Monday, July 30, 2012

vishwrupdarshan

विश्वरूपदर्शन हा अकराव्या अध्यायाचा गाभा आहे .श्रीकृष्णाने धारण केलेल्या विविध व्यापक रूपांच्या वर्णनात ज्ञानदेवांच्या प्रतिभेच्या अलौकिकतेचा व उत्तुंगतेचा प्रत्यय येतो .मुळात हे एक भव्य प्रसंग चित्र  आहे ,आणि त्याची विशालता ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने चैतन्यमय केली आहे .हा अनुभव शब्दात पकडणे ज्ञानदेवांना शक्य झाले कारण तेही या अनुभवाचा जणू एक भागच बनून गेले होते .त्यांच्याच अनुभवाची अनुभूती ते वाचकाला शब्दातून देत आहेत असे जाणवते व तो अनुभव हृदयस्पर्शी बनतो .
विश्वृपातून कितीतरी प्रकारच्या ,आकाराच्या ,वृत्तीच्या आकृती प्रकट होत होत्या .कृश ,स्थूल ,ठेंगणी ,उंच ,शांत ,मदांध ,निर्विकार ,आनंदित ,जागृत ,निद्रित अशी विविधता त्यात होती .त्यातही काही मुखे लालनपालन करणारी ,तर काही संहारक ,काही रौद्र तर काही प्रेमळ ,काही धुंद तर काही क्रुध्द ,त्यांच्या रंगातही विविधता -कुणी तप्त सुवर्णाप्रमाणे ,कुणी पिंगट ,कुणी शेंदूरवर्णी   ,कोणी कुंकुम वर्णाचे  ,कोणी तप्त ताम्ब्यासारखे ,काही स्फटिकासारखे स्वच्छह ,काही इंद्रनील वर्णाचे तर काही काळेभोर .
विश्व रूपाच्या प्रचंड मुखावर आदित्य वसू  ,अश्विनकुमार ,रुद्र व वायू हे अमर्याद स्वरुपात स्थित दिसत होते .या विश्व्मुर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी अनेक सृष्ट्या दिसत होत्या .व अनेक ब्रम्हांडे वर खाली भ्रमण करताना दिसत होती .या विश्व रुपात पृथ्वीचा आकार नाहीसा झाला ,आकाश ,सारे स्थावर पदार्थ ,व महाभूते त्याने गिळून टाकली .
 दिव्य्माल्यामबरधरम दिव्य गन्धनुलेपन्म ।

सर्वाश्चर्यमयं देवं अनंतम विश्वतोमुखम ।
दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेला ,दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती ,सर्व आश्चर्यानी युक्त ,अनंत ,सर्वतोमुख ,दिव्य स्वरूप असलेला देव अर्जुनाने पहिला .
ह्या विश्व रूपाचे दर्शन घेताना अर्जुनाचे मन बुद्धी ,व इंद्रिये शांत ,स्तब्ध व एकाग्र झाली .जणू त्याच्या ज्ञानाला मोहिनीअस्त्र घातले .त्याच्या चारी बाजूनी हे विश्व रूपच अनेक रूपे होऊन सर्व अवकाश व्यापून राहिले .त्या रुपाची प्रभा हि  प्रलयकालच्या महातेजाची प्रभा होती .त्याच्या हातातील शस्त्रे हि  प्रलयकालच्या अग्नी ज्वालानाही तोडणारी होती ..या मूर्तीच्या शृंगारातील वस्त्रे ,पुष्पे ,गंध यांची शोभा पाहताना अर्जुन भांबावला व डोळे उघडे असताना बाहेर व मिटले असताना अंतर्यामी सर्वत्र त्याला विश्व रूपच दिसू लागले .अशारितीने अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे सर्व भगवंतानी व्यापून टाकले .त्या विश्वरूपसागरात  आपले सर्व जग त्याला बुडबुड्याप्रमाणे दिसले ,व याच्या तेजाला हजारो दिव्य सूर्याच्या तेजाची उपमाही पुरणार नाही असे त्याला वाटले .या तुझ्या रुपात तुझा आरंभ ,मध्य व शेवट कोठे आहेत असे शोधू गेले असता कळते कि हे तिन्ही तुझ्या ठीकाणी नाहीत .
विश्व रूप दर्शनाच्या ज्ञानेश्वरांच्या शब्दातील वर्णनाने जे उग्र व संहारक दर्शन घडते त्याने भयभीत झालेली सारी सृष्टी जणू दुखःकालिंदीच्या तटावरील झाड होऊन स्तब्ध उभी राहिली होती .

Saturday, July 28, 2012

bhagvantache vishrantisthan

ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचा निर्देश ज्ञानेश्वरांनी "भगवंताचे विश्रांतिस्थान "असा केला आहे .
तो हा अकरावा अध्यायो ।जो देवाचा आपणपे विसंवता ठावो ।13
जे विश्वरूप नारद इत्यादी अनेकांनी वर्णन केले ,पण पाहिले कोणीच नाही ,ते फक्त भगवंताच्या द्वारेच पाहता येईल हे अर्जुनाला उमगले व म्हणून त्याने हे विश्वरूप दर्शन घडवण्याची भगवंताना प्रार्थना केली .अर्जुन हा भगवंताचा अनोन्य भक्त असल्याने आपले चतुर्भुज रूप सोडून विश्वरूप प्रकट करण्यास भगवंतांनी जराही विलंब लावला नाही .हा विश्वरूप दर्शन सोहोळा मराठीतून वर्णन करण्याने सर्वास  त्याचा आनंद उपभोगता आला .येथे शांत रसाच्या  घरी अदभूत रस पाहुणा आला आहे व इतरही सारे रस वर्हाडी बनून आले आहेत .
तीर्थस्थानी भगवंताचा निवास असतो ,आणि अकरावा अध्याय हा प्रयाग तीर्थच बनला आहे कारण तेथे शांत व अद्भुत हे दोन रस गंगा व यमुना बनून त्यांचा मिलाप होतो, तसेच गीता ही या संगमात गुप्त सरस्वती आहे .म्हणून हा त्रिवेणी संगम सर्वाना प्राप्त झाला आहे .श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि मला कारण करून करून माझे गुरु निवृत्तीनाथ यांनीश्रवणाच्या  द्वाराने या तीर्थात प्रवेश करणे सर्वाना सोपे केले आहे ,म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक बुद्धीने स्नान करून जसे प्रयागतीर्थी माधवाचे दर्शन घेतात तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे व संसाराला तिलांजली द्यावी .
पुठे ते म्हणतात कि ह्या अध्यायात मोक्ष स्पष्ट झाला आहे .हा अध्याय देवांचे खास विश्रांतीचे स्थान आहे व अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे ,कारण तो येथे येऊन पोहोचला आहे .
जनसामान्यासाठी प्रयाग तीर्थात बुडण्याची भीती असते ,ती येथे नाही ,म्हणून सर्वांनी येथे भगवंताचे दर्शन घेण्याने संसाराचे बंध तुटतील हे ज्ञानेश्वरांचे आश्वासन सर्वांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते .

Friday, July 27, 2012

vibhutiyog

दहाव्या अध्यायाला विभूतियोग असे म्हटले आहे .विभूती =अधिक प्रमाणात ईश्वराचा अंश असणारी व्यक्ती
प्रतिविभूती =ईश्वरांशाचे जगतात दिसणारे प्रातिनिधिक स्वरूप ,हे अभिन्नत्व अर्जुनाला पटवून देणे हा या अध्यायाचा हेतू होय .सर्वात्मक ईश्वराची जाण येऊन जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत ही स्थिती येण्यासाठी अभेदभक्ती अंगी बाणवताना  विभूतींचे हे ज्ञान कामी येते .
भगवंत म्हणतात ,एका परमात्म्याचीच रूपे सर्वत्र आहेत ,.मी सर्वांचा आदि व निर्विषय असल्याने देव ,ऋषी ,वेद यांचेकडून जाणला जात नाही ,अशा आत्मतत्वाचे दर्शन अशक्य आहे ,पण इंद्रियास पाठमोरे होऊन भुतांच्या माथ्यावर चढले असता ते शक्य होते .
आपल्या विभूती असंख्य आहेत असे  सांगून मग भगवंत मुख्य 75 विभूतींचे कथन करतात
1बारा आदित्यामध्ये एक विष्णु ,2तेजस्वीपदार्था मध्ये एक सूर्य 3 वायुरुपामध्ये मी मरीचि 4नक्षत्रांमध्ये मी चंद्र 5वेदामध्ये मी सामवेद 6देवामध्ये मी इंद्र 7इंद्रीयामध्ये मी मन 8भुतांच्या ठिकाणी मी चेतना 9रुद्रामध्ये मी शंकर 10यक्ष राक्षसामध्ये मी कुबेर 11आठ वसु मध्ये मी अग्नी 12पर्वतामध्ये मी मेरू 13पुरोहीतामध्ये मी बृहस्पती 14सेनानाय्कांमध्ये मी कार्तिकेय 15जलाशयामध्ये मी सागर 16महारुशिमध्ये मी भृगु 17वाणीमध्ये मी ओम 18यज्ञामध्ये मी जप यज्ञ 19स्थावर पदार्थामध्ये मी हिमालय 20वृक्षामध्ये पिंपळ 21देवर्षी मध्ये नारद 22गन्धर्वांमध्ये चित्ररथ 23सिद्धांमध्ये कपिल महामुनी 24अश्वा मध्ये अमृत मंथनातून उत्पन्न झालेला उचैश्रवा 25गाजेन्द्रामध्ये ऐरावत 26नरामध्ये राजा 27आयुधामध्ये वज्र 28धेनुमध्ये कामधेनु 29षडरीपुत  काम 30सर्पामध्ये वासुकी 31नागामध्ये अनंत 32जलदेवता मध्ये वरुण 33पितरामध्ये  अर्यमा 34नियामका मध्ये यम 35दैत्यामध्ये प्रल्हाद 36हरण करणारामध्ये काल 37पशुमध्ये सिंह 38पक्ष्यामध्ये गरुड 39वेगवान वास्तूमध्ये वायू 40शस्त्र धारण कार्नारामध्ये राम 41मत्स्यामध्ये मकर 42नद्यात भागीरथी
43 अक्षरामध्ये अकार 44समासामध्ये द्वंद समास  मी   45काळ मी 46विश्वमुखी जगोत्पादक पुरुष मी 47सर्व संहारक मृत्यू मी 48ते 54स्त्रीलिंगीवस्तूमध्ये कीर्ती ,संपत्ती ,वाणी ,स्मृती ,बुद्धी ,धृती ,आणि क्षमा मी आहे .55चवदा सामामध्ये बृहत साम मी 56छंदामध्ये गायत्रीछंद मी 57मासामध्ये मार्गशीर्ष 58ऋतूमध्ये वसंत ऋतू मी 59कपात करणाऱ्या वास्तूमध्ये द्यूत मी 60तेजस्वी पदार्थामधील तेज मी 61सिद्धी मी 62उद्योग मी 63 वस्तू मधील सत्व मी64यादवात श्रीकृष्ण मी 65पांडवात धनंजय मी 66मुनीमध्ये व्यास मुनी मी 67कवीमध्ये शुक्राचार्य मी 68दमनाच्या साधनात दंड मी 69नीतिशास्त्र मी 70गुह्य वास्तूमध्ये मौन मी 71ज्ञानी माणसाचे ज्ञान मी 72सर्व भूतांचे बीज मी
येथ अर्जुन म्हणे देवे ।हे अपुले आपण जाणावे ।परि देखतसे विश्व आघवे ।तुवा भरले ।10-327

bhaktimaarg

भक्तीमार्गातील ईश्वरज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा भगवंतानी गीतेच्या दुसर्या व तिसर्या अध्यायात वर्णन केला आहे ,तो आहे ज्ञान प्राप्तीचा .भगवंत मानतात कि देव आणि महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. जो मला जन्म रहित ,अनादि ,व लोकमहेश्वर असे जाणतो तो मानवामध्ये ज्ञानी आहे .व तो सर्व पापापासून मुक्त होतो .यापुढील टप्पा आहे हे ईश्वराचे व्यापकपण समजून व सर्व काल माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन ते मला भजतात .
कां जे ऐसे किरीटी ।माते भजे  जो अभेदा  दिठी ।तयाचिये  भजनाचीये नाटी ।सूती मज ।109 अध्याय 10
कारण कि अर्जुना अशा अभेद भक्तीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे .
या  भक्तीयोगाचे  निशंक मनाने  आचरण करावे.
जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत ।हा भक्तियोगु निश्चित ।जाण माझा ।
जो जो प्राणी दिसेल तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजणे हाच माझा भक्तियोग आहे असे भगवंत निश्चयाने सांगतात .
याच्याही पुढील पायरी आहे कि हे भक्त माझेच स्वरूप बनतात ,या अनुभवाने तृप्त होतात ,त्याच्या भूलीमुळे जन्म मरण विसरतात .त्यांच्यातील ब्रम्हानंद ते तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात व सांगताना मिळणार्या  आनंदाने अंगाने व जीवाने विरतात
जैसी कमळ कलिका जालेपणे ।हृदयाचिया मकरंदाते  राखो नेणे ।दे राया रंका पारणे ।आमोदाचे ।127अध्याय 10
ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी  आपल्या आत असलेल्या  सुवासास दाबून ठेवू शकत नाही ,,त्याप्रमाणे हे भक्त राजा रंक सर्वास आनंद वाटतात व दिवस, रात्र ,शरीर ,मन याचे भान विसरतात .
समिपता या नंतरची पायरी आहे की अशा भक्तांना भगवंतच अशी बुद्धी देतात कि जिच्या योगाने ते भगवंताच्या समीप येतील .या भक्तांच्या वाटचालीत भगवंतच कापराची मशाल धरणारा मशालजी होऊन पुढे चालतात अशा प्रेमळ भक्तांची भगवंताच्या घरीही कमतरता असते ,म्हणून ते आपले प्रेमसुख यांच्याकरता जतन करून ठेवतात .यांच्या अंतकरणात राहतात .
हे वर्णन केलेले सारे टप्पे ओलांडण्यास अर्जुन समर्थ आहे अशी स्वतः भगवंताची धारणा आहे .

Wednesday, July 25, 2012

vishwatmak dev

दहाव्या अध्यायात वेगवेगळ्या स्वरूपातील विभूतीचे वर्णन भगवंतांनी केले .ते संपताना त्यांना शंका आली कि ही कथा अभेदभावाने अर्जुनाला कळली कि नाही ?म्हणून भगवंत अर्जुनास म्हणाले
येरा विभूती विस्तारास काही ।एथ सर्वथा लेख नाही ।म्हणोनी परिससी तू कायी ।आम्ही सांगो किती?
अर्जुना ,पृथ्वीवर उगवणार्या गवताचे अंकुर किती हे मोजता येईल काय ?याप्रमाणे माझ्या विभूतीना मोजमाप नाही -याकरिता आम्ही आपले वर्म तुला सांगतो कि सर्व प्राणीरूप अंकुराने  वाढणारे ते बीज मी आहे .जी जी वस्तू वैभवाने ,संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझ्या तेजापासून उत्पन्न झाली आहे असे समज .एकच जाण कि आपल्या एकाच अंशाने  मी हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे .
आता सामान्य विशेष ।हे जाणणे येथ महादोष ।कां जे मीची एक अशेष ।विश्व आहे म्हणोनी ।
आता हे संपूर्ण विश्व मीच आहे असे असताना एक साधारण आणि एक चांगला असा आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक का लावावा ?याकरता अर्जुना प्रत्येक वस्तुत वेगवेगळा तू मला कुठवर जाणशील ?याकरिता आता भेद भावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखा भज .
आता  पै माझेनी अंशे ।हे जग व्यापिले असे ।यालागी भेद सांडूनी सरिसे ।साम्ये भज ।
यावर अर्जुन म्हणाला महाराज ,भेद हा एक वेगळा असून ,त्यास टाकणारे आम्ही वेगळे असे तुम्ही अविचाराने बोलता ,सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरुपापुढे भेद नाही .कोणत्याही वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल ,अथवा कानावर पडेल त्याच्या अंत करणाला भेद टाकून पळतो . असा जो तू मला दैवाने प्राप्त झाला आहे तर आता भेद कोठे पहायचा ?तेंव्हा देवाने संतुष्ट  होऊन म्हटले कि   अर्जुना तुला हे पटले की नाही हे आम्ही पाहत होतो तेंव्हा तू  रागावू नकोस यावर अर्जुन  म्हणाला ,
येथ अर्जुन म्हणे देवे ।हे अपुले आपण जाणावे ।परि देखतसे विश्व आघवे ।तुंवा भरले । 

Tuesday, July 24, 2012

bhagvantaache mulswarup

उदरीचा गर्भ जैसा ।नेणे मायेची वयसा ।
आपल्या मूळ रुपाबद्दल बोलताना भगवंत म्हणतात गर्भाला आईचे वय माहित नसते ,त्याप्रमाणे मी ज्यांना उत्पन्न केले आहे ते वेद ,मन ,प्राण ,देव यापैकी कोणीही माझे मूळ स्वरूप ,त्याची उत्पत्ती याबद्दल सांगू शकणार नाही .पण जर कोणी देह इत्यादी अनात्म तत्वावरून परावृत्त होईल व पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढेल त्याला आत्म तत्वाच्या प्रकाशात माझे जन्म रहस्य कळेल .
मी या मूळ  एक  तत्वापासून पुढे मन ,मनापासून अकरा लोकपाल ,लोकपालांपासून सर्व भिन्न प्राणिजात उत्पन्न झाले -या सर्व अनेकात एक आत्म तत्व मीच आहे याची धारणा जो बाळगेल ,
जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत ।या वृत्तीने जो वागेल तो जिवंत पणीच मजप्रत येईल .
या भाषणाने संतुष्ट झालेला अर्जुन म्हणाला ,पूर्वी थोर मुनी तुझ्या वर्णनात जे सांगत त्यातले सत्य मला आता उमगले आहे .एरवी मी  नारदांच्या वर्णनाचा अर्थ न लक्षात घेता त्यांच्या गायनावरच लुब्ध होत असे .आम्हाला रागदारीचे कौतुक वाटायचे व परमार्थ कडू लागायचा ,महर्षी व्यास तुझे यथार्थ रूप समजावत त्यावेळी अंधारात सापडलेला चिंतामणी दगड म्हणून फेकून द्यावा तसे आम्ही वागत असू .कृष्णा आमच्याकडे अज्ञानाचा अंधार होता ,नव्हे आम्ही स्वतःच आंधळे होतो .पण आता काय झाले तर
ते आता वाक्यसूर्यकर तुझे फाकले ।आणि ऋषिमार्ग होते जे कथाले ।तिया आघावायान्चेची फिटले अनोळखपण  ।
आता तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या हृदयावर पडली आणि पूर्वी ऋषींनी सांगितलेल्या मार्गाचे अनोळखी पण फिटले .ऋषींनी पेरलेल्या  ज्ञानबिजाना  तुझ्या कृपेचा ओलावा लाभला म्हणून ते बीज आता अंकुरले .व तुझ्या संवादाचे त्यास फल लाभले .गुरूची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व शिकवलेले सर्व ज्ञान आपले काम करते .गुरुच्या अस्तित्वाला तो वसंत ऋतूची  किंवा शरीरातील चैतन्याची उपमा देतो व म्हणतो की केवळ आपल्या शहाणपणाने तुझी कृपा होण्या आधीच मी ज्ञान प्राप्त करून घेतो असे कोणी म्हणेल तर केवळ बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला  जाण्याजोगा तू केंव्हाच नाहीस हे मला आत्ता कळले .
तुझे वाक्य व्यक्ती न येत देवा ।आपुलिया जाणे जाणीवा ।तैसा काहीच नाही हे सदभावा ।भरवसेनी आले ।

gurugaurav2


अनेक अध्यायात ज्ञानदेव आपले अध्यात्मिक गुरु निवृत्तीनाथ यांना नमन करून निरुपणाला प्रारंभ करतात याचे कारण असे कि ते आपल्या गुरुना परमात्म स्वरूपाचे प्रतिक मानतात .गुरुसाठी त्यांनी सूर्य, गणपती ,माता इत्यादी रूपके योजिली आहेत. श्रीगुरुंच्या अध्यात्मिक स्वरूपाबद्दल ते म्हणतात
नमो सुभावभजनभाजना  ।भावेभकुमभ भंजना ।विश्वोद्भवभुवना ।श्रीगुरुराया ।
शुध्द भावाने भजन करण्यास योग्य ,संसार रुपी हत्तीच्या गन्द्स्थालाचा नाश करणारे ,व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे ,गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो .
गुरूच्या सामर्थ्याबद्दल ते म्हणतात
तुमचा अनुग्रहो गणेशु ।जै दे आपुला सौरसु । तै सारस्वती प्रवेशु ।बाळकाही अथी ।
तुमची कृपा हाच  गणेश ,तो जेंव्हा आपले सामर्थ्य देतो ,तेंव्हा सर्व विद्ध्यामध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो .
गुरूची महानता वर्णन करण्यास साधन नाही हे सांगताना ते म्हणतात
केउता कल्पतरुवरी फुलोरा ।कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ।ऐसा कवणे वासी कापुरा ।सुवासू  देवो ।
कल्पतरूचे फल मिळण्यास फुलोरा कशाला पाहिजे ?क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा?कोणत्या वासाने कापुराला सुगंधित करावे ?याप्रमाणे गुरुचे वर्णन करण्यास योग्य साधनच  नाही .
शुध्द अपरोक्ष ज्ञानाने सुसंपन्न ,विद्या कमलिनीला विकसित करणारे ,परा वाणीचे अधिष्ठान असलेल्या मूळ मायेशी विलास करणारे ,संसार अंधाराला नाहीसा करणारे प्रतिसूर्य अशा गुरुना  नमन असो .
अखिल जगाचे रक्षण करणाऱ्या ,चिंतामणिप्रमाणे आपल्या शक्तीने जगाचे मंगल साधणार्या व वनातील चंदनाप्रमाणे सर्व आप्तांना आपल्यासारखे बनवणार्या अशा सर्व जगताला आराधना करण्यास योग्य अशा श्रीगुरुना नमन असो .चकोराला जसे चंद्र ,तसे चतुर पुरुषाला आल्हाद देणार्या ,अत्मानुभावाचे राजपद भोगणार्या ,वेदातील गुणाचा सागर असणार्या ,शुध्द भाव हेच ज्यांचे भजन अशा श्रीगुरुना वंदन असो .
आपली उदार वाणी जेंव्हा :भिऊ नकोस :असे आश्वासन देते तेंव्हा नवरस रुपी दिवे प्रज्वलित होतात .आपले प्रेम हीच कोणी सरस्वती ,तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करतो .एवढ्या सर्व गोष्टी ज्यांच्या सामर्थ्याने होतात त्यांच्या वर्णनासाठी मी काय विशेषण वापरू ?म्हणून मी निमुटपणे त्यांना नमस्कार करतो हेच ठीक .
या शब्दरूपी अरण्यात हिंडताना वाचारूपी वृक्षास विचाररूपी फळे आलेली दिसत नाहीत ,तेथे गुरुकृपेने माझी वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली .माझ्या  बुद्धीला देह्तादात्म्यापासून सोडवून तिची आनंदरूपी खजिन्याची खोळी केली व मग माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसागरात महाविष्णू झाले .श्री गुरूंच्या या अनंत लीलांचे वर्णन मी कसे करू ?
आपल्या रसाळ वाणीने गुरु हे साक्षात ईश्वररूप आहेत हा भाव श्री ज्ञानेश्वर विविध अंगाने फुलवतात व श्रोत्यांना गुरुशिष्य नात्याच्या मनोहारी रूपाचे दर्शन घडवतात .

Monday, July 23, 2012

sanjayaachi bhaavsthiti

तेथ संजये माथा तुकविला ।अहा अमृताचा पाऊस वर्षला ।किं हा येथ असुनची गेला ।सेजिया गावा ।
श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकून भान हरपलेला संजय धृतराष्ट्राच्या  विरुध्द मनस्थितीचे वर्णन करताना म्हणतो ,आज येथे अमृताची वृष्टी झाली ,पण हा धृतराष्ट्र येथ असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे .
पुढे तो म्हणतो की धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासांनी धृतराष्ट्राला हा वृत्तांत सांगण्याचे निमित्ताने या ज्ञानपूर्ण संवादश्रवणाची संधी मला दिली व जन्ममृत्युच्या फेर्यापासून माझे रक्षण केले - हे बोलत असताना त्याच्या मनात अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले -त्याचे चित्त चकित झाले ,वाचा कुंठीत झाली ;सर्वांगावर रोमांच उभे राहिले ,अर्धोन्मीलित डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले .सुखातीरेकाने त्याचे शरीर कापू  लागले सर्वांगावर घामाचे थेंब जमले ,या महासुखाचे भाराने त्याच्या जीवाची आटणी होण्याची वेळ आली ,तेंव्हा श्रीकृष्णार्जुनाचे बोलणे धोधो  अशा गर्जना करीत त्याचे कानावर आले ,त्यामुळे संजय देह्स्मृतीवर आला .
संजयाच्या मनस्थितीचे हे  श्रीज्ञानेश्वरांचे भाष्य संपूर्ण स्वतंत्र आहे -एकंदरच  गीतेच्या तात्विक विवेचनाला श्रीज्ञानेश्वरांनी विविध संवादाच्या रूपाने जी मानवी भावनिक बैठक दिली आहे ,त्याच्याशी हे सुसंगत आहे .संजय व धृतराष्ट्र यांच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया ह्या मानवी स्वभावाच्या दोन छटांचे विलोभनीय दर्शन घडवतात -तसेच संजयाच्या भावस्थितीचे वर्णन हे एका अर्थी स्वतः ज्ञानेश्वर आणि सर्व श्रोते यांच्याच भावस्थितीचे  वर्णन आहे ,हेच त्यांना सूचित करायचे आहे .आणि श्रोता कसा नसावा हे त्यांनी धृतराष्ट्राच्या वर्णनातून खुबीने सांगितले आहे .असा हा मनोद्न्य नवव्या अध्यायाचा शेवट आहे .

Saturday, July 21, 2012

sarvshreshth bhaktimarg

भक्तिमार्ग ,योगमार्ग आणि ज्ञानमार्ग हे परमेश्वर प्राप्तीचे मुख्य मार्ग होत .
योगमार्ग अवलंबणारे साधक पाच प्राणाबाहेर यम नियमांचे कुंपण घालून त्यावर प्राणायामरुपी तोफा ठेवतात व  जीवन कलेचा मार्ग धरून ,इंद्रियांना आत बांधून आणून संकल्प नाहीसे करतात व ध्यान आणि समाधीचे मार्गाने स्वरूप ऐक्यापर्यंत पोहोचतात .पण हा  मार्ग फार कष्ट दायक ,आचरणास कठीण आहे ,म्हणून सर्वांसाठी योग्य नाही .
इये प्रकृती पुरुषे दोन्ही ।उपजली जायच्या अमन मनी ।तो पितामह त्रिभुवनी ।विश्वाचा मी ।272
ज्ञान मार्गाबद्दल  बोलताना भगवंत म्हणतात कि जीव हा ज्ञान मार्गाने गेल्यावर ईश्वराच्या भिन्न पणाचे फोलपण जाणवून तो भेद नाहीसा करतो -त्याचे मनात ज्ञानरूपी अग्नी सदैव प्रज्वलित असल्याने तो सुखदुखाविषयी चित्त्ताची समता मिळवतो.तो ब्रम्ह विचाराचा महामंत्र जप करतो व आत्म बुद्धीने  स्वतः,पंचमहाभूते विषय व इंद्रिये ही सगळी एकच आहेत हे जाणतो व मग"मी जीव "ही त्याची कल्पना नाहीशी होऊन तो सर्व जगत ब्रम्हरूपच  आहे या ज्ञानाने परिपूर्ण होतो .हा मार्ग उत्तम असला  तरी प्रत्येक जीव या मार्गाने जाण्यास योग्य नसतो ,म्हणून तो सामान्य जनांसाठी अवघड ठरतो .
भक्तिमार्गाने जाणार्या भक्ताचे वर्णन करताना भगवंत त्याला शान्तिरुपी वेलीला फुटलेल्या कोवळ्या पानाची उपमा देतात .त्याच्या सहज  कर्मा चरणात नीती जगलेली दिसते .त्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झाली असते कि ते मोक्षाला 'पलीकडे हो 'म्हणतात
जया भक्तीची येतुली प्राप्ती ।जे कैवल्याते परौते सर म्हणती ।जयाचिये लीलेमाजी नीती ।जीयाली दिसे ।292
भक्त  हे स्वतः उपासक व देव एक उपास्य असा भेद नाही हे जाणून मीच होऊन माझी सेवा करतात .माझ्या नाम घोषाने ते विश्वाची दुखे :नाहीशी करतात व सर्व जग ब्रम्हानंदाने कोंडून भरतात. ते राजा रंक ,लहान मोठा असा भेद न करता जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात ,म्हणून माझे नामच त्यांचे वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असते ,म्हणून एक वेळ मी वैकुंठात नसतो ,योग्यांच्या हृदयातही नसेन ,पण माझे भक्त जेथे माझा नाम घोष करतात तेथे मी नक्की सापडेन .
श्रेष्ठ प्रतीच्या भक्ताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात कि वस्त्रात जसे अखंड सुतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात ते मलाच ओळखतात . कोणताही भेद न करता ते प्रत्येकास परमात्मा समजून लोटांगण घालतात .ते नेहमी निराभिमान असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते ,म्हणून ते सहजगत्या माझ्या रुपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात .
अशारितीने आपल्या कायिक ,वाचिक ,मानसिक या सर्व कर्माने ते माझे भजन करतात , त्याना मरण येण्यापुर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी ऐक्य होते , ते मग मरणानंतर इतर गतीस कसे जातील ?अशारितीने जिवंत पणीच मोक्ष प्राप्त करून देणारा भक्तिमार्ग हा इतर दोन मार्गापेक्षा श्रेष्ठ ठरतो हे सत्य होय .

Friday, July 20, 2012

don drushtant

1 पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।पांसी त्वचेचीया पदराआड ।परि ते अव्हेरून गोचीड ।अशुध्द काय नेघाती ?57
नवव्या अध्यायात भगवंत अत्यंत गुह्य असे ब्रम्हज्ञान ,आपल्या अंतकरणातील गोष्ट  सांगतात कारण अर्जुन स्वतः ज्ञानप्राप्तीच्या इच्छेची मूर्ती आहे .हे स्वरूपज्ञान सर्व विद्ध्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे -यावर अर्जुन शंका व्यक्त करतो कि अशी ज्ञानासारखी वस्तू लोकात अनुभव घेतल्याशिवाय कशी राहिली ?याचे उत्तर देताना धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या  पुरुषाचे वर्णन करताना भगवंत म्हणतात -
दुध हे पवित्र व गोड असून जवळच त्वचेच्या पदरा आड आहे ,तरी गोचीड ते सोडून  रक्त पीत नाही काय?
कमळ आणि बेडूक यांची वस्ती एकाच ठिकाणी आहे ,कमळातील परिमल दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात ,पण बेडकासाठी चिखलच असतो
दुर्देवी पुरुषाच्या घरात हजारो मोहोरा  पुरलेल्या आहेत ,परंतु अज्ञानाने तो त्यावरच बसून दारिद्र्यात जीवन घालवतो -याचप्रमाणे सर्व सुखांचा बगीचा असा राम तो सर्वांच्या हृदयात असताना ,त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांची इच्छा धरतात ,म्हणून ते जन्म मरण रूप दुथड्या नदीत गटांगळ्या खात रहातात .
2दिपु ठेविला परिवरी ।कवणाते नियमि ना निवारी ।आणि कवण कवणिये व्यापारी ।राहाटे  तेही नेणे ।28
तो जैसा का साक्षी भूत ।गृह्व्यापार प्रवृत्ती हेतू ।तैसा  भूत कर्मी अनासक्तू ।मी भूती असे ।29
भगवंत म्हणतात कि  अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापले आहे ,सर्व भुते माझ्या ठिकाणी आहेत ,पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही ,अव्यक्त रूपाने असलेला मी त्रैलोक्य रूपाने विस्तार पावतो हा भास आहे .
भूतांना धारण करणारे ,तथापि भुतांच्या ठिकाणी स्थित नसलेले आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना केली जाते असे माझे स्वरूप आहे मायेमुळे माझ्या शुध्द रूपावर भूतांची कल्पना करणारी प्रकृती संपली कि त्यापलीकडे असणारी माझी शुध्द स्वरूपस्थिती वेगळी समजणे हा माझा ऐश्वर्य योग आहे .
या सर्व भूत समुदायाची उत्पत्ती ,स्थिती आणि लय या कर्माचे मूळ कारण  प्रकृती आहे -जी पंचमहाभूतात्मक जगाचा आकार प्रकट करते -या प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो ,बाकी कर्तृत्व हिचे -म्हणून ह्या कर्माच्या ठिकाणी मी अनासक्त असल्याने मला हि कर्मे बंधन करू शकत नाहीत -ही गुह्य गोष्ट स्पष्ट करण्याकरता ते वरील  दृष्टांत देतात
घरात ठेवलेला दिवा कोणाला तू काही कर असे नियम घालून  देत नाही ,अथवा निवारण करत नाही ,तसेच घरात कोणकोण काय करत आहे हे दिवा जाणत  नाही -तो केवळ साक्षीभूत असूनही घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो -त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणार्या कर्माबद्दल उदासीन आहे ,पण त्याच वेळी माझ्या अस्तित्वाच्या आधारानेच कर्मे होतात
       समाप्त 

Tuesday, July 17, 2012

vakta -shrota sambandh

नवव्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानेश्वरांचा आत्मविश्वास त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिज्ञापुर्वक  बोलण्यातून प्रतीत होतो .
तरी अवधान एक वेळ दीजे ।मग सर्व सुखासी पात्र होईजे ।हे प्रतिज्ञोत्तर माझे ।उघड ऐका ।1
आपले हे बोलणे गर्वाचे  वाटेल कि काय अशा शंकेने ते लगेच लडिवाळपणे  लक्ष देण्याची विनंती करतात .आणि या विनंतीचा विस्तार करताना ते एकाहून एक उत्तम अनेक दृष्टांत देतात आणि आपल्या प्रतिभेने श्रोत्यांचे मन जिंकतात .या श्रोत्यांच्या कृपेनेच आपल्या हातून चांगले ग्रंथ कर्तृत्व होणार आहे अशी ते खात्री देतात. समोर बसलेल्या संतसज्जनांच्या कृपेसाठी ते आईसमोर मुलाने बोलावे तसे लडिवाळ बोलत आहेत ,.त्यांच्या समोर बोलण्याची आपली योग्यता नाही असे वर्णन करताना ते म्हणतात ,
अवधारा आवडे तेसणा घुन्घुरू।परि महातेजी  मिरवे काय करू ?अमृताचिया ताटी वोगरू ।ऐसी रससोय कैची । काजवा हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज दिसत नाही ,अमृताच्या ताटात वाढावे असे पक्वान्न कोठून असणार ?चंद्राला पंख्याने वारा घालणे ,प्रत्यक्ष नाद्ब्रम्हाला गाणे ऐकवणे ,किंवा अलंकारास  दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का ?सुवासाचा वास कशाने घ्यावा ?समुद्राने कोठे स्नान करावे ? आकाशच ज्यामध्ये मावेल अशी वस्तू कोणती ?त्याप्रमाणे तुमचे मन तृप्त करील असे वक्तृत्व कोणाजवळ आहे ?असे ते विचारतात.
पण असे असले तरी ते निरुपण करणार आहेत याची कारणमीमांसा करताना ते पुन्हा नव्या कल्पनांचा आविष्कार करतात,
तरि विश्व प्रगटीतया गभस्ती ।हातिवेनी न कीजे आरती ।कां  चुळोदके आपांपती ।अर्घ्यु नेदिजे ।13
असे जरी आहे तरीजग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काड्वातीने  ओवाळू नये काय ?किंवा चुळ भर  पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये काय ?
असे हे आपले आख्यान श्रोते स्वीकारणार आहेत याची खात्री दाखवताना ते श्रोत्यांच्या वात्सल्य भावाला आवाहन करतात  म्हणतात कि
अहो तान्ह्याची लागे झटे।तरी अधिकची पान्हा फुटे ।शेषे प्रेम दुणावते ।पढीयन्ताचेनी ।18
गायीच्या सडाला वासराने ढुशी दिली  तिला जास्तच पान्हा फुटतो ,कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत .असते -त्याप्रमाणे मी प्रतिज्ञेने बोलून चूक केली तरी तुम्ही कृपाळूपणे ते मनावर घेणार  नाहीत .
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसते  व पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेऊ घालते , बापही  आपले तोंड  पुढे करतो ,त्याप्रमाणे माझ्या बालबुद्धी बडबडीने तुम्ही आनंदी होता, असे ते श्रोत्यांना म्हणतात .वक्ता
 आणि श्रोता या  संवादात श्रोत्यांचे महत्व सांगताना ते ,म्हणतात अहो ,चंद्रकांत मणि पाझरणारा आहे , पण त्याला पाझरवण्याची शक्ती चंद्रामधेच आहे ,त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल ,पण त्याला बोलते करण्याची शक्ती श्रोत्याकडेच आहे .-म्हणून चंद्रापेक्षा शांत करणारे आणि अमृतापेक्षा जीवित वाढवणारे असे जे श्रोत्यांचे लक्ष ,त्या लक्षाने श्री ज्ञानेश्वरांच्या मनोरथांची वाढ करावी अशी विनंती ते करतात 

Saturday, July 14, 2012

bhakt,bhagvantache snehmay nate

श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्याचा वेळोवेळी उल्लेख करताना ज्ञानेश्वरांनी त्यांची सर्व आवडती उपमाने -कामधेनूचा बछडा ,कल्पतरूच्या खाली बसलेला इच्छुक ,चिंतामणीच्या घरात निजलेला .ही वापरली आहेत .भगवंताची थोरवी वर्णन करताना ते त्यांना मातेची उपमा देतात
जे अपत्य थानीहून निगे ।त्याची भूक त्या मायेसीच लागे ।एऱ्हवी ते शब्दे काय संगे ।मज स्तन्य दे येरी ।13
स्तनपान करणाऱ्या बाळाची भूक ज्याप्रमाणे त्याने शब्दामध्ये स्तन्याची मागणी न करताच आईला कळते ,त्याप्रमाणे न बोलताच  अर्जुनाच्या मनातले प्रश्न ओळखून भगवंतानी आपल्या बोलण्याला  प्रारंभ केला .मानवी मनातील अष्ट सात्विक भावांचे असे भगवंताच्या व्यक्तिमत्वावर रोपण करणे हे श्री ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य होय .आणि या मातृभावाने योगेश्वर कृष्णाची थोरवीही विशेष प्रतीत होते .पुरुषोत्तमा ,मधुसूदना ,सर्वेश्वर ,सर्वज्ञ वैगेरे अर्जुनाने जी श्रीकृष्णांना संबोधने  वापरली आहेत त्यातूनही वरील भावच प्रकट होतात .
अर्जुनाने सातवा प्रश्न विचारला की योगी मृत्युसमयी तुला कसे जाणतात ?या प्रश्नांचे उत्तर तर भगवंतानी सविस्तर दिलेच ,पण त्यांची थोरवी अशी की मृत्युसमयी आपल्याला कोणता मार्ग प्राप्त होईल ?या विचाराने खिन्न झालेल्या अर्जुनाला दिलासा देताना त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा भक्त श्रेष्ठ असा पवित्रा घेतला आहे  ,ते म्हणतात
कोणी पापी अथवा दीन मरण समयी माझा धावा करू लागला तरी त्याच्यासाठी मी  धावतोच न ?मग भक्ताचे वेगळेपण येथेच आहे अनेकविध मार्गाने त्याने केलेली भक्ती ही परमेश्वरावर केलेल्या ऋणा सारखी असते ,व ते ऋण फेडण्या करिता परमेश्वर  स्वतःमरण समयी  त्याची चाकरी करतो ,त्याला योग्य मरण देतो ,त्यासाठी त्याने माझी त्यावेळीच आठवण करावी याची गरज नाही .याशिवाय अजून एक गोष्ट ते अर्जुनाला समजावून सांगतात
तरी आता देह असो अथवा जावो ।आम्ही तो केवळ  वस्तूची आहो ।का जे दोरी सर्पत्व वावो ।दोराचीकडून ।48
जो योगमार्गाने जातो त्याला हे ज्ञान प्राप्त असते की देह जावो अथवा राहो ,आम्ही तर केवळ ब्रम्हच आहोत .व म्हणून या देहाच्या अस्तित्वाचे फोलपण व आत्म्याचे अमरत्व जाणवते जसा दोरीवर अंधाराने होणारा सर्पाचा भास मिथ्या आहे व दोरी असणे  हेच अंतिम सत्य आहे .

Friday, July 13, 2012

paramdhaam

अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु  परमां गतीम ।यं प्राप्य न निवर्तन्ते तत्धाम परमं मम ।21
ज्यास अव्यक्त .अक्षर म्हणतात ,त्यालाच परम गती म्हणतात ,ज्याप्रत गेल्यावर प्राणी परत येत नाहीत ,ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे .
21 व्या श्लोकातील भगवंताच्या या विधानाचे विवेचन करताना श्री ज्ञानेश्वरांच्या वाणीला बहर आला आहे .अनेक  दृष्टातांचा आधार घेऊन ही भगवंतांच्या अंतरंगातली गुह्य गोष्ट त्यांनी आपल्यासाठी सोपी करून मांडली आहे .
सुरवातीसच त्यांनी सांगून टाकले की हा श्रेष्ठ पुरुष फक्त अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे
याला अव्यक्त असे म्हणतात कारण ते मन आणि बुद्धीला दिसत नाही
आकाराला आल्याने त्याचे निराकारपण जात नाही व आकार लोप पावल्याने त्याची निरयता बिघडत नाही ,म्हणून त्याला अक्षर म्हंटले आहे .
त्याच्यापलीकडे काही विस्तार दिसत नाही म्हणून त्यास परमगती ,अंतिम गती असे म्हणतात
संपूर्ण देहरूपी  नगरामध्ये तो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे कारण तो बुद्धीची जाणण्याची क्रिया ,इंद्रियांचे व्यापार ,मनाची संकल्प विकल्प रूप क्रिया ,प्राणवायूची हालचाल या सर्व व्यापाराचा कर्ता किंवा करवता नाही ,पण ज्याप्रमाणे सूर्य आहे म्हणून लोकांचे व्यापार चालतात ,त्याप्रमाणे याच्या केवळ अस्तित्वाने शरीराचे व्यापार चालतात .
हा प्रकृतीशी एकनिष्ठ  असतो म्हणून त्यास पुरुष म्हणता येते .
वर सांगितलेले या पुरुषाचे खरे स्वरूप जाणणारे श्रेष्ठ योगी यास परमगती म्हणतात .
जे श्रेष्ठ भक्त कायावाचामनाने हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी धारणा धरतात ,परमात्मा त्यांचे घर शोधत येतो ,या परमात्मरूपी मुक्कामाला पोहोचलेल्या भक्ताला हा संसारच सर्व बाजूनी मोक्ष होऊन राहतो .आणि जो हे परमात्मरूप पावला त्याला पुनर्जन्म नाही .,जसे परिसाने लोखंडाचे सोने केल्यावर त्याला पुन्हा लोखंड करणारा पदार्थ नाही ,लाकूड अग्नीत गेले असता अग्निरुप्च होते ,लाकूड राहत नाही .
  जे परम स्वरम ,माझे स्वताचे श्रेष्ठ धाम -ही अंतरंगातील गुप्त गोष्ट मी तुला दाखवत आहे
ते माझे परम ।साचोकारे निजधाम ।हे आतुवर तुज वर्म ।दाविजत असे ।3

Thursday, July 12, 2012

satva prashn

प्रयाण  समयी योग्यांना होणारे भगवंताचे स्मरण या विषयी बोलताना भगवंत म्हणतात कि जिवंत  असताना ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते तीच गोष्ट मरण समयी आठवते व मरण समयी जी गोष्ट आठवते त्याच गतीला तो पुरुष जातो .
अंतकालेच मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम ।य :प्रयाति स मद्भावं याती नास्त्यत्र संशयः ।5
मरणाचे वेळी जो माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप होतो यात संशय नाही .
ज्या पुरुषांनी मरणा पूर्वीच अष्टांग योगाचा अभ्यास करून मदरुपता प्राप्त करून घेतली आहे ,त्यांना शरीर पडल्याचे समजूनही येत नाही -याचा ज्याला अनुभव घ्यायचा आहेत्याने चित्ताला माझी मोहोर लावायचा अभ्यास करावा व  प्रयाण काळी योगयुक्त होऊन स्थिर अंतकरणाने अव्यंग ब्रम्हाचे स्मरण करीत त्याचे प्रती जावे ,-तेंव्हा घटाखाली झाकलेल्या दिव्याप्रमाणे  त्या योगी पुरुषाचे शांत देहावसान होते .
कां झाकलीये घटींचा दिवा ।नेणिजे काय जाहला जेंव्हा ।या रिती जो पांडवा देह ठेवी ।
तो केवळ परब्रम्ह ।जया परम पुरुष हे नाम ।ते माझे निजधाम ।होऊनी ठाके ।98-99
जिवंत पणीच योगाभ्यासाने ब्रम्हरूप  प्राप्त करण्याच्या मार्गाचे सोपेपण वर्णन करताना भगवंत म्हणतात-
या मनाला सहज बाहेर येण्याची जी सवय आहे ,ती नाहीशी करून मन हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे ,सर्व इंद्रियांचे नियमन करून ,हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून ,प्राणवायू मस्तकाकडे ठेवून ,  योगाचरणात स्थित होऊन ओम या एकाक्षरी ब्रम्हचा उच्चार करीत व माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो ,तो श्रेष्ठ अशा गतीला पावतो .
तरी मना या बाहेरीलकडे ।यावयाची सविया सवें मोडे । हें हृदयाचिया डोही बुडे ।तैसे कीजे ।11
यावरही अर्जुनास वाटले की इंद्रिये असमर्थ झाल्यावर ,मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर कोणी ओंकाराचे स्मरण कसे करावे ?या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात
तरीअगा  ऐशिया ध्वनी ।झणे थारा देशी हो मनी । पै नित्य सेविला मी निदानी ।सेवकु होय। 23
जे माझी नित्य सेवा करतात त्या भक्तांच्या मरण काळी मी त्यांचा सेवक होतो ,म्हणून त्यांचा अंतकाळ योगमार्गाने ,ओंकाराचे स्मरण करीत होईल याची मीच काळजी घेतो ,माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो .

arjunache sat prashn

सातव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने विनंती केली की त्या सात पदांचे पुन्हा निरुपण करावे या अर्जुनाच्या विनंतीला मान देताना पुढे होणार्या कृष्ण अर्जुन संवादाचे वर्णन करताना श्री ज्ञानदेव म्हणतात
तैसे देशियेचिया हवावा ।   इंद्रिये करिती राणिवा ।मग प्रमेयाचिया गांवा ।लेसा जाईजे ।7-209
इथे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील ,बुद्धीच्या जीह्वेने शब्दातील अर्थ चाखण्या आधीच अक्षरांच्या शोभेने इंद्रियांचे समाधान होईल मग सिध्तान्ताच्या गावास त्याला चांगल्या तयारीने जाता येईल .जेथे शब्दच नाहीसे होतात ते बोलणे मी अशा सुंदर रीतीने सांगेन
1पुढे श्री भगवंत म्हणतात ,आकाराला आलेल्या सर्व सूक्ष्म पदार्थात भरलेले जे अविनाशी तत्व त्यास ब्रम्ह म्हणतात .
 2सृष्टीच्या उत्पत्ती आणि लया बरोबर जे ब्रम्ह उत्पन्न अथवा लयीभूत होत नाही ही त्याची जी स्थिती ते अध्यात्म .
3निराकार ब्रम्हाच्या ठिकाणी प्रकृतीयोगाने विश्व साकार होणे हे कर्म 
4 सजीवाचे शरीर ते अधिभूत
5 परमात्म्याचे त्या शरीरात वास करणारे   अधिदैव
6अधिदैवाचा मीपणाचा अहंकार गेला की तो  माझ्याप्रत  तो अधियज्ञ
एरवी अधिभूत आणि आधिदैव हे भगवंताचाच भाग , पण    अविध्येने  त्यांना  कमीपणा आला आहे .हा कमीपणा घालवण्यासाठी इंद्रियांना प्रिय असलेल्या विषयांकडे पाठ फिरवून वैराग्याच्या आधाराने अष्टांग योगाचे साधन करावे म्हणजे ते पुरुष मद्रूप अधियज्ञ होतात
7प्रयाण काली  योग्यांना होणारे  भगवंताचे स्मरण -पुढे याबद्दल भगवंत विस्ताराने बोलून अर्जुनाचे  पूर्ण समाधान करतात 

Tuesday, July 10, 2012

satvya adhyayacha upsanhar

या सातव्या अध्यायाचा शेवट ही ज्ञानेश्वरांची एक नाट्य  निर्मिती म्हणावी लागेल .मूळ  गीतेत नसलेला एक प्रसंग त्यांनी इथे आपल्या कल्पना विलासाने उभा केला आहे .
मग चमत्कारला म्हणे ।इये जळीची मा तारांगणे ।कैसा झकविलो असलगपणे ।अक्षरांचे मी ।7-194
"आत्मप्राप्तीसाठी झटनार्याना   परब्रम्ह रूप फल मिळते आणि प्रयाण काळीही ते मला विसरत नाहीत "हे भगवंत सांगत असताना अर्जुनाला ती पदे अनाकलनीय वाटली हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की ती पदे  त्याला पाण्यात पडलेल्या तार्यांच्या प्रतीबिम्बाप्रमाणे सुंदर पण दूरस्थ आणि अप्र्याप्य वाटली .
या अर्जुनाच्या मनस्थितीचे ते नाट्यरूप निवेदन करतात
 ही ब्रम्हाच्या प्रतिपादनाची वाक्ये म्हणजे अर्थरूप रसाने भरलेली फळेच ,ती अर्जुनाच्या विचाराच्या तोंडात मावेनात अशी ते उपमा देतात .आणि हेतूच्या दातानीही ती फुटेनात ,म्हणजे भगवंताचा हेतू काय हे त्याला कळेना ,म्हणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावेना .
तंव इये शब्द कुपिकेतळी  ।नोढवेची अवधानाची अंजुळी ।जे नावेक अर्जुन त्यावेळी। मागांची होता ।7-185
श्रीकृष्णाच्या शब्दरूपी कुपिच्या खाली अर्जुनाची लक्ष रुपी  ओंजळ प्राप्त झाली नाही ,कारण अर्जुनाचे त्यावेळी लक्ष नव्हते .त्याठिकाणी ते ब्रम्हाचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थ रुपी रसाने भरली होती व अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती ,ही श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचन रुपी फळे सहज कृपारूपी मंद वार्याने अर्जुनाच्या कान रुपी ओटीत अकस्मात पडली .
ती वाक्यरूप फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची बनवलेली असून ब्रम्हरसाच्या   समुद्रात  बुडवून मग तशीच परमानंदाने घोळली होती .या फळाच्या बाह्य सौंदर्याचे सुख अर्जुनास अनुभवास येऊ लागले ,पण मग त्याला जाणवले की ही सुलभ दिसणारी वाक्ये नाहीत तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत .तेथे आमच्या बुद्धीने कितीही धडपड केली तरी तिला थांग लागणार नाही .म्हणून त्याने भगवंतास विनंती केली ह्या  सात पदांचा अर्थ मला पुन्हा सांगावा ,हे सांगणे म्हणजे अथवा अध्याय होय . 

Monday, July 9, 2012

bhakt

मायानदीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात कि हा मायानदीचा  पूर तरून जाण्यास बुद्धी कामाला येत नाही ,तर उपाय म्हणजे सर्व भावाने मला भजणे .हे भक्त चार प्रकारचे असतात ,आर्त ,जिज्ञासू ,अर्थप्राप्तीची इच्छा धरणारा आणि ज्ञानी .यापैकी ज्ञानी हा भक्त माझ्याशी एकरूप झालेला असतो ,म्हणून मला प्रिय आहे .आर्त म्हणजे दुखं निवारणार्थ माझ्याकडे येणारे. काही जाणून घेण्याची इच्छा असलेले ते जिज्ञासू आणि अर्थार्थी म्हणजे अर्थ प्राप्तीची इच्छा धरणारा ..हे भक्तच आहेत ,मला आवडतात ,पण कनिष्ठ प्रतीचे ,खर्या श्रेष्ठ भक्ताला माझ्यापासून कशाचीच अपेक्षा नसते .फार काय ,तो माझ्याच योग्यतेला आलेला असतो आणि तरीही माझी सेवा करतो .
मग चौथियांचा ठायी । काहीच करणे नाही ।मग भक्तु एक पाही ।ज्ञानिया जो ।111
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशे ।फिटले भेदाभेदाचे कवडसे ।मग मिची जाहला समरसे ।आणि भक्तुही तेवीची ।112
 असे पहा अर्जुना ,दुधासाठी लोक गाईला बांधून घालतात ,पण दोरावाचून वासराचा पाश इतका बळकट की ते शरीर ,मन आणि प्राणाने आपल्या आईखेरीज कोणाला जाणत  नाही .ते इतके अनन्यगती असते ,म्हणून गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते ,तसेच माझे आणि ज्ञानी भक्ताचे नाते आहे .हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे असा ज्यांचा भाव असतो ,तो सर्व भक्तांचा राजा आहे ,ज्ञानी आहे ,पण असे भक्त दुर्लभ असतात .असे जे भक्त मला जाणतात ते मरणसमयीही मला स्मरतात .ते माझ्याशी इतके एकरूप झालेले असतात की शरीराच्या वियोगाच्या वेळेस दुखी होत नाहीत .
येर तनुमन प्राणी ।जे निरंतर माझेयाची वाहणी ।ते देहाचा निर्वाणी ।मिची होती ।7-150
असा हा ज्ञानी भक्त म्हणजे माझे केवळ चैतन्यच होय ,ही शब्दात न सांगता येणारी गोष्ट ,मी अर्जुनावरच्या प्रेमापोटी बोलून गेलो
.एर्हवी ज्ञानिया जो म्हणिजे ।तो चैतन्यची केवळ माझे ।हे न म्हणावे परी काय कीजे ।न बोलणे बोलो ।7-126
 

Friday, July 6, 2012

maya-nadi -ek rupak

सातव्या अध्यायात ज्ञान व विज्ञान यातील फरक स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर विज्ञान म्हणजे त्रीगुणात्मक मायेचा खेळ असे वर्णन करतात .या मायेच्या पलीकडे पोहोचून अविकारी अशा परमेश्वराचे रूप जाणून घेण्यासाठी त्यांनी मायानदीचे रूपक उभे केले .आहे
गीतेत  नसलेले पण ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने उभे केलेले हे एक प्रभावी भव्य रूपक आहे .श्री ज्ञानदेव म्हणतात
आता   महदादि हे माझी माया ।उतरोनिया धनंजया ।मी होईजे हे आया ।कैसेनी ये ।68
हे अर्जुना -महत तत्व ही माझी माया ,ती पार करून माझ्याशी एकरूप होणे कसे साध्य होईल ?
ही माया नदी ब्रह्म रुपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मुल संकल्प रुपी  उसळीने निघाली -त्यावेळी तिच्यात पंच महाभूताचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला .ही नदी सृष्टीच्या विस्तार रूपाने वाढते ,मोठा ओघ बनते ,काळाच्या ग्रास करण्याच्या शक्तीरूपाने वेगाने वाढून ती प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही काठाबाहेर वाहते -नंतर गुणरुपी  मेघांच्या  जोरदार वर्षावाने तिला मोह रुपी महापूर येतो ,या पुरात यम नियम रुपी गांवे वाहून जातात .या नदीचा प्रवाह द्वेष रुपी भोवर्यांनी दाट भरला आहे ,तिला मत्सर रुपी वळणे आहेत ,तिच्यात तरुण स्त्रीयारूपी मोठे मासे आहेत ,तिला प्रपंच रुपी वळणे आहेत ,व कर्माकर्म रुपी पूर येत आहेत आणि सुख दुख रुपी पुराड त्यावर तरंगत आहे .
रतीच्या  बेटावर  या नदीच्या कामरूपी लाटा आदळतात व तेथे जीवांचा समुदाय दिसतो .
या नदीत अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत व त्यावर विद्या ,धन ,कुल या तीन मदाच्या उकळ्या येतात आणि विषयरूपी लाटा  उसळतात .या नदीत उदय अस्तांचे लोंढे जन्म मृत्यू रूप   व तेथे पंचमहाभुतापासून शरीर रुपी बुडबुडे तयार होतात व जातात .येथे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात ,भ्रांतीच्या गढुळपणामुळे आशा रूपी  गाळात प्राणी फसतात .या नदीत तमोगुणाची धार मोठी असते ,पण सत्वगुणांचा   स्थिरपणा गंभीर असतो .अशी ही मायानदी तरून जाण्यास फार कठीण आहे तिच्या पूनर्जन्म रुपी लाटांची उसळी सत्य लोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते व त्यामुळे ब्रम्हांडाचे धोंडे कोसळून पडतात .या लाटांमुळे आलेला  पूरअद्याप हि थांबत नाही .
येथ एक नवलावो ।जो जो कीजे तरणोपावो ।तो तो अपावो ।होय ते ऐक ।
या मायानदीतून तरून जाण्याचा जो जो उपाय करावा तो तो अपायचं  होतो ,ऐक कसे ते ,
एक आपल्या बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून  जाण्याकरता नदीत शिरले -ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही .दुसरे किती एक ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले  गेले .किती एकानी वेदरुपी  सांगडीचा आश्रय केला ,पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे धोंडे घेतले -ते मद रुपी माशाच्या तोंडात सबंध गेले .कितिकांनी तारुण्य रुपी कांस पेटा कमरेस बांधला ,ते विषय रुपी मगर यांनी   चघळून टाकले .नंतर म्हातारपण रुपी लाटेमध्ये असणार्या बुद्धिभ्रंश रुपी जाळ्याने ते व्यापले जातात ,शोकरुपी काठावर आदळले जातात ,क्रोध रुपी भवर्यात गुरफटतात ,संकटरुपी गीधाडाकडून टोचले जातात ,दुख रुपी चिखलाने भरून मरण रुपी गाळात फसतात कितीएकानि क्रीयारूपी पेटी पोटाशी बांधली ,ते स्वर्गसुखाच्या कपारीत अडकून राहिले ,ज्यांनी कर्मरुपी बाहूंवर विश्वास ठेवला ते विधीनिषेधाच्या वळणात सापडले .
    अष्टांग योगानेही इथे कदाचित काही तरणोपाय होतो .अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाता येत नाही ,जे सर्वभावे ईश्वराला भजले ,तेच ही मायानदी सहज तरून  गेले .ज्यास सदगुरू हा तारणारा नावाडी आहे ,ज्यांनी आत्मानुभव रुपी कासोटा घट्ट बांधला आहे ,-ज्यांना आत्मनिवेदन रुपी तराफा प्राप्त झाला आहे ,जे अहंभावाचे ओझे टाकून ,विकल्प रुपी  वार्याच्या झुळुका चुकवून ,संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून चालतात त्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्य रुपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञान रुपी सोपी पायवाट सापडून ते निवृत्ती रूप तीराकडे वळतात ,वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत ,मीच परमात्मा आहे या समजुतीच्या बलाने तोल सांभाळत निवृत्तीरूप काठाने बाहेर आले व मायानदी तरून  गेले .पण असे भक्त थोडे आहेत .
येथ एकची लीला तरले ।जे सर्वभावे मज भजले ।तया ऐलीच थडिये सरले ।मायाजळ ।

Thursday, July 5, 2012

para ani apra prakruti

सातव्या अध्यायाच्या सुरवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला विज्ञान म्हणजे एका नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे तयार होतात हे समजणे आहे असे सांगून पुढे विज्ञानाची यथार्थ ओळख करून देतात .ते जाणून घेण्याची गरज काय हे समजावताना ते म्हणतात
एथ विज्ञाने काय करावे ।ऐसे घेसि जरी मनोभावे ।तरी पै आधी जाणावे ।तेंची लागे ।3
भगवंत म्हणतात ,माझी प्रकृती हि पृथ्वी ,आप ,तेज, वायू ,आकाश ,मन ,बुद्धी ,अहंकार अशा आठ प्रकारात विभागली आहे .प्रकृती म्हणजेच महत तत्वादिक माझी माया ,हि माझी छाया आहे ,हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते ,हीच अपरा प्रकृती होय .
जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून वेगळी जीवभूता परा प्रकृती आहे .अपरा प्रकृतीचे आठ भाव हे परा प्रकृतीच्या ठिकाणी लीन असतात .ही परा प्रकृती जड जीवाला सजीव करते ,-जीवाला सज्ञान करते ,व मनाला शोक ,मोह इत्यादी प्रदान करते ,बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ,जगताला धारण करणारे अहंकाराचे जे कौशल्य आहे ते दोन्हीही परा प्रकृतीमुळे आहे .
सर्वप्राणीमात्र हे  परा व अपरा ह्या दोन्ही प्रकृतीपासून निर्माण झाले .सर्व जगाचा आदी आणि अंत मीच आहे .
परा जेंव्हा अपरेच्या परिणामास पावते तेंव्हा प्राणिवर्ग रुपी नाण्याची टाकसाळ सुरु होते ,अंडज  ,स्वेदज , जारज .व उद्भिज अशा प्रकारच्या आकृती व्यक्त होऊ लागतात .या वेगवेगळ्या आकार प्रकारांच्या प्राण्यांचा प्रसार ,कर्माकर्म व्यवहार व आटणी सर्व प्रकृतीच करते .आणि प्रकृती तर माझीच छाया आहे ,म्हणून सर्व जगाचा आदी ,मध्य ,शेवट मीच आहे .
ज्याप्रमाणे सोन्याच्या दोऱ्यात  सोन्याचेमणी ओवावे त्याप्रमाणे हे जग माझ्यात गुंफले आहे .उदकातील रस मी आहे ,चंद्र सुर्यातली प्रभा मी आहे ,वेदातील ओंकार ,आकाशातील शब्द ,पुरुषातील पौरुष मी आहे .पृथ्वीतील गंध अग्नीतील तेज ,प्राण्यांचे जीवन ,तपस्व्यांचे तप ,बुद्धिमंतांची बुद्धी ,तेज्स्व्यांचे तेज मी आहे .काम आणि राग याविरहित असे बलवानांचे बल मीआहे ,आणि भूतांच्या ठिकाणी असलेला धर्माधीष्टीत काम मी  आहे .सात्विक ,राजस आणितामस असे जे पदार्थ ते माझ्यापासून उत्पन्न झाले ,पण मी त्यांच्यामध्ये नाही .
ही त्रिगुणात्मक माया ,माझीच छाया ही पद्द्याप्रमाणे माझ्या आड आली आहे ,म्हणून प्राणी मलाजाणत नाहीत ,मद्रुप होत नाहीत ,माझेच असून  मला ओळखत नाहीत कारण मी व माझे या भ्रांतीने ये विषयांध झाले आहेत .

dnyan,vidnyan,adnyan

गीतेतील निरुपणा प्रमाणे सृष्टीत जे अनेक प्रकारचे विनाशी पदार्थ आहेत ,त्या सर्वात एकच परमेश्वर भरून राहिला आहे हे समजणे म्हणजे ज्ञान .
एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान .
हा नाशिवंत प्रपंच हेच अंतिम सत्य समजणे म्हणजे अज्ञान .
या मूळ   श्लोकामधले गूढ तत्व आपल्या रसपूर्ण भाषेत समजावून सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात
तैसी जाणीव जेथ न रिघे ।विचार मागुता पाऊली  निघे  ।तर्कु आयणी नेघें ।आंगी जयांचा ।
अर्जुना तया नाव ज्ञान ।येर प्रपंचु हे विज्ञान ।तेथ  सत्यबुद्धी हे अज्ञान ।   हेंहि जाण ।75 /76
श्रीकृष्ण सांगतात कि अर्जुना .मला संपूर्ण जाणण्यासाठी जे स्वरूपज्ञान म्हणजे काय ते तू प्रथम समजून घे .जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही ,विचार जेथून मागे फिरतो ,तर्काचे चातुर्य जेथे चालत नाही त्याचे नाव ज्ञान होय .त्याहून दुसरा जो प्रपंच त्याचे नाव विज्ञान आहे .आणि प्रपंचच खरा आहे असे समजणे म्हणजे अज्ञान होय .म्हणून ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी आधी विज्ञान समजणे जरुरी आहे .
आणि इयेते प्रकृती म्हणिजे ।जे  अष्टधा भिन्न जाणिजे ।लोकत्रय निपजे ।इयेस्तव ।16
आप तेज गगन ।मही ,मारुत ,मन  ।बुद्धी ,अहंकार हे भिन्न ।आठै भाग ।18
ही माझी प्रकृती पृथ्वी ,जलं  ,तेज , वायू ,आकाश ,मन ,बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागली आहे .हीच माझी माया आहे .हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते .हिला अपरा प्रकृती असे म्हणतात .आणि जिने हे जग धारण केले आहे अशी माझी जीवभूता परा प्रकृती दुसरी आहे ..सर्व प्राणिमात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत .या सर्व जगाचा आदी आणि अंत मी आहे ,पण प्रत्यक्ष नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते .ज्याप्रमाणे दोरा मण्याला   धारण करतो ,त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो .
सात्विक ,राजस आणि तामस म्हणून  जे जे पदार्थ आहेत .ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत ,पण मी त्यामध्ये नाही .या त्रिगुणात्मक मायेच्या मोहात पडलेले जग या गुणाहून  वेगळ्या आणि विकाररहित अशा मला जाणत  नाही .प्रकृतीचा हा विलास जाणणे हे विज्ञान होय .व या पलीकडील माझे अस्तित्व जाणणे हे ज्ञान होय .तसेच त्रिगुणात्मक सृष्टीस सत्य मानणे हे अज्ञान होय .माया किंवा अज्ञान हा त्रिगुणात्मक देह व इंद्रियांचा धर्म आहे -आत्म्याचा नाही .