्याप्रमाणे झाडून जातो .मग स्वयंभू स्फटिकाचे  असावे ,अथवा रत्नाचे बीजाला कोंब निघावा अशाप्रमाणे योग्याच्या शरीराच्या कांतीची झाक दिसते ,शुध्द चैतन्य प्रकाशाचे ते लिंग आहे कि काय असे वाटते .संपूर्ण भरीव केशराचे किंवा सिद्ध केलेल्या पारदाची ती मूर्ती वाटते .
वाटते प्रत्यक्ष शांतीने ते शरीर धारण केले काय ?आनंदाचे चित्रात भरलेला हा रंग होय वा ब्रम्ह सुखाने घेतलेले रूप होय अथवा संतोष वृक्षाचे लावलेले रोप होय -किंवा सोनचाफ्याची काळी किंवा अमृताचा पुतळा होय -अथवा कोमल पणाचा भराला आलेला मळा होय ,हे शरीर जसे मूर्तिमंत चंद्राचे तेजच आसनावर बसलेले होय
         या देहाला यमही भितो -वार्धक्य मागे फिरते -बाळ दशा प्रकट होते -तारुण्य व जरा नाहीसे होतात ,पण त्यात अफाट बल व धैर्य असते .
सुवर्ण वृक्षाच्या पानावर रत्नाची नित्य नवी कळी यावी त्याप्रमाणे नवीन नखे त्यास येतात .हिर्यासारखे बारीक पण कांतिमान दातही नवे येतात .माणीकाच्या अणु समान कळ्याप्रमाणे योग्याच्या शरीरावर रोमांची सूक्ष्म अग्रे निघतात .हातापायाचे तळवे तांबड्या कमळाप्रमाणे असतात -योग्याची दृष्टी पापण्यात न मावता आकाशाला कवटाळू पाहते .हा देह सुवर्णमय कांतीचा पण वायुरूप हलका असतो ,कारण पृथ्वी व आप याचे अंश त्यात नसतात .तो केवळ वायुरूप असतो .मग हा योगी समुद्रा पलीकडचे पाहू शकतो .स्वर्गातील शब्द ऐकू शकतो व मुन्गीचेही मनोगत जणू शकतो -त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात
श्री ज्ञानेश्वरांच्या समाधिस्थ रूपाचेच हे वर्णन वाटते .

shuknalika drushtant

सहाव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला गीतेच्या अर्थाचे सार असा योगरूप अभिप्राय सांगताना म्हणतात ,
विषयांच्या ठिकाणी व कर्माच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता ,सर्व संकल्पांचा त्याग करून जो केवळ कर्तव्य असे कर्म करतो व कर्मफलाचा त्याग करतो तो खरा योगी होय. पण हा अहंकाराचा त्याग स्वतःच स्वतःला जिंकून करायचा असतो तरच कल्याण होईल ,अन्यथा कोश किड्या  प्रमाणे आपणच आपला शत्रू होतो .ही गोष्ट नीट समजविण्यासाठी ते शुक  नलीकेचा दृष्टांत देतात .
पोपटाला बसण्याकरिता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यावर जेंव्हा पोपटाच्या  वजनाने नळी उलट बाजूला फिरते ,तेंव्हा वास्तविक पोपटाने उलटे होण्यामुळे उडून जावे ,,पण ही नळी सोडली तर आपण पडू वा मरू या शंकेने तो नळीला आपल्या चवड्यात धरूनच राहतो ,व    मनात म्हणतो कि मी याला बांधला गेलो आहे ,अशा रीतीने कल्पनेलाच बांधला जाऊन तो आपला मोकळा असलेला चवडा अधिकच गुंतवतो -आता त्याला ओढून ,अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडत नाही -या पोपटाला दुसर्या कोणी अडकवले नसून त्याच्या मिथ्या कल्पनेनेच अडकवले आहे .
  याचप्रमाणे ज्या पुरुषाने आपला देहाभिमान व संकल्प स्वतःच वाढविला आहे ,तो आपणच आपला शत्रू होऊन प्रपंच रुपी नळीला स्वतःच चिकटून राहतो व त्यामुळे संकल्प मुक्त आत्म्याच्या स्वतंत्र रूपाचा त्याला अनुभव येत नाही .अविवेकामुळे ,अविध्येमुळे तो स्वतःच स्वतःचा घात करून घेतो .

Saturday, February 9, 2013

sadguru/ganendra rupak

ज्ञानेश्वरीतील प्रास्ताविके हा ज्ञानदेवांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कार आहेत ,म्हणून ती अनन्य साधारण आहेत .सतराव्या अध्यायात आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्यावर गणेन्द्राचे रूपक रचून त्यांनी गुरुपूजा केली आहे हा अक्षर यज्ञ  असल्याने येथे पूजाही अक्षर पूजा आहे .निवृत्तीनाथ व ज्ञानदेव या गुरुशिष्य जोडीचे भावनिक व अध्यात्मिक नाते या मंगलाचरणातून उलगडत जाते .
श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,जीवरूपी गणांचा स्वामी असलेल्या सद्गुरुरूपी गजेंद्र तुला नमस्कार असो .शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्या आधी गणपतीची स्तुती केली ,तसे सत्व ,रज व तम रुपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभाव रुपी किल्ल्यात अडकलेला आत्मा ,तो शिवाने तू गुरुरूपी गणेशाची प्रार्थना करून सोडवला ,म्हणून तू शिवापेक्षा श्रेष्ठ आहेस .त्याचवेळी मुमुक्षुना  तू मायाजालातून तरतोस ,म्हणून तू भोपळ्या सारखा  हलका आहेस .
इथे त्रिगुण =त्रिपुरारी राक्षस ,जीवात्मा =आत्मरूप शंकर ,सद्गुरु =गजेंद्र असे रूपक रचले आहे .
श्री गजानना प्रमाणेच गुरूच्या ज्ञान दृष्टीच्या संकोच व विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय सहज घडतात .त्याच्या प्रकृतीरूपी  कानाच्या हालचालीने व  गंड स्थळातील मदाच्या सुवासाने जीवरूपी भ्रमर गोळा  होतात व निवृत्ती रुपी कानाच्या हालचालीने हा खेळ उधळला जातो .
माया ही तुझी स्त्री ,तिची नृत्य क्रीडा हा जगताचा आभास ,तोम्हणजे आपल्या अस्तित्वावर दाखवतोस .
श्री गजाननाच्या मुखाप्रमाणेच जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत ,त्यांच्या पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस ,पण ज्ञानवानाना तू नेहमीच सन्मुख आहेस .
कर्म ,ज्ञान ,योग व भक्ती ,कोणत्याही मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचताना सात्विक वृत्तीचे महत्व श्री ज्ञानेश्वरांनी सर्वच अध्यायात मांडले आहे .हा विचार लक्षात घेता गणेंद्र म्हणजे इंद्रिये ताब्यात ठेवणारा गजानन ही प्रतिमा वापरण्याचे महत्व कळते .या गुरुरूपी गणेंद्र याने डोळे उघडले कि विश्वाची उत्पत्ती होते व त्याच्या योग निद्रेत विश्वाचा लय होतो म्हणून त्याचा"विश्व विकासिनी मुद्रा "असा उल्लेख केला आहे .
समुद्राची अथांगता व दिव्याची प्रकाश मयता ही गुरूंच्या ठिकाणी असून आपण रिकामी घागर अथवा दिव्याची वात आहोत असा विनम्र भाव ते शेवटी व्यक्त करतात व मीठ पाण्यात विरघळते त्याप्रमाणे या नमनाने गुरूशी एकरूपता साधण्याचा आपला हेतू व्यक्त करतात .

sanjayache bhavishy

अठराव्या अध्यायाच्या अखेरीस धृतराष्ट्राने संजयास प्रश्न विचारला कि सांप्रत जे युध्द सुरु आहे त्यात शेवटी कोणाचा जय होईल ?संजय ,तुझे भविष्य जसे असेल तसे सांग .
यावर संजय म्हणाला ,महाराज ,चंद्र तेथे चांदणे ,शिव तेथे शक्ती ,संत तेथे सुविचार असायचाच ,त्याप्रमाणे ज्या स्वामींच्या योगाने चारही पुरुषार्थ सनाथ झाले तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच .आणि ज्याच्या जवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मि आहे त्याच्या सर्व सिद्धी दासी होतात  .कृष्ण हा स्वतः विजयाचे स्वरूप आहे -तो ज्या बाजूला त्या बाजूला जय त्वरेने मिळायचाच .अर्जुनही विजय नावाने प्रसिध्द आहे ,व जेथे लक्ष्मि तेथे विजयही निश्चित आहे .त्या अर्जुनाला श्रीकृष्ण व लक्ष्मि हे मायबाप असताना त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरू का होऊ नये ?त्याच्या देशाचे सर्व दगड चिंतामणी का होऊ नयेत?राजा विचार कर ,यात काही आश्चर्य आहे का ?ज्याचा बाप श्रीकृष्ण व आई लक्ष्मी आहे त्याच्या आधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत .ज्या पक्षाला लक्ष्मिपति उभा आहे तेथे मूर्तिमंत सर्व सिद्धी आहेत .याशिवाय अधिक मी दुसरे काही जाणत नाही
परिस हा लोखंडाला सुवर्ण रूप देणारा गुरु असला तरी जगाला पोसणारा व्यवहार सोनेच जाणते ,त्याप्रमाणे देवांच्या सामार्थ्यानेच बलवान झालेला अर्जुन देवा पेक्षाही अधिक बलवान आहे ,अशी ही अर्जुनाची स्तुती देवाला अधिक आवडते ,कारण आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाची इच्छा असते .ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी अर्जुनरुपाने फळाला आली .श्रीकृष्ण कृपेने अर्जुन असा झाला कि तो जेथे तेथेच विजय यात तुला शंका वाटत आहे का ?म्हणून जेथे लक्ष्मि ,श्रीकृष्ण व अर्जुन आहेत तेथे विजय निश्चित आहे ,या बोलण्यास अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणवणार नाही अशी संजयाने गर्जना करून हात वर केला .

sant sabha

अठराव्या अध्यायाच्या उपसंहारात गुरुगौरवा नंतर श्रोत्यातील संतांचा गौरव करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,
श्री गुरूंचा पुरोहित बनून मी जे काही बोललो त्याचे कमी -जास्त तुम्ही माउली प्रमाणे सहन केले .माझ्या गुरुनी निर्माण केलेल्या ग्रंथाची रचना मी केली ,आणि तुम्हा संतांच्या सभेत त्यात काही उणीव शिल्लक राहिली ,व पुरी झाली नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागावता येईल ,कारण कि परिसाचा स्पर्श झालेला असतानाही लोखंड जर हीन दशेला मुकले नाही ,तर तो दोष कोणाचा ?मोठ्या भाग्याने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असताना मला जगात उणे कुठे ?तुमच्याच योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो ,मला तुम्हासारखे माहेर आहे ,म्हणून हा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला .
गीतेच्या अर्थाचे मर्म सांगणे इतके कठीण आहे कि त्यापेक्षा कल्पतरूचे बगीचे लावणे कठीण नाही .सातही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे ,तार्यांचे चंद्र करणे सोपे आहे ,पण हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा झेंडा जो नाचतो आहे ,तसेच गीतार्थाच्या आवारात अठरावा अध्याय रुपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून मी त्याठिकाणी गुरु मूर्तीची पूजा करत आहे ,ही तुमचीच पुण्याई आहे .जी जी आशा धरून मी तुमच्या विषयी खात्री बाळगली ,ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत .माझ्या संपूर्ण जन्माचे फल मला प्राप्त करून दिलेत .तुम्ही माझ्याकरता ग्रंथाची जी प्रतिसृष्टी उभी केलीत ती पाहून आम्ही विश्वमित्रालाही हसुत .,कारण त्याची सृष्टी नाश पावणारी होती ,तर ही ग्रंथ रुपी सृष्टी अविनाशी आहे .
म्हणून तुम्ही संतानी माझ्यावर हा ग्रंथरूपी उपकार केला तो त्रैलोक्यात निरुपम आहे . तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे आख्यान शेवटला गेले व याठिकाणी माझा फक्त सेवक पणा उरला ,म्हणून आता मी पसायदान मागतो .