Monday, May 21, 2012

yogsadhana

योगसाधनेसाठी मागे सांगितल्याप्रमाणे स्थळ आणि स्थानाची निवड करून आसनावर बसून प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे .त्यामुळे आपला अहंकार मावळतो .मग मन एकाग्र करावे .
विषयांचा विसरू पडे ।इंद्रियांची कसमस मोडे ।मनाची घडी घडे ।हृदयामाजी ।6 -188
अशी मनाची स्थिरता साधावी .
वज्रासनात बसावे .प्रथम मुल बंध साधावा ,म्हणजे जे आधारचक्र गुदाच्या  समोरअसते  तेथे ताचेने  दाब द्यावा ,त्याचवेळी टाचेवर आपले शरीर ताठ तोलून धरावे म्हणजे खालचा मार्ग बंद होऊन अपानवायू कोंडला जातो .
मान आणि मस्तक हे ताठ, स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे दृष्टी लावलेली ,मग दृष्टी आत वळून शीर खाली केल्याने गळ्याखाली हनुवटी अडकून बसते आणिविशुध्द चक्रावर जो बंध पडतो त्यास जालंदरबंध असे म्हणतात .पोट आत ओढल्याने मणिपूर आणि स्वाभिमान चक्रास जो बंध पडतो त्यास वोधीयाना बंध म्हणतात .
अंतकरण शांत असलेला ,भितीरहित ,ब्रह्मचर्या व्रताचे पालन करणारा ,मनाचे संयमन केलेला, माझ्या ठिकाणी  चित्त ठेवणारा असे होऊन सर्व बंध लावून आसनावर बसावे .शांत शरीर आणि मनास भूक आणि झोप यांचीदेखील आठवण रहात नाही .मुलबंधाने  कोंडलेला  अपानवायू गुरगुर करून मणिपूरचक्राला धक्के देतो ,कफ .पित्त ,कोठ्यातील घाण,बाहेर काढतो ,मेदाचे पर्वत फोडतो ,हाडातील मज्जा बाहेर काढतो ,नाड्या  मोकळ्या करतो .शरीरातील पृथ्वी आणि पाण्याचे अंश एक करतो .मग या वज्रासानातील उष्णतेने कुंडलिनी शक्ती जागी होते नाभिस्थानाजवळ साडेतीन वेढे घेवून अग्नीच्या ज्वालेप्रमाणे निजलेली ती जागी होताच 
हृदय कोशातील वारा खाऊन  टाकते ,मग सप्त धातूंना पिऊन शरीर फक्त त्वचा आणि हाडाचे शिल्लक ठेवते .मग शांत होऊन ती सुशुम्नेजवळ राहते .प्राणायामाने कोंडलेला प्राणवायू आणि अपानवायू यांची भेट होते पण शत चक्राचे पदर त्यांना वेगळे ठेवतात .
शांत झालेली कुंडलिनी तोंडाने अमृताचे गरळ ओकते ,त्या अमृताने प्राण जगतो ,सर्व गात्रांची गेलेली शक्ती परत येऊ लागते .पण शरीराचे धर्म राहत नाहीत .इडा ,पिंगला या नाड्या एक होतात ,शत चक्रे यांचे पदर फुटतात .श्वास बंद होतो ,बुद्धी चैतन्यात नाहीशी होते तेंव्हा  चान्द्रमृताचे तळे  तिरपे होऊन ते अमृत कुन्द्लीनीच्या मुखात पडते आणि तो रस सर्व अंगात भरतो .आता शरीराच्या आकाराने जणू काय मूर्तिमंत तेजच प्रकट होते .या देहात पृथ्वी आणि पाण्याचे अंश नसतात म्हणून तो वायुसारखा हलका होतो .कुंडलिनी जेंव्हा हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते तेंव्हा ती अनाहत शब्दाने बोलते ,तो नाद हृदयात घुमतो तेंव्हा ब्राह्म्स्थानाचे द्वार आपोआप उघडते ,तेथे चैतन्य वसलेले असते ,त्या चैतन्याला कुंडलिनी आपले तेज अर्पण करते आणि आपण केवळ प्राणवायुरूप  होऊन त्या शक्तीमध्ये एकरूप होते .जेंव्हा कुंडलिनी याप्रमाणे चैतन्याशी एकरूप होते तेंव्हा त्यांचा देहाकार हा परब्रह्माचे रूपच असा दिसतो .जे पंचमहाभूतांचे बीज ,सूर्याचे तेज ,त्रैलोक्याचे कारण ,मनरहित अवस्थेचे सौंदर्य,नित्य सिद्ध व अमर्याद आहे ,अष्टांग योगरूपी वृक्षाचे फल ,आनंदाची जीवनकला आहे ,ते माझे खास स्वरूप आहे असे भगवंत म्हणतात

Wednesday, May 9, 2012

sadhana sthal

कुंडलिनी योग गीतेत नसलेले पूर्णपणे ज्ञानेश्वरांनी घेतलेले प्रकरण आहे .कारण स्वतः ज्ञानेश्वर नाथपंथीय   आहेत आणि हा कुंडलिनी योग त्यांच्या पंथातून आलेला आहे .ते म्हणतात की तुझा देहच ब्रम्हरूप कसा होईल याचा  मार्ग कुंडलिनी योग आहे .हा योग करायचा असेल तर कुठे जावे ?याचे उत्तर अतिशय चित्रमय भाषेत त्यांनी दिले आहे.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य ।अशाठिकाणी जा जे स्थळ निर्मल ,पवित्र असेल .जिथे नदी वाहत असेल .बाराही महिने स्वच्ह पाणी मिळेल .वनश्री सुंदर असेल ,फुल फुललेली असतील ,पण भुंग्यांचा आवाज येणार नाही .एखादा दुसरा पोपट किंवा मयूर आवाज करून गेले तर चालेल ,पण त्यांचा कलकलाट नको .माणूस तर नकोच .एखादे मंदिर असावे शंकराचे ,अशा ठिकाणी तू बैस .
त्या स्थानी पूर्वी काही साधकांनी तपश्चर्या केली असावी .तेथे अमृतासारखी फळे नेहमी देणारी  झाडे असावीत ,उन्हे सौम्य असावीत ,वर मंदमंद वाहत असावा ,श्वापदे असू नयेत ,असा ठिकाणी मन स्थिर राहते  कि नाही ते पाहावे .ते स्थानच आपले भटकणारे मन स्थिर करणारे ,वैराग्याला जागे करणारे असावे .
या ठिकाणी आसन  लावावे .टोके असलेले दर्भ तळाशी घालावेत .दर्भ कोवळे असावेत .त्यावर शुध्द कृष्णाजिन असावे ,वर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी .आसन फार उंच असू नये ,फार सखोल असू नये .अशा आसनावर बसून प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे .मग मन एकाग्र करून साधना आरंभ करावी .

Monday, May 7, 2012

kundalini shakti

सार्या ब्रह्मांडाला आधारभूत असलेली शक्ती मानव शरीरातही आहे .ती आत्म्याची शक्ती ,प्राणशक्ती .श्री ज्ञानेश्वर तिचे वर्णन करताना म्हणतात 
 ते कुंडलिनी जगदंबा ।जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा ।
जिया विश्व्बीजाचीया कोम्भा। साउली  केली  ।6 -272 
जे शून्यलिंगाची पिंडी ।जे परमात्मया शिवाची करंडी ।
जे प्राणाची उघडी ।जन्मभूमी ।6 -273  
याभगवतशक्तीचे जे  साडेतीन वेढे आहेत ,ते म्हणजे ओंकाराच्या 'अ ''उ 'म 'आणि अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रांची मुल स्थिती होय . ; मी; या वृत्तीरुपाने ती जिवामध्ये अस्तित्व दर्शवते .अज्ञानाने ती आपले हे रूप विसरते आणि सत्व रज तम या त्रिगुणात्मक होते .सत्वगुणाने ती प्रकाशरूप असते ,रजोगुणाने क्रियारूप होते ,तर तमोगुणाने जड पदार्थ रूप होते ,म्हणजेच ती निजलेली असते .म्हणजे आपण म्हणजे चैतन्य हे विसरलेली असते ,ती खाली बघत असते म्हणजे परमात्म्याला विसरून ती कार्यरूप सृष्टीकडे पाहत असते .अधोमुख असते .या स्थितीत ती जगाचा विचार करते .ती जेंव्हा जागी होते ,ऊर्ध्व मुख होते तेंव्हा  ती जगत  कल्पनेचा नाश करून ब्रह्ममय  होते .तिचे रूप तेजोमय होते .ही प्राणशक्ती जेंव्हा ब्रम्ह रूपाशी  ऐक्य स्थितीत येते तेंव्हा ओम्कारही लुप्त होतो .आकार म्हणजे मन .मकार म्हणजे चित्त ,उकार म्हणजे बुद्धी ,अर्धमात्रा म्हणजे अहंकार  ,हे सर्व नाहीसे होतात ,ब्रह्म रूपाशी ऐक्य पावतात ,हे योगमार्गाचे उद्दिष्ट आहे .
या कुंडलिनीची जागृती योगाभ्यासाने ,वैराग्याने ,ज्ञानाने ,भक्तीने ,प्राणायामाने अथवा सद्गुरूच्या कृपेने होते .हिचे चित्र रूप वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात 
नागिणीची पिले ।कुंकुमे नाहले ।वळण घेऊन आले ।सेजे जैसे ।6 -222
तेसी ते कुंडलिनी ।मोठ्की औत्त वलनी।अधोमुख सर्पिणी ।निदेली असे ।6 -233 

Sunday, May 6, 2012

shatchakre ani teen nadya,teen bandh

जीवाची शक्ती कार्य रूप होताना ती सूक्ष्म नाड्यामधून वाहते .या नाड्या मांसमय नाहीत ,या शास्त्राने तुटत नाहीत ,अग्नीने जळत नाहीत ,शरीर राख झाले तरी त्या वासना रूपाने जीवाला बांधतात .इडा ,पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्या आहेत .या नाड्या व चक्रे ही फक्त योग्यांना अनुभवाने जाणवतात .
1 आधार चक्र -हे चार दलाचे ,अग्नीप्रमाणे तेजस्वी आहे .हे गुद्स्थानाचे ठिकाणी आहे
वज्रासनात बसून उजव्या पायाच्या ताचेने  हा भाग दाबला असता मुल बंध लागतो, आणि पोटातील अपानवायू कोंडला जातो .
 2 स्वाधिष्ठान चक्र -हे सहा दलाचे ,सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे .ते लिंग स्थानी आहे .
3 मान्निपूर चक्र -हे दहा दलाचे ,रक्त वर्ण आहे .हे नाभिभागाजवळ आहे
बेंबीवर दाब देऊन पोट खपाटीला जाते ,तेंव्हा वोधीयाना बंध लागतो .
4अनाहत चक्र -हे बारा दलाचे आहे ,सुवर्ण वर्णाचे आहे ,हृदयाजवळ याचे स्थान आहे 
5 विशुध्द चक्र -हे सोळा दलाचे आहे ,याचा वर्ण चंद्रासारखा आहे 
कंठ प्रदेशाजवळ याचे स्थान आहे .
जेंव्हा  गळा आकुंचित होऊन हनुवटी गळ्याखाली अडकून छातीवर दाबून बसते ,तेंव्हा जालंधर बंध पडतो .
या चक्राच्या डाव्या बाजूस इडा उजव्या बाजूस पिंगला व मध्य भागी सुषुम्ना नाडी आहे  
6 आज्ञाचक्र -हे दोन दलाचे आहे .हे रक्तवर्ण आहे .हे दोन्ही भुवयामध्ये आहे ,

ashtangyog

योगाची आठ अंगे 
1 यम -1 अहिंसा 2 सत्य 3 अस्तेय (दुसर्याच्या वस्तूबद्दल अभिलाषा न बाळगणे )4 ब्रम्हचर्य 5 अपरिग्रह (असंग्रह ) यम याचा अर्थ न बदलणारे ,देशकाल परीस्तीतीनुसार न बदलणारे शाश्वत गुण 
2 नियम 1शौच (शरीरशुद्धी )2 संतोष 3 तप (व्रत वैकल्ये )4 स्वाध्याय (अभ्यास )5ईश्वर प्रणिधान (नामस्मरण ) नियम म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारे गुण ,यांच्यामुळे धर्माची उत्क्रांती होत असते 
यम नियम आपले जीवन व्रतस्थ बनवतात .
3 आसने 
4 प्राणायाम 
5 प्रत्याहार (इंद्रीयावरील  ताबा )
6धारणा -सतत अभ्यासाने अंगी येणारे वैराग्य 
7 ध्यान -धारणा आत्मसात केल्यावरच ध्यान पूर्णपणे साधते 
8 समाधी -सर्वत्र सम भाव निर्माण झाला कि मी ध्यान करतो ही जाणीवही नाहीशी होते ,साध्य आणि साधन याची एकरूपता होते अशी स्थिती .
या आठ अंगाची ओळख अधिकारी व्यक्तीकडून करून घ्यावी लागते 
असा योगी कसा दिसतो हे सांगताना भगवंत म्हणतात 
तरी ज्याचिया इंद्रीयाचीया घरा।नाही विषयांचिया येरझारा ।जो आत्म बोधाचिया वोवरा ।पहुडला असे ।
जायचे सुख दुखाचेनी अंगे ।झगटले  मानस चेवो नेघे ।विषयपासीही आलिया से न रिघे ।हे काय म्हणुनी ।
हे ऐकून चकित झालेला अर्जुन म्हणाला ,त्याला अशी योग्यता कोण देतो ?उत्तरादाखल भगवंत म्हणतात 
उध्दरेत आत्मना आत्मानं नात्मानंवासादयेत ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।5 
आपण आपला उध्दार करावा ,आपला घात करू नाही  ,आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत ,स्वतःचे स्वतःच शत्रू आहोत .

Thursday, May 3, 2012

dhyanmarg

सहाव्या अध्यायात परमेश्वर प्राप्तीचा ध्यानमार्ग सांगितला आहे ,
हा मार्ग बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे ,तो शब्दात व्यक्त करणेही अवघड आहे ,पण सद्गुरूचे कृपेने हे अतींद्रिय ज्ञान श्री ज्ञानेश्वरांना प्राप्त झाले ,ते मी श्रोत्यांना इंद्रीयाकरवी भोगवीन ,अरुपाचे रूप दाखवीन अशी ते प्रतिज्ञा करतात .
तेणे कारणे मी बोलेन ।बोली अरुपाचे रूप दावीन ।अतींद्रिय परी भोगवीन ।इंद्रीयाकरवी ।6 -36
सर्व प्रथम योगमार्गाने जाताना मनातील संकल्प सुटला पाहिजे ,त्याची इंद्रिये काम करीत असली तरी मनात फलाशा नसावी ,तरच तो योगी होऊ शकतो हे ते स्पष्ट करतात .या ध्यानमार्गात प्रत्यक्ष आदिनाथ महेश हि वाटसरू बनला आहे , व तो योगमार्गीना मार्गदर्शन करतो असे ज्ञान देव सूचित करतात -पुढे ते सांगतात कि या मार्गावर तहान भुकेची शुध्द रहात नाही ,रात्र कि दिवस याचे भान राहत नाही ,जेथे पावूल  पडेल तेथे मोक्षाची खाणच सापडते ,स्वर्ग सुखाचा लाभ होतो ,असे या मार्गाचे महत्व ते सांगतात .या मार्गाने जात असताना ज्या गावास जायचे ते गावच आपण होतो  हा या प्रवासाचा विशेष ते सांगतात .
येणे मार्गे ज्या ठाया जाएजे ।तों गांवो आपणची होईजे ।हे सांगो काय सहजे ।जाणसी तू ।6 -160 
ही योगसाधना पूर्णत्वास पोहोचली असता प्राणरूप शक्ती ही जेंव्हा  ब्रह्मरूप प्राप्त करून घेते त्याला सिद्ध योग हे नाव दिले आहे .हा ऐक्यानुभव म्हणजे योगद्रुमाचे फल ,महातेजाचे तेज ,तुर्येचे तारुण्य अशा विविध उपमांनी त्याचे वर्णन करून हा शब्दातीत अनुभव ज्ञानदेवांनी शब्द गोचर केला आहे .

Tuesday, May 1, 2012

jeevanmukt purushachi lakshane

पाचव्या अध्यायातदुसर्या  भागात जीवन्मुक्त पुरुषाची लक्षणे वर्णन केली आहेत 
मनुष्य जोवर देहधारी आहे ,तोवर काम क्रोधाच्या आधीन  असतोच ,पण जीवन मुक्त त्यांना जिवंत पणीच जिंकतो .कारण त्याला आत्मानंदात अधिक गोडी वाटते .हे त्याचे मोठे लक्षण .  एकदा ही गोडी चाखल्यावर कोणी इंद्रिय विषयांकडे वळणार नाही हे सांगताना ते म्हणतात ,
सांगे कुमुद द्लाचेनी ताटे ।जो जेविला चंद्र किरण चोखते ।तो चकोर काई वाळूवनटे ।चुंबितु आहे ।
जो कमळाच्या पानावर चंद्रकिरण जेवला तो चकोर वाळू चाखून  बघेल काय ?
यानिवृत्त वृत्तीमुळे तो कर्म फलाविषयी उदास असतो ,म्हणून तो कर्म करूनही अकर्ता असतो ,प्रत्यक्ष कर्मत्याग करण्याची त्याला गरज नसते .या अकरतेपणाची तुलना  प्रत्यक्ष ईश्वराशी केली आहे .
जैसे का सर्वेश्वरू ।पाहिजे तव निर्व्यापारु ।परी तोची रची विस्तारू ।त्रिभुवनाचा ।5 -76
इथे जीवन मुक्ताच्या या अकरतेपणाची तुलना प्रत्यक्ष ईश्वराशी केली आहे .जसे ईश्वर स्वतः काही न करताही त्रिभुवनाचा व्यापार घडवून आणतो ,त्याप्रमाणे जीवन्मुक्त सर्व कर्मे करूनही अकर्ता असतो' याच जाणीवेमुळे त्याची जगाबद्दल ईश्वराप्रमाणे  समदृष्टी होते .आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपण आणि हे विश्व यातील एकरूपत्व जाणवणे म्हणजेच देहात असतानाच ब्रह्मरूप होणे ,म्हणून तो जीवन्मुक्त
अशा पुरुषाचे पुढे वर्णन करताना ते म्हणतात की प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद माणू  नये  आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग  पावू नये अशी समदृष्टी ज्याची आहे तो स्थिरबुद्धी सर्वज्ञ ब्त्राम्ह्सुखाच्या ठिकाणी स्थिर होऊन अक्षय आनंदाचा अनुभव घेतो.